Farm Laws : Chandrkant patil : चंद्रकांत पाटील म्हणतात; आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत

इचलकरंजी : शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते इचलकरंजी येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समुहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत.

त्यांनी सांगितले की, कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो व अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात आहे.

एसटीच्या खाजगीकरणाचा  प्रस्ताव आणणे म्हणजे कामगारांच्या जखमेवर मीठ चोळणे

एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी कामगार आंदोलन करत असताना खासगीकरणाचा प्रस्ताव आणणे म्हणजे कामगारांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे. सार्वजनिक हितासाठी सरकारनेच एसटी चालवायला हवी आणि जनहितासाठी एसटीचा तोटाही सरकारने सहन करायला हवा, असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांपैकी कोल्हापूरसाठी भाजपाने उमेदवार म्हणून अमल महाडिक यांच्या नावाची शिफारस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे. भाजपा, ताराराणी आघाडी व जनसुराज्य यांची एकत्रित मते ध्यानात घेता भाजपा ही जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

shivshahir Babasaheb Purandare : ‘शिवचरित्राचा महान उपासक गमावला’ : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

‘शिवचरित्राचा महान उपासक गमावला’

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली

 

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र सोप्या व रंजक भाषेत जनसामान्यांना समजावून देणारा आणि शिवचरित्राच्या अभ्यासासाठी आयुष्य समर्पित केलेला महान उपासक गमावला आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केली.

ते म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरीत्राचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. त्यांनी असंख्य ग्रंथ अभ्यासले, गड किल्ल्यांना भेटी दिल्या आणि सरदार घराण्यांकडून माहिती घेतली. अभ्यासाच्या आधारे त्यांनी शिवचरित्र अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने लोकांसमोर मांडले. महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची जाणीव करून देण्याचे आणि त्यांच्यात शिवप्रेरणा जागविण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी लाखो घरांपर्यंत शिवचरित्र पोहचविले. जाणता राजा या महानाट्याची निर्मिती करून त्यांनी शिवचरित्र नाट्यमय पद्धतीने समजावून दिले. आयुष्यभर शिवचरित्राची उपासना करणाऱ्या या महान उपासकाला भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो