काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवकची भाजपा विरोधात बॅनरबाजी
कोथरूड मधील सिटी प्राइड मल्टिप्लेक्स येथे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गिरीश गुरूनानी यांनी काश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांचा संदर्भ घेत भाजपा विरोधात बॅनरबाजी करत आंदोलन केले.
या वेळी माध्यमांशी बोलत असताना गिरीशी गुरनानी म्हणाले “भाजपा ने फक्त आणि फक्त मतांसाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटाचे जोरात प्रमोशन केले होते. कुठे फुकट चित्रपट दाखविणे, तर कुठे दमदाटी करून चित्रपट लावणे अश्या अनेक प्रकारातून भाजपा या चित्रपटाला पाठिंबा देऊन द्वेषाचे राजकारण करत होते. पण आज जेव्हा काश्मीर मध्ये खरेच काश्मिरी पंडितांच्या एका पाठोपाठ एक अश्या निर्घृण हत्या होत आहेत तेव्हा मात्र भाजपा या वर काहीच अँक्शन घेताना दिसत नाही.” भाजपा चे जे नेते “द काश्मीर फाईल्स” चे तोंडभरून कौतुक करताना थकत नव्हते, आता काश्मिरी पंडितांच्या हत्यांवर एक चकार शब्दही काढत नाहीत अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे ही गुरूनानी यांनी सांगितले. कंगना राणावत, आर्यन खान, हनुमान चालीसा, मशिदी वरचे भोंगे, ग्यानव्यापी मस्जिद इत्यादी मुद्दे भाजपा साठी जास्त महत्वाचे आहेत, पण काश्मिरी पंडितांचे प्राण नाही. त्यांच्या नेत्यांना लोकांच्या जीवांची काहीच काळजी दिसत नाही अशी घणाघाती टीका त्यांनी सत्ताधारी पक्षावर चढवली. जनतेला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन गरजेचे असल्याचे त्यांचे मत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे श्रीकांत बालघरे,संकेत शिंदे,ऋषिकेश कडू,रवी गडे,प्रीतम पायगुडे सामाजिक कार्यकर्ते राहुल खंदारे आदि उपस्थित होते.