Dalit Swayamsevak Sangh : धार्मिक कट्टरता नष्ट करण्यासाठी आता मनुष्य म्हणून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे  : ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी

Categories
cultural पुणे
Spread the love

धार्मिक कट्टरता नष्ट करण्यासाठी आता मनुष्य म्हणून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे

: ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी

 

पुणे : ‘जगभरातली धार्मिक कट्टरता ही मनुष्यजातीच्या मुळावर उठलेली असून सहिष्णुतेची आणि बंधुभावाची भावना वाढीस लागल्याशिवाय जगात शांतता आणि स्थैर्य लाभणार नाही.’ असे मत ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी यांनी व्यक्त केले. दलित स्वयंसेवक संघ अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्या वतीने आयोजित केलेल्या ३७९ व्या व्याख्यानमालेत “सध्याच्या जातीय व धार्मिक द्वेषाच्या परिस्थितीत बंधुत्ववादी मूल्यांची आवश्यकता” या विषयावर ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की असमानता, उच्चनीचता आणि धार्मिक सांप्रदायिकता, धार्मिक कट्टरता या कमी-अधिक प्रमाणात सर्वच धर्मांमध्ये आणि जगभरात जोपासल्या गेल्या आहेत. या धार्मिक कट्टरतेचा सर्वाधिक फटका हा कष्टकऱ्यांना बसलेला आहे. वर्चस्व गाजवणे, अधिकार गाजवणे आणि आपले स्थान अबाधित ठेवणे यासाठी धर्माचा उपयोग केला जात आहे. धार्मिक कट्टरता ही केवळ एका दुसऱ्या धर्मात चालत नसून हि सर्व धर्मांमध्ये जोपासली जाते आणि त्याचा तोटा हा जगाला सहन करावा लागतो. या असहिष्णू वातावरणामुळे माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे ही धार्मिकता नष्ट करण्यासाठी आता जात, धर्म, पंथ, भेद या सर्व गोष्टींना टाळून मनुष्य म्हणून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे बनले आहे.

ते पुढे असेही म्हणाले की,’ समकालीन काळात भारताचा विचार करता धर्म समतेची हमी देण्यात कमी पडत आहेत. देशातल्या लोकांमध्ये असहिष्णू वातावरणामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. देशाच्या विकासाला यामुळे निश्चितच खीळ बसते आहे. देशातील नागरिकांनी याचा विचार करून बंधुभावाची आणि सहिष्णुतेची गुंफण करून मार्गक्रमण केल्यास या धार्मिक कट्टरते वर आपण विजय मिळवू शकतो व देशाला एका नव्या उंचीवर पोहोचवू शकतो.’

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दादासाहेब सोनवणे यांनी भुषविले. सदर प्रसंगी संघप्रमुख राजू धडे, सोपानराव चव्हाण, साहेबराव खंडाळे, लक्ष्मण लोंढे, संदीप जाधव उपस्थित होते तर सुजित रणदिवे यांनी आभार मानले.

Leave a Reply