Rahul Gandhi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे
भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

आगामी २०२४च्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या प्रभावामुळे मोदी सरकार व भाजपा सत्ते वरून फेकले जाणार हे लक्षात आल्यामुळेच, खा. राहुल गांधींवर विविध खटले दाखल करून व आरोप करून लोकसभेतून त्यांना अपात्र करणे हे षडयंत्र मोदी सरकार व भाजपाने रचले आहे. सुरत सत्र न्यायाल्याचा निकाल हा त्यातीलच एक भाग आहे. मात्र यामुळे आता देशातील कॉंग्रेस कार्यकर्ते पेटून उठले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून मोदी सरकारला कॉंग्रेस कार्यकर्ते निश्चित पराभूत करतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज दिली.

ते म्हणाले की, कर्नाटकातील कोलार येथे २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत जाहीरसभेत केलेल्या भाषणात ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? सर्व चोरांचे नाव मोदी का असते?’ अशी टीका कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेमुळे गुजरातमधील मोदी समाजाची मानहानी झाली असे सांगून दाखल केलेल्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा ठोठावली हा भाजपाचा राजकीय विशाल षडयंत्राचा भाग आहे असे मोहन जोशी म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपा म्हणजे भारत देश नाही असे असूनही लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेली टीका म्हणजे भारत विरोधी बाब आहे असे सांगत भाजपने गेल्या आठवड्यात संसद बंद पाडली हा देखील त्या षडयंत्राचा भाग आहे.

‘भारत जोडो’ यात्रेनंतर साऱ्या देशात बदलेल्या वातावरणामुळे मोदी सरकार व भाजपला धडकी भरली आहे. त्यातच प्रचंड महगाई, बेकारी आणि अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा यामुळे संतप्त झालेली देशातील जनता मोदी सरकार व भाजपला येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार याची प्रचिती भाजपला जागोजागी येऊ लागली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा निवडणूक ही त्याचीच प्रचिती आहे असे मोहन जोशी म्हणाले.

त्यामुळेच देशातील या मोदी सरकार विरुद्धच्या असंतोषाचे नेतृत्व करणारे कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना विविध खटल्यांमध्ये अडकवणे, त्यांची प्रतिमा डागाळणे आणि सत्र न्यायाल्याने शिक्षा दिल्याच्या नावाखाली त्यांना लोकसभेतील त्यांचे अध्यक्ष यांच्या मार्फत अपात्र करणे हे मोठे षडयंत्र भाजपा ने रचले आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, यामुळे कॉंग्रेस पक्ष झुकणार नाही. लोकशाहीतील निवडणूक आयोग सत्र न्यायालय यांच्यावर दडपण आणून स्वतःला हवे तसे निर्णय लाऊन घेतले जातात अशी टीका भाजपावर होत आहे. त्याचाच हा भाग असावा. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अडाणी प्रेम उघड झाल्यामुळे ते आणि त्यांचा भाजपा पक्ष घायकुतीला आला आहे त्याचेच हे बोलके उदाहरण आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राचा मुकाबला करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा आम्ही देतो असे मोहन जोशी यांनी शेवटी म्हटले.