NCP Pune | Agitation | महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेध आंदोलन

राज्यात नव्याने सुरू झालेल्या “मुंबई – अहमदाबाद रोजगार भगाओ एक्सप्रेस” चे चालक व मालक शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मामलेदार कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार वेदांता फॉक्सकॉन,मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क,मेडिकल डिवाईस पार्क हे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्र बाहेर गुजरातला हलवल्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प देखील बडोद्याला पळविण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात उत्कृष्ठ इन्फ्रास्ट्रक्चर, चोवीस तास वीज, मुबलक पाणी व सुशिक्षित तरुण या सगळ्या सोयीच्या गोष्टी असताना देखील, या राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत. कारण राज्यातील सत्ताधारी सरकार जरी महाराष्ट्र सरकार असले तरी, केंद्रातील गुजराती मालकाच्या इशाऱ्यावर काम करणारे सरकार असून, राज्यातील जनतेच्या हितापेक्षा केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे हित जपणे हे या सरकारचे आद्य कर्तव्य असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान होत आहे.टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातच होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविले जाताय, ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी चिंताजनक बाब आहे.सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे.

महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील युवकांसाठी अतिशय चिंताजनक बाब असून असेच जर चालत राहिले तर जसे बिहार – उत्तर प्रदेश मधून तरुण रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात तसे महाराष्ट्रातील तरुणांना देखील गुजरातमध्ये कंपन्यांच्या गेट उभे राहावे लागेल, इतिहासात अशी वेळ महाराष्ट्र राज्यावर कधीही आलेली नाही.परंतु आता ही वेळ येण्याची शक्यता वाटत आहे.

“शिंदे फडणवीसांच्या स्वप्नातील महाराष्ट्रात तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे हेच आहे का …? याचा खुलासा देखील राज्याच्या मुख्यमंत्री – उप मुख्यमंत्र्यांकडून होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून देशाचे नेते हे संपूर्ण राष्ट्राचे नेते आहे. त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये” असे मत शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

या आंदोलनप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख , वनराज आंदेकर, महेंद्र पठारे,प्रकाश कदम, फारुक इनामदार, सुधीर कोंढरे, मृणालिनी वाणी,किशोर कांबळे,अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,महेश शिंदे,शांतिलाल मिसाळ , गणेश नलावडे, निलेश वरे, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.