Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत | भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत | भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

 

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | पुणे| उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म (Hindu Sanatan Dharma) संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असल्याची टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule BJP) यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘हर मंदिर स्वच्छता’ या देशव्यापी अभियानाचा राज्यातील शुभारंभ शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिर परिसरात केल्यानंतर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील प्रत्येक मंदिरात हे अभियान राबविण्याचा संकल्प त्यांनी या वेळी बोलून दाखवला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि राममंदिर अभियानाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, सुनील देवधर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, काँग्रेस पक्षाने नेहमी देशातील हिंदू समाजाचा अपमान केला आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना काँग्रेसने रामाचा जन्म काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. एनडीए सत्तेत आल्यास हिंदुस्थानातील सनातन धर्म संपविण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिन यांनी केली आहे. या एनडीए आघाडीचे उद्धव ठाकरे घटक आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंना मत म्हणजेच हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असा होतो. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तिसमोर लोटांगण घातले आहे.

‘हर मंदिर स्वच्छता अभियाना’ला देशातील जनता उत्स्फूर्तपणे सहयोग देत आहे. 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. या कालावधीत सर्व समाजातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी असे उपक्रम राबविले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असून, सर्व राजकीय पक्षांनी त्यात सहभागी होणे अपेक्षित आहे.

राज्यात जिल्हानिहाय महायुतीचे मेळावे आजपासून सुरू झाले असून पुढच्या काळात बूथ आणि विभागीय स्तरावर या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षातील नेते प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी काळात महाराष्ट्राला मोठे राजकीय हादरे बसतील. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत ही जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येत असून चीन सारख्या शत्रू राष्ट्राने ही ते कबूल केले आहे. मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आणि आमचा विचार स्वीकारणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत.