Raireshwar fort | हिंदवी स्वराज्य शपथ दिन रायरेश्वर येथे विविध उपक्रमांनी साजरा

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Raireshwar fort | हिंदवी स्वराज्य शपथ दिन रायरेश्वर येथे विविध उपक्रमांनी साजरा

 

Raireshwar fort | हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे औचित्य साधून बांबू स्वराज्य मोहीम, औषधी वनस्पती अभियान, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन 

            छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तसमी’ १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली .या घटनेला एकुणात भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही. २०२४ हे वर्ष ‘हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिना’ चे ३७९ वे वर्ष आहे. यावर्षीदेखील सालाबादप्रमाणे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर, रायरी, ता. भोर, जि. पुणे  येथे केले आहे.

            सदर दिनाचे औचित्य साधून रायरेश्वर ग्रामस्थ संस्था – रायरेश्वर, बायोस्फिअर्स, ग्रामपंचायत – रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. चैत्र शु. सप्तमी तिथीनुसार ह्या वर्षी सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ ला हिंदवी स्वराज्य शपथ भूमी श्री रायरेश्वर मंदिर आणि परिसरात स. ६ ते दु. १.३० वा. पर्यंत अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन केले गेले जसे कि शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक, गड आणि ध्वज पूजन, मशाल मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व अभिषेक, ह.भ.प. श्री. राहुल महाराज पारठे यांचे विध्यार्थी मिरवणूक, बांबू स्वराज्य मोहीमेचे व बोधचिन्हाचे अनावरण, औषधी वनस्पतींचे वाटप, रोपण आणि मार्गदर्शन, श्री. गणेश मानकर लिखित ‘गाव तिथे रुद्राक्ष वृक्ष’ पुस्तिकेचे प्रकाशन, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान, श्री. संदीप खाटपे यांचे शिव-व्याख्यान, देव वृक्ष म्हणून सुपरिचित असलेल्या अजानवृक्ष, रुद्राक्ष, सुवर्णपिंपळ यांचे रोपण असे विविध उपक्रम साजरे झाले. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायांसोबत त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी, संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या संखेने उपस्थित होते.

            स्वराज्याच्या या सोहळ्यात श्रीमंत छत्रपति दमयंतीराजे उदयनराजे भोसले (राणीसाहेब), श्री. महादेव मोहिते, उपवनसंरक्षक (प्रा.) पुणे, डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. सचिन अनिल पुणेकर, श्री. युवराज राजे जेधे, श्री. दत्तात्रय जंगम, डॉ. दिगंबर मोकाट, श्री. अशोक सातपुते, श्रीमती शीतल राठोड, श्री. रवींद्र कंक, श्री. मंगेश शिळीमकर श्री. रवींद्र जंगम यांच्या सन्माननीय उपस्थितीत वर नमूद उपक्रम संपन्न झाले.

            सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंद्रजीत जेधे, महेंद्र देवघरे, समीर घोडेकर, गणेश मानकर, केदार कुलकर्णी, गणपत चोर, शैलेंद्र पटेल, अभिजित भसाळे, पराग शिळीमकर, सुनील चिकणे, सचिन देशमुख, नितीन कुडले, दीपक नवघणे, हरीश नवले, गणेश कोकाटे, संदीप जंगम, सखाराम जंगम, गणेश जंगम, मारुती जंगम, दशरथ जंगम, राजीव संत झाले यांचे मोलाचे योगदान मिळाले.

            या सोहळ्याच्या निमित्त श्रीमंत छत्रपति दमयंतीराजे उदयनराजे भोसले (राणीसाहेब) उपस्थितांना श्री क्षेत्र रायरेश्वर तसेच राज्याचा वारसा असलेले गडकोट संवर्धन, जतन व शाश्वत पर्यटनाबाबत सर्वांनी एकत्रित येवून शिवरायांना अपेक्षित असलेले सुराज्य निर्माण करण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व औषधी वनस्पती केंद्राचे प्रमुख डॉ. दिगंबर मोकाट यांनी स्थानिक औषधी वनस्पती व रोजगार निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी बांबू स्वराज्य मोहीम संकल्पना व मोहिमेची धेय्य-धोरणे बाबत संवाद साधला. या मोहिमेला पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक (प्रा.) श्री. महादेव मोहिते यांनी अनुमोदन दिले व शासनाच्या माध्यमातून बांबू स्वराज्य मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याची गरज व्यक्त केली.