National Science Day | वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाने लोक अंधश्रद्ध | विशाल विमल

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे

National Science Day | वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाने लोक अंधश्रद्ध | विशाल विमल

| महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान

| दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी

National Science Day | आजची भौतिक प्रगती ही तार्किकता, सुसंगतपणा, चिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन या विज्ञानाच्या कसोट्यांमधून झाली आहे. लोक केवळ विज्ञानाच्या साधनांचा उपभोग घेत असून जीवनात विज्ञानाच्या कसोट्या उपयोगात आणत नाहीत. त्यामुळे लोक बुवाबाजी, अंधश्रद्धा, चमत्कार, ज्योतिष, भूतभानामती, करणी, कर्मकांड या गोष्टींना बळी पडत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष विशाल विमल (Vishal Vimal) यांनी केले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभियानात शहर आणि जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘जीवनाला समृद्ध करणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सप्ताह ‘ आयोजित केला होता. प्रश्नमंजूषा, पोस्टर प्रदर्शन आणि व्याख्यानासह प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले. मनोदय व्यसन्मुक्त संस्था पुणे, मुक्ता साळवे साळवे शाळा पर्वती, यशोदीप माध्यमिक विद्यालयात वारजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, युनिकॉर्न इंटरनॅशनल स्कुल पिंपरी सांडस, अहिल्यादेवी होळकर विद्यालय मिरवडी, न्यु इंग्लिश स्कुल शिरूर आदी ठिकाणी कार्यक्रम झाले. विशाल विमल यांच्यासह प्रवीण खुंटे, माधुरी गायकवाड, एकनाथ पाठक, लालचंद कुंवर, स्वप्नील भोसले, वैशाली कळसाईत, निशांत धाईंजे, रतन नामपल्ले, वैशाली सावित्री आदी कार्यकर्ते या अभियानात सहभागी होते. अंधश्रद्धा निर्मूलनासह वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार प्रचार महा. अंनिस सातत्यपणे करत आहे. विज्ञान दिनाच्या निमित्ताने अधिक भर देऊन अभियान राबविले जात आहे, असे विशाल विमल यांनी सांगितले.

आपल्याकडे तार्किक, सुसंगत, चिकित्सपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विचार व्यवहार करण्याची संस्कृती रुजविलेली नाही. अलिकडच्या काळात तर उलटा प्रवास सुरू आहे. समाजातील सर्वस्तरातील लोक धागेदोरे, अंगारे धुपारे, मंत्रतंत्र, पूजाअर्चा याच्या आधीन गेले आहेत. पाण्याचा दिवा पेटणे, अंगात संचार होणे, मंत्राने अग्नि प्रज्वलित होणे, बंद चिट्टीत लोकांनी लिहून ठेवलेले ओळखणे, पेटता कापुर खाणे, डोळे बंद असताना हलविलेली वस्तु ओळखने, मंत्राने पाणी गायब करणे आदी प्रयोग करून आजही लोकांना फसविले जाते. भोंदू लोक भौतिक क्रिया, हातचलाखी, रासायनिक अभिक्रिया, दिशाभूल करून प्रयोग सादर करतात. मात्र हे भोंदू लोक देवाधर्माचे नाव घेऊन अंगी सिद्धी असल्याने चमत्कार घडल्याचे सांगून लोकांना फसवितात. लोकही हजारोंच्या संख्येने भोंदूच्या मोहजालात फसत असल्याचे विशाल विमल यांनी सांगितले.
—–