Chandrakant Patil Vs Shivsena : भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार! : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा : किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार!

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा

: किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

पुणे : किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.‌ पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माननीय चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणं, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंच सिद्ध होतं. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “किरीट सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याहीक्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाटील पुढे म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपानंतर माननीय उच्च न्यायालयाने दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. आता परमवीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्या ईडीला दिलेल्या जबाबातून मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची नावे येत आहेत. त्याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे विडंबन वृत्त सामनामधून प्रकाशित करण्याच्या कृतीवर बोलताना श्री. पाटील म्हणाले की, “सामना हा सवंग लोकप्रियतेसारखे आता गल्लीतले वृत्तपत्र झाले आहे. त्यामुळे आदरणीय रश्मी वहिनी यांनी सामनाचे संपादक पद सोडलं आहे का?” असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, किरीट सोमय्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला नाही. तर भारतीय जनता पक्ष उच्च न्यायालय आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply