Emotional Corporators : PMC : कालावधी संपल्यानंतर पुणे महापालिकेतील नगरसेवक झाले भावुक  : काही नगरसेविकांना अश्रू अनावर 

Categories
Uncategorized

कालावधी संपल्यानंतर पुणे महापालिकेतील नगरसेवक झाले भावुक

: काही नगरसेविकांना अश्रू अनावर

पुणे : गेल्या पाच वर्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडणारे नगरसेवक आज मात्र, अखेरच्या निरोपाच्या मुख्य सभेत एकमेकांना केलेल्या मदतीची आठवणी सांगत, कोपरखळ्या मारत,काम करताना घडलेल्या गमतीशीर गोष्टींना उजाळा देत शेरोशायरी म्हणत निरोप दिला. सगळे नगरसेवक भावुक झाले होते. काही नगरसेविकांना निरोपाचे भाषण करताना अश्रू अनावर झाले.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत आज संपली, त्यामुळे निरोपाची अनौपचारिक मुख्यसभा आयोजित करण्यात आली होती. गोपाळ चिंतल यांनी महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सभागृहातील आठवणी सांगितल्या. ८० कोटी ते आठ हजार कोटी असा बजेटचा प्रवास पाहिला आहे. अनेक बाबी संग्रही करून ठेवण्यासारख्या आहेत, असे चिंतल यांनी सांगितले. ज्योत्स्ना एकबोटे यांनी मी प्राध्यापक म्हणून काम करताना नगरसेवक होऊन राजकारणात अनेक गोष्टी शिकता आल्या. मुक्ता जगताप म्हणाल्या, ” गृहिणी म्हणून काम करताना निवडणूक लढवली आणि थेट नगरसेविका म्हणून सभागृहात आले महापालिकेत नेमके कसे काम करतो मला काही माहिती नव्हते पण शहर सुधारणा महिला बालकल्याण समिती म्हणून काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मार्गदर्शन केले.

नंदा लोणकर यांनी पाच वर्षातील कामाचा आढावा घेतला. महिला काय करतील असा प्रश्न विचारला जायचा पण कोरोना च्या काळात सुद्धा आम्ही काम करून दाखवले. भविष्यात महापौर होणारच असे लोणकर यांनी सभागृहात ठणकावून सांगितले. त्याचे सर्व नगरसेवकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तर नगरसेविका पल्लवी जावळे यांना बोलताना अश्रू अनावर झाले. यासभेत ३० पेक्षा जास्त नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केले.

गेल्या पाच वर्षाचा प्रवास कसा संपला हे कळाले नाही. सत्ताधारी भाजप म्हणून काम केले पण विरोधकांनीही चांगले काम केले. पक्ष, विचार, तत्त्व वेगळे असेल तरी विकासासाठी व कोरोना च्या काळात सत्ताधारी व विरोधक एकत्र होते, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

गेल्या पाच वर्षातील शहरातील मोठे प्रोजेक्ट सुरू होऊ शकले. त्याचे निर्णय या सभागृहाने घेतले त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. याचा अभिमान आहे. विरोधक सत्ताधारी यांच्यात मतमतांतरे होती, पण विकासात एकत्र होते, असे भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश बीडकर यांनी सांगितले.