Shivsena | CM Uddhav Thackeray | वर्धापन दिन साजरा करताना मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले? 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पण विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल वेस्टइन इथं शिवसेनेचे आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळं याच हॉटेलमध्ये हा सोहळा घेण्याचं शिवसेनेनं निश्चित केलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले? 

विधानपरिषदेसाठी  पाडवी आणि सचिन अहिर यांना आंधळेपणाने उमेदवारी दिली नाही, त्यांनी शिवेसनेसाठी काम केलंय. त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. शिवसेनेने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

उद्याच्या निवडणुकीत आमच्यात फुट पडणार नाही. तुम्ही जरी देशात काहीतरी केलं तर इथल्या जनतेला कळतं. प्रत्येकाला पर्याय असतो. शेराला सव्वाशेर असतोच. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवून द्या, महाराष्ट्र पेटला तर एखाद्याला खाक केल्याशिवाय राहत नाही हे लक्षात असू द्या.

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे, तुम्हाला भाडौत्री सैन्या पाहिजे असतील तर सगळंच भाड्याने आणा ना. त्यासाठी टेंडरही काढा. अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ आहे. ही योजना उद्या तरूणांच्या अंगावर आली तर कोण झेलेल?

जी वचन पाळता येतील अशी वचनं जनतेला द्या. अग्निवीरांच्या नावाखाली तुम्ही तरूणांच्या आयुष्याशी खेळत आहात.

ह्रदयात राम आणि हाताला काम असं चित्र सध्या दिसतंय, हाताला काम नसेल तर नुसतं राम राम म्हणून काही होणार नाही. शिवसेनेने दिलेले वचन पाळले म्हणून आजही शिवसेना टिकून आहे. अग्निपथ मुद्द्यावरून तरूणांची माथी कुणी भडकावली?

शिवसेनेचा जन्म भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी झाला होता. हिंदुत्वाचा नारा शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी बुलंद केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस आदराने उभा राहतो, हा सन्मान कुणी काढून घेऊ शकत नाही, तो मान मला बाळासाहेबांनी दिला आहे. ज्याच्याकडे धाडस नसतं त्याच्याकडे काहीच नसतं.

विधानपरिषदेसाठी एकही मत फुटलेलं नाही. कारण शिवसेनेमध्ये असं गद्दार कुणी राहिलं नाही. शिवसेना या फाटाफुटीच्या राजकारणात उभी राहिली आहे. आईचं दुध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको असं शिवसेनाप्रमुख म्हणाले होते.

आपला रमेश गेला. तो कट्टर कार्यकर्ता होता. अशा कट्टर कार्यकर्त्यामुळेच शिवसेना उभी आहे.

: आज आमदारांना या हॉटेलमध्ये आपण बडदास्त ठेवलीए यालाच लोकशाही म्हणतात. आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही असेल. उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ते चांगल्यापद्धतीनं दिसलं पाहिजे.

मार्मिकच्या प्रिंटिंगला बंदी होती पण तो छापून घेऊन तो बाजारात पोहोचवण्याचं काम दिवाकर रावतेंनी केलं. तसेच ८५ नंतरच्या काळात मार्मिक वर्तमानपत्राच्या स्वरुपात येणार होतं. त्यावेळी बाळासाहेबांनी सुभाष देसाई यांना माझ्यासोबत काम करण्यास सांगितलं. तेव्हापासून आम्ही जोडलो गेले. देसाई आणि रावते वयानं माझ्यापेक्षा मोठे पण शिवसेना नेता म्हणून मला मानून मी जे बोलेल हे आदेश समजून त्यांनी काम केलंय. तुम्ही निवृत्त झालात असं समजू नका.दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्यामध्ये तेव्हाचा शिवसैनिक आजही जिवंत आहे.

शिवसेनेच्या स्थापनेवेळी सहा वर्षाचा होतो. स्थापनेच्या वेळी फोडलेल्या नारळाचं पाणी अंगावर उडलं होतं. ती जबाबदारी खूप मोठी होती हे त्यावेळी मला माहिती नव्हतं.

माझा पक्ष पित्याने स्थापन केल्यामुळे पितृपक्षच आहे.

  • संजय राऊत काय म्हणाले?

  • मी जेव्हा अयोध्येला गेलो होतो तेव्हा इतक्या लोकांचा माझ्याशी संपर्क होत होता तेव्हा कोणाच्या मनात राग, द्वेष होत नव्हता. हिंदुत्वाच्या शिलेदाराचा नातू येतोय या भावनेतून लखनौपासून अयोध्येपर्यंत सर्वांनी आमचं स्वागत केलं. त्यामुळं आपल्याला घाबरायचं कारण नाही. शिवसेना विचार असाच तेजानं फडकत राहिल. आज जे सर्व लोक पीर पीर आणि टीर टीर करत आहेत हे सर्वजण भविष्यात शिवसेनेच्या पायाशी येतील. आम्ही ईडीला घाबरत नाही, शिवसेनेच्या पायाशी याल तर तुडवले जाल. शिवसेनेची स्थापना अग्नितून झाली आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळं देशात अराजक निर्माण झालं आहे. महाराष्ट्र शांत यासाठी आहे कारण राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आहेत तोपर्यंत महाराष्ट्र शांत आहे. अग्निवीर काय असतं, सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहिती होतं. चार वर्षांचं कंत्राट जगाच्या पाठीवर असा मुर्ख निर्णय कोणी घेतला नाही. तुम्ही एक जागा जिंकली तर जग जिंकलं असं होत नाही, तुम्हारा घमंड तो चार दिन की है पगले.. शिवसेनेची बादशाही खानदानी आहे. आज फादर्स डे आहे पण शिवसेनाप्रमुख हे हिंदुत्वाचे फादर आहेत.