Aga Khan Palace : पाणीपट्टी थकल्याने आगा खान पॅलेस च्या नळ कनेक्शन वर कारवाई 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पाणीपट्टी थकल्याने आगा खान पॅलेस च्या नळ कनेक्शन वर कारवाई 

: महापालिकेने कनेक्शन कट केले 

पुणे : महात्मा गांधी यांना कैद करण्यात आलेले राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेस सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे होरपळून निघाले आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची पाणीपट्टी थकल्याने महापालिकेने या स्मारकाच्या उद्यानाचे पाणी तोडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पैसे न भरल्याने कायम हिरवागार व सुंदर असणारा या स्मारकाचा परिसर उजाड झाला आहे. महापालिकेने यासंदर्भात बैठका घेऊनही पैसे भरलेले नाही.

यासंदर्भात ॲड. सुनील करपे यांनी पुरातत्त्व खाते, महापालिकेकडे लेखी तक्रार केली आहे. नगर रस्त्यावर आगा खान पॅलेस हे ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणी देश परदेशातून पर्यटक येत असतात. आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधी यांना नजरकैद करण्यात आले होते. या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी व स्वीय सहाय्यक महादेव भाई देसाई यांची समाधी देखील आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या घडामोडींची साक्षीदार म्हणून आगाखान पॅलेसचे महत्त्व आहे.महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आगाखान पॅलेसची १९८९ पासूनची सुमारे २ कोटी रुपयांची थकबाकी असून, पाणीपट्टी भरावी यासाठी नोटीस पाठवली होती. त्यासंदर्भात बैठक होऊनही पाणीपट्टी भरलेली नव्हती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी पाणी तोडण्यात आले. याच काळात उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याविना या परिसरातील झाडे, हिरवळ सुकून गेली आहे. त्यामुळे हा परिसर रुक्ष झाला आहे.
ॲड. करपे म्हणाले, ‘‘ही वास्तू राष्ट्रीय स्मारक आहे. पण पाणी नसल्याने परिसरातील झाडे वाळून गेली आहे. महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या लाभलेल्या या वस्तूची अशी अवस्था करणे म्हणजे गांधीजींचाच अपमान आहे. पुरातत्व खात्याकडून या वास्तूकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एक नागरिक म्हणून यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
 आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘आगाखान पॅलेससाठी तीन नळ कनेक्शन आहेत. एक स्मारकासाठी, दुसरे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी व तिसरे उद्यानासाठी आहे. या तिन्ही कनेक्शनची सुमारे २ कोटीची थकबाकी आहे. पाणीपट्टी भरावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. पण प्रतिसाद न मिळाल्याने केवळ उद्यानाचे कनेक्शन तोडले आहे. तसेच महापालिकेने उद्यान व बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी शुद्ध केलेले मैलापाणी वापरावे असे आदेश काढले आहेत. ते पाणी येथील स्मारकाच्या उद्यानासाठी वापरावे अशी सूचनाही करण्यात आली आहे.आगाखान पॅलेसच्या या प्रश्‍नावर संबंधितांशी चर्चा केली जाईल.महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘आगाखान पॅलेससाठी तीन नळ कनेक्शन आहेत. एक स्मारकासाठी, दुसरे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी व तिसरे उद्यानासाठी आहे. या तिन्ही कनेक्शनची सुमारे २ कोटीची थकबाकी आहे. पाणीपट्टी भरावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. पण प्रतिसाद न मिळाल्याने केवळ उद्यानाचे कनेक्शन तोडले आहे. तसेच महापालिकेने उद्यान व बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी शुद्ध केलेले मैलापाणी वापरावे असे आदेश काढले आहेत. ते पाणी येथील स्मारकाच्या उद्यानासाठी वापरावे अशी सूचनाही करण्यात आली आहे. आगाखान पॅलेसच्या या प्रश्‍नावर संबंधितांशी चर्चा केली जाईल.

Leave a Reply