Tag: exam
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे | विशाल नरवाडे
| मिशन नवोदय सराव शिबिराचा विशाल नरवाडे यांचे हस्ते समारोप
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण (Integrated Tribal Development Project, Kalawan) अंतर्गत कनाशी व चणकापूर येथे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2023( Jawahar Navodaya Entrance Exam) करिता निवासी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सराव शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे मत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे (Assistant Collector and Project Officer Vishal Narwade IAS) यांनी व्यक्त केले.
मी जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी असून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्याच्या आयुष्याचे सोने होईल. मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी सुरू असून मार्गदर्शक शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, याबद्दल विशाल नरवाडे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जवाहर नवोदय परीक्षेकरिता सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कळवण प्रकल्पातील जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी राबविलेला हा पहिलाच उपक्रम असून जवाहर नवोदय पात्रता परीक्षा 2023 करिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड होईल अशी अपेक्षा श्री. विशाल नरवाडे (IAS) यांनी व्यक्त केली.
कळवण प्रकल्पांतर्गत चाळणी परीक्षेतून निवड झालेल्या मुलींचे निवासी सराव शिबिर कनाशी ता. कळवण येथे व मुलांचे निवासी शिबिर चणकापूर ता. कळवण येथे दिनांक 27 मार्च 2023 ते 27 एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे वेळापत्रक प्रकल्प कार्यालयाकडून निश्चित करण्यात आले होते. सकाळी योगा, जादा तास, सराव प्रश्नपत्रिका सोडविणे, मार्गदर्शन, शंका निरसन, खेळ, सुट्टीच्या दिवशी जादा तास असा दिनक्रम होता. निवासी शिबिर कालावधीमध्ये विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शनाबरोबर 15 सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सराव पुस्तिका, प्रश्नपत्रिका संच, इतर स्टेशनरी प्रकल्प कार्यालयाकडून पुरविण्यात आली होती. या सराव शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांच्या आहाराची विशेष काळजी घेण्यात आली होती.
सराव शिबिर समारोप कार्यक्रमात कु. किरण गायकवाड, कु. भूषण गायकवाड, कु. हितेश पाडवी, कु. सिमा महाले, कु. दुर्गा मुरे, कु. मयुरी चौरे आदि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधा व मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. आमच्यासाठी जवाहर नवोदय उपक्रम राबविला याबद्दल प्रकल्पाधिकारी श्री. विशाल नरवाडे यांना विद्यार्थ्यांनी धन्यवाद दिले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय पाहण्याची इच्छा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे व्यक्त केली, त्याच वेळी प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची मागणी तत्काळ मान्य करून जुलै महिन्यात सर्व विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय दाखवण्यात येईल, असे आश्वासित केले.
याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक प्रशांत कोकरे, सागर वानखेडे, मनोहर भोये, रविंद्र शिरसाठ, बालाजी सूर्यवंशी आणि सुवर्णा धाबळे यांनी मनोगत व्यक्त करून आम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यापुढेही असेच उपक्रम राबवून नाविन्यपूर्ण काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली. जवाहर नवोदय उपक्रम यशस्वी होण्याकरिता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री. विशाल नरवाडे(IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. प्रकल्प अधिकारी श्री. दिपक कालेकर, मुख्याध्यापक श्री. बालाजी भुजबळ श्री. केशव रौंदळ, विषय मित्र विजय नेटके, रामसिंग राजपूत यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
तसेच मार्गदर्शक शिक्षक खुशाल गायकवाड, कविता बागुल, पुष्पा पाटील, रामदास चाटे, भारती आहेर, वर्षा खरात, प्रकाश पवार, उत्तम भोये, विठ्ठल देशमुख, किशोर भिसे, त्रिवेणी देवकाते, सुनील ठाकरे, प्रशांत देशमुख, श्री. नामदेव हाके, धनंजय खरे, भाऊसाहेब उघडे, नामदेव वाजे, बापू गर्जे, जितेंद्र हाटकर, श्री.अशपाक पठाण आणि श्री. निलेश कासार यांनी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वरी रघुवंशी व मनोहर भोये यांनी केले.
शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार कडून अर्ज मागवले
| शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – २०२२ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ;
| मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर – राजपत्रित परीक्षा)यांनी कळविले आहे.
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ६२३ पदांसाठी १० हजार २०० उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत . पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.
या पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात आले आहे. तसेच लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पध्दतीने सादर करणे आवश्यक राहील त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील असेही लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार
– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई| एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.
सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.