PMPML in rural areas | ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत | सुप्रिया सुळे यांनी देखील केली होती मागणी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना सूचना

ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा (PMPML Bus Sevice) पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया (PMPML CMD Omprakash Bakoriya) यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील (Rural Area) नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवादेखील सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला होता. पत्राच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.‌ पीएमपीएमएल प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती‌. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना आज सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा होणार आहे.

| सुप्रिया सुळे यांनी देखील केली होती मागणी

पीएमपीएमएलने पुणे शहराच्या लगत असणाऱ्या व दौंड, मुळशी,पुरंदर, वेल्हा खडकवासल्याच्य ग्रामीण भागातील बससेवा बंद केली आहे. ती पुन्हा सुरु करणे गरजेचे आहे. याबाबत मी ट्विट देखील केले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये आणि शिक्षणातर अजिबातच राजकारण होता कामा नये. त्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती आहे की, पीएमटीमधून लाखो मुले शिक्षणासाठी पुण्याला येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनाही तो अधिकार आहे कारण ते देखील राज्याचे देशाचे नागरिक आहेत. अगोदर ही बससेवा सुरु होती अजितदादा पालकमंत्री असताना आपण बससेवेत वाढ केली होती. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, जेष्ठ नागरिक यांना त्याचा फायदा होत होता.पण आता पीएमटीने नवीन नियमावली केली आहे. त्याअंतर्गत ही सेवा बंद केली आहे.आपण पायाभूत सुविधा, रस्ते, मेट्रो यासाठी ज्याप्रमाणे निधी दिला जातो मग विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी निधी का दिला जावू शकत नाही. शिवाय या पीएमटीचा खर्च खुप कमी आहे. त्यामुळे माझी ईडी सरकारला विनंती आहे की ग्रामीण भागातील बंद केलेली सेवा पुन्हा एकदा मुलांसाठी सुरू करावी कारण ती फार संघर्ष करुन शिकत असतात.त्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही सेवा पुन्हा एकदा सुरु करावी. (MP Supriya Sule)