Taljai project: पाचगाव पर्वती आणि तळजाई विकास प्रकल्प क्षेत्र भिन्न

Categories
PMC Political पुणे
Spread the love

पाचगाव पर्वती आणि तळजाई विकास प्रकल्प क्षेत्र भिन्न

: तळजाई विकास प्रकल्पास अद्याप मान्यता नसल्यामुळे कोणतेच काम सुरू नाही

: प्रकल्प आर्किटेक्ट ची माहिती

पुणे: पुणे महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित तळजाई विकास प्रकल्पाला पूर्ण माहिती न घेताच केला जाणारा विरोध हा दुर्दैवी असून, त्यांच्या या भूमिकेमुळे या नियोजित प्रकल्पाचा प्रोजेक्टर आर्किटेक्ट म्हणून मला दु:ख झाले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या प्रकल्पाची योग्य माहिती घ्यावी, त्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसन निश्चित होईल. कारण सहकारनगर परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी घेतलेले आक्षेप हे तळजाई विकास प्रकल्पाला लागू नसून, त्याला लागूनच असलेल्या राज्य सरकारच्या पाचगाव पर्वती क्षेत्राशी निगडित आहेत. अशी माहिती तळजाई विकास प्रकल्पाचे
प्रोजेक्ट आर्किटेक्ट आनंद उपळेकर यांनी दिली.

: नैसर्गिक मातीचा वापर

उपळेकर यांनी सांगितले कि, पाचगाव पर्वती हा राज्य सरकारचा सुमारे सहाशे एकरचा जंगल भाग भिन्न असून, नजीकचा सुमारे 107 एकर परिसर पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असून, तेथेच तळजाई विकास प्रकल्प उभारण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील 107 एकर जमिनीपैकी यापूर्वी सुमारे पाच एकर जागेवर क्रिकेटपटू सदु शिंदे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले असून, यामध्ये कोठेही सिमेंट काँक्रीटचा वापर करून पक्के बांधकाम केलेले नाही. तर पूर्णत: नैसर्गिक मातीचाच यामध्ये वापर करण्यात आला आहे. या प्रस्तावित 107 एकरच्या प्रकल्पात सध्या नाममात्र मोठे वृक्ष असून, त्यांचीदेखील देखभाल या नियोजित प्रकल्पात केली जाणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारची उद्याने व अन्य सुविधांमध्येदेखील कोठेही सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम केले जाणार नसून, निसर्गाला जपण्यासाठी केवळ मातीचाच उपयोग केला जाणार आहे. तसेच या 107 एकर प्रस्तावित प्रकल्पात सुमारे 10 हजारांहून अधिक देशी वृक्ष लावले जाणार असून, त्यामुळे पक्षी, फुलपाखरे आदी मोठ्या संख्येने येथे येतील ही खात्री आहे. तळजाई विकास प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनी येथे लक्षात घ्यावे की, या परिसरात जेसीबीचे काम चालू असून, अनेक वृक्ष तोडले जात आहेत असे जे सांगितले जात आहे ते तळजाई विकास प्रकल्पाअंतर्गत येत नाही. पुणे महानगरपालिकेच्या तळजाई टेकडीवरील 107 एकरच्या विकास प्रकल्पाला अद्यापही स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली नसताना पुणे महानगरपालिका येथे प्रस्तावित विकास प्रकल्प सुरू कसा करेल, हा प्रश्न या पर्यावरणप्रेमींनी जरूर विचारात घ्यावा.
राज्य सरकारचे पाचगाव पर्वती क्षेत्र सुमारे 600 एकर हे नजीकच असून, तेथे जेसीबी अथवा वृक्षतोड याचा तळजाई विकास प्रकल्पाशी संबंध नाही तसेच पुणे महानगरपालिकेचाही काहीही संबंध नाही. काही पर्यावरणप्रेमींनी जेसीबीचा वापर व वृक्षतोड या पार्श्वभूमीवर येथील मोर नष्ट होतील असा सूर आळवला आहे. मोर नष्ट होत असतील तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, मोर हे राज्य सरकारच्या वन खात्याच्या सुमारे 600 एकर क्षेत्रात आहेत, तळजाई विकास प्रकल्प क्षेत्रात नाहीत. हा फरक येथे आवर्जून लक्षात घेतला पाहिजे.
मात्र, काही हितसंबंधी लोक तळजाई विकास प्रकल्प आणि पुणे महानगरपालिकेची 107 एकर जागा आणि राज्य सरकारची पाचगाव पर्वती म्हणून नोंदवली गेलेली सुमारे 600 एकर वन खात्याची जमीन एकच आहे असे भासवून दिशाभूल करीत आहेत याची नोंद पर्यावरणवाद्यांनी प्रामुख्याने घेतली पाहिजे. प्रस्तावित तळजाई विकास प्रकल्प हा पूर्णत: निसर्गाशी बांधील राहून नागरिकांच्या सामाजिक पर्यावरणवादी भूमिकेला साजेसाच असणार आहे.
 या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी पर्यावरणपूरक अशा या प्रकल्पाला सारे जण पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. या संदर्भात तळजाई विकास प्रकल्प नेमका समजून घ्यावा व त्याचे क्षेत्र समजून घ्यावे. यासाठी या प्रकल्पाचा प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणून मी पुढाकार घेऊन पुणे महानगरपालिकेत प्रशासनासमवेत बैठक आयोजित करण्याची विनंती मनपा प्रशासनास करीन  व या बैठकीस सध्या प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनीदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन मी करीत आहे. तसेच या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात नागरिकांच्या विधायक सूचनांचेदेखील स्वागतच होईल, हा विश्वास मला आहे.
मात्र, ‘साप साप म्हणून भुई थोपटण्यात’ अर्थ नाही. अशामुळे या परिसराचा मानबिंदू ठरणारा प्रकल्प विनाकारण बदनाम होत असून, मूठभर हिंतसंबंधितांचे हित साधले जाईल याची मला भीती वाटते. सध्या स्थायी समितीपुढे सादर केलेला प्रस्ताव काही कालावधीनंतर पुन्हा माननीयांनी पाहणी केल्यानंतर चर्चेत येईल. तेव्हादेखील या पर्यावरणप्रेमींनी त्यात सहभागी व्हावे. तळजाई विकास प्रकल्पास अद्याप मान्यता नसताना महानगरपालिकेतर्फे कोणतेही काम तेथे होऊ शकत नाही व केले जात नाही ही साधी गोष्ट नागरिकांनी लक्षात घ्यावी व राज्य सरकारच्या वन जमिनीशी व तेथील चालू असलेल्या कारवायांशी तळजाई विकास प्रकल्पाला जोडू नये, अशी विनंती मी या पत्रकाद्वारे करतो. हा प्रकल्प हा पुण्याचा मानबिंदू ठरेल व तो शंभर टक्के पर्यावरणपूरक असेल. कोणतेही सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम तेथे न होता पर्यावरणपूरक अशा प्रकल्पास नागरिकांनी माहिती घेऊन सहयोग करावा अशी विनंती मी पुनश्च करतो. असे ही आनंद उपळेकर म्हणाले.
—-

Leave a Reply