Author Dnyaneshwar Jadhwar | मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी | आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र संपादकीय
Spread the love

Author Dnyaneshwar Jadhwar | मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी | आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य

 

मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी म्हणून ज्ञानेश्वर जाधवर यांच्या “आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य” (Aashechya Gungit lataklele Tarunya) या कादंबरीकडे बघता येईल. कारण प्रमाणिकपणे तरुण-तरुणींच्या जगण्याचे भाव विश्व यात उलगडत जाते. मानवाने निर्माण केलेल्या आक्राळ विक्राळ व्यवस्थेत तरुणांचे आयुष्य फरफटत जाते. त्यातून त्याला सावरता सावरता नाकी नऊ येतात. ज्यांना स्वतःला सावरता येत नाही ते आत्महत्या सारखा पर्याय जवळचा करतात. पण या कादंबरीतील गोष्ट व्यवस्थेच्या कचाट्यातून सुटण्यास मदत करते.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तरुणांचे स्वप्न हे मृगजळाप्रमाणे आहे. कारण हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि निवड मात्र काहींचीच होते. त्यातून तरुणांच्या तारुण्याच्या आणि जगण्याच्या समस्यां उभा राहतात. म्हणजे एकदा पास झाले नाही म्हणून परत परत परीक्षेला बसतात, त्यातून त्यांचे वय वाढत जाते, वाढत्या वयात हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो, बेरोजगार आहे म्हणून लग्न जुळत नाही. प्रेम करून लग्न करावं तर समाज मान्यता देत नाही, लग्न होत नाही म्हणून त्यांच्यांवर मानसिक दडपण येते, त्यातून शारीरिक व मानसिक आजार सुरु होतात. त्या आजारातून संपूर्ण कुटुंबाचं खच्चीकरण होतं, काहींना व्यसने लागतात. हे सर्व घडण्यापाठीमागे नेमकं काय आहे? याचा कथात्मशोध या कादंबरीत घेतला आहे.

मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्था निर्माण केली पण त्या व्यवस्थेतून डावे -उजवे अशी सरळ सरळ विचारांची दरी उभा केली. चतुर भांडवलदारांनी आधुनिक जगात लाखो सामान्य नागरिकांना शासकीय व खाजगी पद, प्रतिष्ठा मिळवण्याची आणि श्रीमंत होण्याची स्वप्न दाखवली. त्याचा परिणाम गांवागांवातील माणसांवर झाला. आणि ही माणसं आशेच्या गुंगीत जगू लागली. तर काही डाव्या – उजव्यांच्या पलीकडे जाऊन मानवी जगण्याकडे पाहू लागली. त्यांचे देखील अस्तित्व पणाला लागून लाखो तरुणांच्या जगण्याचे प्रश्न कसे आ वासून उभा राहिले. याचा धांडोळा घेणारी ही समकालीन साहित्यकृती आहे म्हणून महत्त्वाची ठरते.

कादंबरी : “आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य”
लेखक : ज्ञानेश्वर जाधवर
प्रकाशक : पुस्तकविश्व्
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
मांडणी : सारद मजकूर