MCCIA | Voting Awareness | मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार ‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

MCCIA | Voting Awareness | मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

 

MCCIA | Voting Awareness – (The karbhari News service) –  मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी संस्थेतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन चेंबरकडून लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी घेण्यात येत असलेल्या पुढाकाराची माहिती दिली.

पुणे शहरातील मतदानाचे कमी प्रमाण लक्षात घेता शहरी भागात आणि विशेषत: औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कामगारांना मतदान करण्यासाठी संस्थेने प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी व्यक्त केली.

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून आणि औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्षात भेट घेवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मतदान टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.

पुण्यातील नागरिकांना त्यांच्या नागरी हक्क आणि कर्तव्यांची सखोल जाणीव आहे. पुणे हे नागरी सहभागाच्या संस्कृतीचे वेगळेपण जपते आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिक मतदान करून ही परंपरा जोरकसपणे पुढे न्यायला हवी. त्यामुळे पुण्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रात मतदार जागृतीसाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढेल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचा मतदार जागृती उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल. पुणे जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रमुखांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Maharashtra Election commission | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Maharashtra Election commission | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

| पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

 

Maharashtra Election Commission – (The karbhari News Service) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत. (Loksabha Election 2024)

समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेत्री सान्वी जेठवानी, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तृतीयपंथी प्रणीत हाटे, तृतीयपंथी झैनाब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रणिता सोमण, शिवम लोहकरे, मिलिंद शिंदे, आरुष बेडेकर, वेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधे, मयुरी लुते, प्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

औरंगाबादमध्ये नवेली देशमुख, उस्मानाबादमध्ये राहुल लखाडे, धुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगी, गडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, गोंदियामध्ये मुनालाल यादव, जळगावमध्ये निलिमा मिश्रा, जालनामध्ये किशोर डांगे, डॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडे, लातूरमध्ये बसवराज पैके, मेघा पवार, सृष्टी जगताप, मुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीत, मुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगे, नांदेडसाठी भाग्यश्री जाधव, सृष्टी जोगदंड, कपिल गुडसुरकर, नंदूरबारसाठी प्रतिक कदम, रिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकर, सागर बोडके, पालघरसाठी विक्रांत केणी, पूजा पाटील, शुभम वनमाळी, भाविका पाटील, पुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर , आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.

रायगडसाठी तपस्वी गोंधळी, रत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी माने, सांगलीमध्ये संकेत सरगर, सातारामध्ये आदिती स्वामी, सिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारी, सोलापूरमध्ये तानाजी गालगुंडे, आनंद बनसोडे, प्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईर, वर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

यवतमाळमध्ये अंकुर वाढवे, आकाश चिकटे, चंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत पाईकराव, शुभम म्हस्के, सुनील तुरुकमाने, डॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.