Tag: 24*7 water project
पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
| जायका व पुणे शहरातील पाणी पुरवठा समस्येचा पालकमंत्र्यांकडून आढावा
हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी, असे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात जायका, २४ x ७ पाणी पुरवठा योजना आणि पुणे शहरातील पाणी समस्येबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रविंद्र बिनवडे, विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.
मैलापाणी शुद्धीकरणासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासोबत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. कालबद्ध पद्धतीने जायका प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रीया केल्यानंतरचे पाणी औद्यागिक क्षेत्राला देऊन तेवढ्या प्रमाणात औद्योगिक कारणासाठी दिले जाणारे पाणी शहरासाठी वापरण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास करावा.
समान पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटरमुळे निदर्शनास आलेली पाणी गळती कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत. कमी पाणी मिळत असलेल्याची तक्रार असलेल्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होईल यासाठी तेथील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिले.
समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी साठवण क्षमता २३ टक्क्यापासून ३३ टक्क्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी २८७ द.ल.लिटर क्षमतेच्या ८२ नव्या टाक्या उभारण्यात येणार असून त्यापैकी ४३ ची कामे पूर्ण झाली आहेत, तर १२ टाक्यांचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. २१ टाक्यांची कामे सुरू आहेत. पाण्याचे ऑडीट करण्यासाठी २४६ पैकी २३५ इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटर बसविण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जायका प्रकल्पांतर्गत नवे ११ शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे ३९६ द.ल.लिटर मैलापाणी शुद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ ठिकाणी ५५ किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. अमृत योजनेतून जुन्या प्रकल्पांची क्षमता वाढ करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
000
समान पाणीपुरवठा आणि आवास योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य
| आयुक्तांनी बजेट मध्ये केली भरीव तरतूद
पंतप्रधान आवास योजना आणि समान पाणीपुरवठा या दोन योजना नव्या आर्थिक वर्षात पूर्ण होतील. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलमापक बसविणे, पाण्याच्या टाक्यांची उभारणी, जलवाहिन्या टाकणे ही कामे पूर्ण होणार असून जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसुली पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.
आगामी आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी शुक्रवारी अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. समान पाणीपुरवठा योजनेत प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, पंपिंग स्थानके बांधणे, तसेच नागरिकांच्या नळजोडणीवर जलमापक बसविणे अशी कामे प्रस्तावित आहेत. पाण्याच्या साठवण टाक्या बांधणे, मुख्यदाब नलिका टाकणे यांसाठी प्रत्येकी एक, तर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रनिहाय पाच अशी सात निविदांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
नव्या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी जादा तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत समान पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील आर्थिक वर्षात जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसूल केली जाईल. तसेच पंतप्रधान आवास योजनांतर्गत सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण केले जातील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.
शहरात समान पाणी पुरवठा करण्याबरोबराच समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा पाणी पुरवठ्यासाठी एक हजार ३२१ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून या वर्षी समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा मनोदय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शहरातील समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. मध्यंतरी कोविडमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात या प्रकल्पाचा गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मार्च २०२४ पर्यंत या प्रकल्पातंर्गत ७० पाणी साठवण टाक्या कार्यान्वित करणे, त्याशिवाय ३५० किलोमीटर लांबीची नवीन वितरण व्यवस्था निर्माण करणे आणि दीड लाख जलमापक मीटर बसवण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. तर पाणी पुरवठ्या करण्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या शहरातील १४१ झोनपैकी ६५ झोनचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या शिवाय समाविष्ट ३४ गावांत ही योजना राबविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक, सुस, म्हाळुंगे गावांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये बावधन बुद्रुक येथे पाच टाक्यांचे बांधकाम व सुमारे ३५ किलोमीटरलांबीची पाण्याची लाइन विकसित करण्यात येणार आहे. तर सुस व म्हाळुंगे येथे सहा टाक्या व ७७ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे.
अपात्र ठेकेदारांना पात्र तर पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवणाऱ्या मनपा प्रशासनाची चौकशी व्हावी
| आमदार सुनील कांबळे विधानसभेत आक्रमक
पुणे महापालिकेच्या (PMC Pune) कारभारावरून भाजपचे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) विधान सभेत (Vidhan sabha) चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. प्रशासकाच्या (Administrator) कामावर नाराजी दाखवत अपात्र ठेकेदारांना पात्र तर पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवणाऱ्या मनपा प्रशासनाची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी विधान सभेत केली.
पुणे महानगरपालिकेच्या कामकाजाच्या बाबतीत बऱ्याच तक्रारी नागरिकांनी आमदार सुनील कांबळे यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारी वरून आमदार सुनील कांबळे यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन सदर तक्रारी विषयी विचारणा करून त्याची माहिती मागवली. परंतु आज पर्यंत पुणे महानगर पालिकेकडून कोणतीही माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आमदार सुनील कांबळे यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या कारभारा विषयी लक्षवेधी सूचने द्वारे शासनाचे लक्ष वेधले. (BJP MLA Sunil Kamble)
यामध्ये पुणे महानगर पालिकेवर प्रशासक नेमणूक झाल्यापासून आजतागायत झालेल्या मुख्यसभा आणि स्थायी सभांमध्ये दाखल करण्यात आलेल्या विषयांना मान्यता देताना झालेली अनियमितता, तसेच स्थायी समितीमध्ये ज्या निविदा मान्य करण्यात आल्या त्या निविदांमध्ये सहभागी झालेल्या कंत्राटदारांना चुकीच्या पद्धतीने पात्र व अपात्र करणे, 24×7 पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा मान्य झाल्यापासून आजतागायत मोठ्या प्रमाणात कामे प्रलंबित असणे, जायका (नदी सुधार ) प्रकल्पाचे निविदा मान्य झाल्यापासून आजतागायत मोठ्या प्रमाणात कामे प्रलंबित असणे, या सर्व विषयांची चौकशी शासनाने करावी अशी मागणी आमदार सुनील कांबळे यांनी सभागृहात केली. (Pune Municipal corporation)
शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध
| समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप
पुणे मनपाने (PMC Pune) पालकमंत्री यांच्याकडे पुणे शहरामध्ये घरा-घरांमध्ये बसविण्यात आलेल्या पाणी मीटरच्या (Water Meter) रिडींगनुसार पाण्याचे बील अकारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केल्याचे समजले. आमच्या ” शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) या पक्षाचा या बील अकारणीला तीव्र विरोध आहे. असे शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा ही सुतार यांनी दिला आहे. (Pune Municipal corporation)
सुतार यांनी दिलेल्या निवेदनानुसार २४x७ ही पाणीपुरवठयाची फसवी योजना पुणे शहरामध्ये मनपाने राबविली आहे. याचा डीपीआर मुख्य सभेने जो मान्य केला त्याप्रमाणे या योजनेचे लाभ प्रत्यक्षात सुरू नाही. मनपाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक भुर्दड बसला असून, सदरचे पैसे हे पुणेकरांच्या कररूपी पैशातून दिले जात आहेत.
२४x७ या पाणीपुरवठा योजनेचा अर्थ होता बाराही महिने, चौवीस तास पाणीपुरवठा पुणेकरांना मिळणार काही दिवसानी योजनेचे नाव झाले समान पाणी पुरवठा आणि आता ही योजना आहे कधी-कधी पाणी पुरवठा.
ही पाणीपुरवठा योजना संपूर्ण फसवी असून पुणेकरांना फसवणारी योजना आहे ही योजना फक्त काही लोकाच्या फायदयासाठी राबविण्यात येत आहे. योजना ही सुरूवातीपासुन वादात अडकली आहे. त्याच्या इस्टिमेटपासुन ते टेंडर प्रक्रियेपर्यंत ही योजना वेगवेगळ्या कारणांमुळे लांबली गेली. या योजनेमध्ये काही तात्रिक बदल करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या प्रकल्प खर्चामध्ये बचत होऊन मनपाची आर्थिक बचत होणार आहे तसेच जर हे तांत्रिक बदल केले नाहीत तर या योजनेचा पुणेकरांना हवा तसा फायदा होणार नाही आणि पाण्याची समस्या संपूर्णपणे सुटणार नाही, अशा चुकीच्या योजनेमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. असे सागून मनपाचे हित सांभाळणाऱ्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना या कामातून मुक्त करून त्यांची बदली करण्यात आली.
या योजनेमुळे पुणेकर नागरिकांना काहीही फायदा होत नाही, अजूनही पुणे शहरामध्ये पाण्याचे प्रश्न प्रलबित आहेत. पाणी पुरवठयाचे काम पूर्ण झाले नसताना सुध्दा मीटर बसविण्याचे काम घाई-घाईत करण्यात आले हे फक्त कंपनीच्या फायदयाचा व काही लोकांचा फायदयाचा विचार करून, वेळ कोणती निवडली तर लोकप्रतिनिधी मनपामध्ये नसताना यामुळेच या योजनेबाबत अजून संशय वाढत चाललेला आहे.
जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असे सुतार यांनी म्हटले आहे. (24*7 water project)
समान पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा – पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा
शहरातील पाणी वापर (Water use) नियंत्रित करण्यासाठी मनपाकडून (PMC pune) करण्यात असलेल्या उपाययोजनांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Guardian minister chandrakant patil) यांनी आढावा घेतला. समान पाणी पुरवठा योजनेसह (24*7 water project) पाणीपुरवठ्याची अन्य सर्व कामे महानगरपालिकेने निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण करावीत, कोणताही विलंब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, राहूल कुल, सुनील टिंगरे,मनपा आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आपण स्वतः दर महा महानगरपालिकेकडून आढावा घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, पाण्याच्या टाक्यांची कामे महापालिकेने निर्धारित कालमर्यादेतच सप्टेंबर २०२३ पर्यंत तर पाईपलाईनचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे. समान पाणी पुरवठा प्रकल्पामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढवून ३३ टक्क्यांपर्यंत होईल, सर्वांना समान पाणी मिळेल.
ते पुढे म्हणाले, पाणी गळती थांबवण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलण्यात याव्यात. आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या वाढवून गळती रोखण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. सोसायट्यांमधील पाणी गळतीची कामे तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत. बांधकामाला, बागेला शुद्ध पाणी वापरले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.
यावेळी मंजूर पाण्याचा कोटा, मागील वर्षातील पाण्याच्या स्त्रोत निहाय दैनंदिन पाण्याचा वापर, पाण्याचे अंदाजपत्रक, जल शुद्धीकरण केंद्रनिहाय झोन, समान पाणी पुरवठा प्रकल्प, टाक्या प्रकल्प, पाईपलाईन कामाची प्रगती व नियोजन, मीटर्स बसविण्याच्या कामाची प्रगती व नियोजन याबाबतचा आढावा घेण्यात आला.
शहरातील सोसायट्यांमध्ये होत असलेल्या पाणी गळतीवर लक्ष देण्याची गरज असून जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत मनपा अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते श्री. पवार विचारणा केली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाण्याचा व्यापार होणार नाही याकडे लक्ष देत पाणी गळतीची अन्य कारणेही शोधावीत असे सांगितले.
बैठकीला महानगरपालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सिंहगड रोडवरील उड्डाण पूलाचा आढावा
सिंहगड रोडवर होत असलेल्या उड्डाणपूलाच्या (singhgadh road flyover) प्रतिकृतीची (मॉडेल) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्कीट हाऊस येथे पाहणी केली.
आमदार भीमराव तापकीर यांनी उड्डाणपूल बांधताना स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात अशी मागणी केली. त्यास अनुसरून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने आराखड्यात काही बदल करावयाचा झाल्यास अधिकचा निधी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
उड्डाणपूल बांधताना पर्यायी रस्ते नागरिकांना उपलब्ध होतील याकडे लक्ष देऊन त्याठिकाणी असणारी खाऊ गल्ली, अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
24*7 योजनेची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे
: महापालिका आयुक्तांनी घेतला योजनेचा आढावा
: 7 टाक्यांचे काम भूसंपादन अभावी रखडले
: राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पाणीपुरवठा अधिकाऱ्याची भेट
पुणे शहरामध्ये काही भागांमध्ये एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने, त्यानंतर दोन दिवस पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होऊन, सदर भागातील पाणी पुरवठयावर काही प्रमाणात परिणाम होतो व पारिपुरवठा पुर्ववत होण्यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही भागांमध्ये स्थानिक अडचणींमुळे (उदा: पाण्याची लाईन लिकेज किंवा लाईन मध्ये अडथळा निर्माण होणे इ.) देखील पाणी पुरवठयाचा दाब कमी होणे, पाणी कमी वेळ मिळणे इ. तक्रारी उद्भवतात. तसेच काही सोसायटया किंवा इमारतींच्या नळजोडा मध्ये अडथळा निर्माण होऊन देखील त्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. सद्यस्थितीत उन्हाळा सुरु झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढून
पाण्याच्या प्रेशर मध्ये घट होत असल्याचे दिसून येते. पुणे महानगरपालिके मार्फत समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठयाच्या नेटवर्कचे काम सन २०१८ मध्ये सुरु करण्यात आले आहे. सदर योजने अंतर्गत शहराचे (नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावां व्यतिरिक्त) १४१ विभाग (झोन) प्रस्तावित असून, ५३ विभागांमधील काम बहुतांश पूर्ण झालेले आहे. सदर योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असून, सदर कामाचा वेग कोव्हिड १९ मुळे मंदावला होता. तथापि सद्यस्थितीत कामाचा वेग वाढविण्यात आला असून, सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
समान पाणी पुरवठा योजना : अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवणार
: गिरीश बापट आणि शिष्टमंडळला मनपा आयुक्तांचे आश्वासन
पुणे : महापालिका हद्दीत पाणी प्रश्न भेडसावत आहे. याबाबत कालच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. यावेळी खासदार गिरीश बापट यांनी यावरून सभात्याग केला होता. समान पाणी पुरवठा योजनेमुळे शहराच्या वितरण व्यवस्थेत विस्कळीत पण आला आहे. त्यावर आज खासदार बापट आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळ ने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले कि समान पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवली जाणार आहे.
वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींमुळे शहराच्या विविध भागात निर्माण झालेली पाणीपुरवठ्याची समस्या दोन-चार दिवसांत मार्गी लागेल असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
शहरात निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज बापट यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, उज्ज्वल केसकर, स्वरदा बापट, सुनील माने उपस्थित होते.
बापट म्हणाले, आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या पाच विभागांसाठी तंत्रज्ञांचा समावेश असणारी समिती उद्या नियुक्त केली जाईल. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांवर जबाबदारी टाकण्यात येईल. पाणीपुरवठ्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात येईल.
बापट पुढे म्हणाले, तांत्रिक बाबींमुळे काही भागात कमी आणि कमी वेळा पाणी येते. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. शहरात समान पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व माजी नगरसेवकांना आपआपल्या भागात पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही त्या ठिकाणी मी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहे. योजनेच्या प्रगतीचा अहवाल मागवला आहे.
पुणेकरांनी पाठविले दिल्लीत खा. बापट अडकले गल्लीत
– माजी आमदार मोहन जोशी
पुणे – समान पाणी पुरवठा योजना मार्गी लागत नाही अशा तक्रारी म्हणजे अपयशाची खासदार गिरीश बापट यांची कबुली आहे. महापालिकेत सत्ताअसताना झोपा काढल्यात का ? असा सवाल माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. लोकसभेचे अधिवेशन चालू असतानाही भाजपचे खासदार गिरीश बापट संसदेत गैरहजर आहेत. पुणेकरांनी त्यांना दिल्लीत पाठविले पण, ते गल्लीतच अडकले अशी अवस्था त्यांची आणि त्यांच्याबरोबर भाजपची झाली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
: समान पाणी पुरवठा योजना ५ वर्ष झोपा काढल्या का ?
पुण्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकार, राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांनी संसद अधिवेशन चालू असताना दिल्लीत राहाणे अपेक्षित आहे. अधिवेशन काळात सर्व खात्यांचे मंत्री, सचिव सहज उपलब्ध होतात आणि त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणे सोपे जाते. परंतु, खासदार गिरीश बापट दिल्लीत न जाता पुण्यातच थांबले आहेत आणि त्यांनी आपले आणि आपल्या पक्षाचे अपयश झाकण्यासाठी स्टंटबाजी चालविली आहे. समान पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने बापट यांनी महापालिका प्रशासनावर राग काढलेला आहे. भाजपने ही योजना प्रतिष्ठेची केली. पण, हातात सत्ता असूनही गेल्या पाच वर्षात भाजप ही योजना मार्गी लावू शकलेले नाही आणि आता योजनेच्या कामाला गती मिळत नाही अशी आगपाखड चालू केलेली आहे. आधीची पाच वर्षे बापटांकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते, आता ते खासदार आहेत या सर्व कालावधीत त्यांनी ही योजना मार्गी लावली असती तर, त्यांना दिल्ली सोडून पुण्यातच स्टंटबाजी करत अडकून पडावे लागले नसते, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
: बापटसाहेब,अपयशाब द्दल पुणेकरांना माफीपत्रं पाठवा
समान पाणीपुरवठा योजनेला सहकार्य करा याकरिता माजी नगरसेवकांना आवाहन करणारे पत्र खासदार गिरीश बापट पाठविणारा आहेत. भाजपच्या १०० नगरसेवकांना ‘आजी’ असताना जे जमले नाही ते आता ‘माजी’ झाल्यावर जमणार आहे का? सर्वच प्रकार हास्यास्पद आहे. नदीसुधार प्रकल्प, स्मार्टसिटी प्रकल्प अशा अनेक योजना पूर्ण करण्यात भाजपला अपयश आलेले आहे. वास्तविक या अपयशाबद्दल माफी मागणारी पत्रं खासदार बापट यांनी पुणेकरांना पाठवायला हवीत. पुणेकरांनी तुम्हाला दिल्लीत पाठवलंय, तेव्हा दिल्लीत जा, प्रश्न मार्गी लावा, आपल्या लोकांकडून कामें पूर्ण करुन घ्या, स्टंटबाजी थांबवा. या स्टंटबाजीला पुणेकर आणि तुमच्याच पक्षातील अनेकजण कंटाळले आहेत याचा विचार करा, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.