Prashant Kishor : भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल  : प्रशांत किशोर यांचा मोदींना टोला

Categories
Breaking News Political देश/विदेश

भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल

: प्रशांत किशोर यांचा मोदींना टोला

उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपाचा ऐतिहासिक विजय म्हणजे २०२४ मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपा यशाची पुनरावृती करेल असा दावा गुरुवारी चार राज्यांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशानंतर बोलताना केलाय. मात्र आता यावरुन निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदींचा साहेब असा उल्लेख करत टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले?


भाजपाच्या मुख्यालयात केलेल्या भाषणात मोदींनी या चार राज्यांचे निकाल २०२४ मधील विजयाचे संकेत देत असल्याचं म्हटलं. ‘’उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता असे काही विश्लेषकांचे म्हणणे होते. उत्तर प्रदेशतील २०२२ च्या निकालाने २०२४मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले असे हे विश्लेषक आता सांगू लागतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २०२२ च्या उत्तर प्रदेशातील निकालातून स्पष्ट दिसतो’’, असे मोदी म्हणाले. २०१४ व २०१९ मध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, २०२४ची निवडणूक जिंकल्यास भाजपा सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल.

प्रशांत किशोर यांचा टोला


मोदींनी केलेल्या या वक्तव्याला प्रशांत किशोर यांनी विरोध केलाय. “भारतामधील सत्तेची लढाई २०२४ मध्येच लढली जाईल आणि तेव्हाच त्याचा निकाल लागेल. कोणत्याही राज्यांच्या निवडणुकांवरुन हे ठरणार नाही,” असं ट्विट त्यांनी केलंय. तसेच पुढे बोलताना, “साहेबांना (मोदींना) हे ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यातील निकालांवरुन असं (२०२४ च्या विजयाचं) वातावरण तयार करुन मानसिक दृष्ट्या विरोधकांविरोधात आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केलाय,” असा टोला प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचा थेट उल्लेख टाळत म्हटलंय.

तसेच प्रशांत भूषण यांनी मतदारांनाही आवाहन केलं आहे. “या खोट्या कथानकाला बळी पडू नका किंवा त्याचा भाग होऊ नका,” असंही ते ट्विटच्या शेवटी म्हणालेत.

Five State Election Results : पाच राज्यांचा निकाल : कुणाला किती जागा? महाराष्ट्राबाबत काय आहेत अंदाज? 

Categories
Breaking News Political देश/विदेश

पाच राज्यांचा निकाल : कुणाला किती जागा? महाराष्ट्राबाबत काय आहेत अंदाज?

: उत्तर प्रदेशमध्ये एकहाती भाजपा…

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपाची लाट दिसून आली. काल झालेल्या मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपाचा वारू चौखूर उधळला, तर पंजाबमध्ये आपनं जोरदार मुसंडी मारत दिल्लीबाहेर पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली. पण या सगळ्यामध्ये काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला असून एकाही राज्यामध्ये काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षासोबतच पक्षाच्या नेते-कार्यकर्ते आणि मतदारांचाही भ्रमनिरास झाला आहे. या पाचही राज्यांची अंतिम आकडेवारी आता समोर आली असून निवडणूक आयोगाकडून ती जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि सपानं भाजपाविरोधात रान उठवलं होतं. मात्र, त्याचा परिणाम मतदारांवर झाला नसल्याचंच कालच्या निकालांवरून समोर आलं आहे.

एकूण जागा – ४०३
भाजपा – २५५
सपा – १११
बसपा – १
काँग्रेस – २
राष्ट्रीय लोकदल – ८
इतर – २६

: पंजाबमध्ये आपची क्लीन स्वीप!

गेल्या काही महिन्यात पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलहाचा व्हायचा तोच परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसून आला. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू, चरणजीतसिंग चन्नी, प्रकाशसिंग बादल, कॅप्टन अमरिंदरसिंग अशा अनेक दिग्गजांना धूळ चारत ‘आप’नं बाजी मारली आहे. त्यामुळे दिल्लीबाहेर पहिल्यांदाच आपची सत्ता स्थापन झाली आहे.

एकूण जागा – ११७
आम आदमी पार्टी – ९२
काँग्रेस – १८
भाजपा – २
शिरोमणी अकाली दल – ३
इतर – २

: गोव्यात काँग्रेस सत्तेबाहेर

पंजाब आणि उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यात देखील काँग्रेसवर सत्तेबाहेर राहाण्याची वेळ ओढवली आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी बहुमत देऊन देखील ऐनवेळी घातलेल्या गोंधळामुळे काँग्रेसला सत्तेबाहेर राहावं लागलं होतं. यावेळी मतदारांनीच भाजपाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे.

एकूण जागा – ४०
भाजपा – २०
काँग्रेस – ११
मगोप – २
आप – २
इतर – ५

: उत्तराखंडमध्ये भाजपाच अव्वल!

उत्तराखंडमध्ये भाजपानं आपली सत्ता राखली आहे. इथे देखील काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आवश्यक तेवढी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपाच्याच पारड्यात आपला कौल दिला आहे.

एकूण जागा – ७०
भाजपा – ४७
काँग्रेस – १९
इतर – ४

: मणिपूरमध्ये भाजपाची एकहाती सत्ता

मणिपूरमध्येदेखील भाजपानं सत्ता राखली आहे. एकूण ६० सदस्यांच्या विधानसभेत भाजपानं बहुमताच्या पार आकडा गाठला असून त्यांना एकहाती सत्ता स्थापन करता येणार आहे.

एकूण जागा – ६०
भाजपा – ३२
काँग्रेस – ५
जदयू – ६
नागा पीपल्स फ्रंट – ५
नॅशनल पीपल्स पार्टी – ७
इतर – ५

या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर आता २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेध सगळ्यांना लागले आहेत. हे निकाल म्हणजे २०२४चीच रंगीत तालीम असल्याची प्रतिक्रिया भाजपाकडून दिली जात असताना काँग्रेसनं आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत.