Prashant jagtap vs BJP : राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणतात : सत्ता भाजपची; दुर्दैव पुणेकरांचे

Categories
PMC Political देश/विदेश पुणे
Spread the love

राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणतात : सत्ता भाजपची; दुर्दैव पुणेकरांचे

पुणे : महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे कोविड काळातील अपयश झाकण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी जो गुणगौरव सोहळा केला, तो एकूणच हास्यास्पद आहे. कोविड काळात सर्वसामान्य पुणेकरांचे जितके हाल झाले तितके हाल राज्यातील इतर कुठल्याही शहरातील नागरिकांचे झाले नाहीत. नागरीक आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन हॉस्पिटलच्या दारात बेडसाठी मदत याचना मागत असतांना पुणे महानगरपालिका बेड शिल्लक असल्याचे खोटे डॅशबोर्ड रंगवून सर्व आलबेल असल्याचे भासवत होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सुद्धा महापालिकेवर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली होती, आणि आज त्याच महापालिकेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री कौतुक करून पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. असा आरोप राष्ट्रवादीची शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

योग्य नियोजन झाले असते तर…..

जगताप म्हणाले जर योग्य नियोजन झाले असते तर आज हजारो पुणेकरांचे प्राण आपण वाचवू शकलो असतो. राज्य सरकारने जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश देत , ५०% निधी दिला व ५०℅ निधी महापालिकेस देण्यात सांगितले तेव्हा ८ हजार कोटींची वार्षिक बजेट असणाऱ्या पुणे महानगरपालिकेने सपशेल हात वर केले व निधी देण्यास नकार दाखवत पुणेकरांना वाऱ्यावर सोडले , आज त्याच महानगरपालिकेचे केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री कौतुक करत आहेत.
कित्येक पुणेकरांकडून अव्वाच्या सव्वा दराने हॉस्पिटल बिलांमध्ये लूटमार झाली , अनेक कुटुंब या महामारीत कर्जबाजारी झाली तेव्हा शासकीय नियमानुसार बिल आकारावे यासाठी पालिकेने कुठल्याही उपाय योजना केल्या नाही , आज त्याच महानगरपालिकेचे केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री कौतुक करत आहेत.
लसीकरणाच्या नावाने जाहिरातबाजी करण्याचे काम सत्ताधारी भाजप करत असतांना, केवळ दीड रुपयांची सुई संपल्यामुळे २-२ दिवस लसीकरण केंद्रे बंद राहतात असे पुणे देशातील एकमेव शहर आहे. याची माहिती केंदीय आरोग्यराज्यमंत्र्यांना नसावी का?
जगताप पुढे म्हणाले, घरातील सदस्याच्या मृत्य नंतर ऍम्ब्युलन्ससाठी ४ तास वाट बघावी लागली, अंत्यविधीसाठी १२-१२ तासांचे वेटिंग लागले, या गोष्टी पुणेकर कधीही विसरू शकत नाही. एकूणच सत्ता भाजपची , अन दुर्दैव पुणेकरांचे अशी परिस्थिती हे शहर गेल्या ४ वर्षांच्या काळात बघत आहे. आगामी निवडणुकांसाठी केवळ चमडी बचाव कार्यक्रम सुरू केला असून अश्या चमकू प्रशासकांचा पुणेकारांना कधीही अभिमान नव्हता आणि राहणारही नाही.
संपूर्ण राज्यात सर्वात उशिरा रिकव्हरी होणारे शहर म्हणून राज्यात ओळख मिळवणाऱ्या पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कौतुक करणाऱ्या केंद्रीय आरोग्यराज्यमंत्र्यांना याबाबत कितपत ज्ञान आहे हा संशोधनाचा विषय आहे. असे ही प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply