PDEA | ओतूर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News Education पुणे
Spread the love

ओतूर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर अंतर महाविद्यालयीन ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी दिली.
ओतूर महाविद्यालयामध्ये संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “पर्यावरण व शिक्षण” या विषयावरील  रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर रांगोळी स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील ८८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सदर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा. सौ. आंद्रे मॅडम व प्रा.सौ.गोरडे मॅडम यांनी केले. सदर स्पर्धेमध्ये
कनिष्ठ विभागातून वैष्णवी तांबे व धनश्री चव्हाण यांनी प्रथम क्रमांक,  वैभव रानडे व किशोर जाधव यांनी द्वितीय क्रमांक तर साक्षी कसे व नेहाराम यांनी तृतीय क्रमांक संपादित केला. तसेच वरिष्ठ विभागातून तनुजा डुंबरे व अक्षया डुंबरे यांनी प्रथम क्रमांक, सोनम मस्के,सुरज हांडे, बोगसगाव प्रियंका टिकेकर,साक्षी डुंबरे यांनी द्वितीय क्रमांक तसेच नीतू यादव व कविता चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे माजी कुलगुरू मा.डॉ.पंडित विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले.
याबरोबरच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांचे  “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  – २०२०” व्याख्यान महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले.
डॉ.पंडित विद्यासागर आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अध्ययन व अध्यापन पद्धतीत अमुलाग्र बदल होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था,उद्योग संस्था,समाज यांच्या एकत्रित विचारातून व कृतीतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शैक्षणिक संस्था यांनी मनोधारणा बदलणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आंतरविद्याशाखीय शिक्षणातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी सतत नाविन्याचा ध्यास घेत नवनवीन गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकाची भूमिका ही फक्त अध्यापनाची न राहता मार्गदर्शकाची होणार आहे.
सदर वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे मानद सचिव ॲड.संदीप कदम यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
सदर व्याख्यानासाठी ऑनलाइन स्वरूपात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप कदम, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, सहसचिव मा. ए.एम. जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.डी.सोनवणे, डॉ. व्ही.एम.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव मा.ए एम जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. एस.एफ. ढाकणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. अमोल बिबे यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी केले.
उपप्राचार्य डॉ. व्ही एम.शिंदे उपप्राचार्य.डॉ.के.डी सोनावणे उपस्थित होते.
सदर व्याख्यानास इतर महाविद्यालयातील ऑनलाईन पद्धतीने २५० प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील व संस्थेच्या इतर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल बिबे, डॉ. निलेश काळे, प्रा. आजय कवाडे, डॉ. भुषण वायकर कार्यालयीन सेवक श्री दिपक बाबर यांनी विशेष परिश्रम घेतले.