Pune Airport New Terminal: विमानतळ टर्मिनल उदघाटनाचा मोदींनी फक्त इव्हेंट केला | माजी आमदार मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Pune Airport New Terminal: विमानतळ टर्मिनल उदघाटनाचा मोदींनी फक्त इव्हेंट केला | माजी आमदार मोहन जोशी

 

Pune Airport New Terminal- (The Karbhari News Service) – बहुचर्चित लोहगाव विमानतळ टर्मिनल २ चे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. प्रत्यक्षात मात्र हे टर्मिनल एवढ्यात कार्यान्वित होणार नाही, हे पाहाता निवडणुकीपुरता इव्हेंट करून मोदी यांनी अजब कारभाराचा नमूना दाखवून दिला आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

विमानतळ टर्मिनल २ चे बांधकाम सन २०२३ च्या ऑगस्ट महिन्यातच पूर्ण झाले असून आता ते विमान उड्डाणांसाठी तयार असल्याचे विमान प्रधिकरणाकडून सांगण्यात आले होते. पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन व्हावे यासाठी टर्मिनल तयार असूनही कार्यान्वित केलेच नाही. विमान प्रवाशांची वाढती मागणी पाहाता. येथील विमानतळ लवकर कार्यान्वित व्हावा, अशी प्रवाशांचीही मागणी होती. या मागणीला कोणी दाद देईना, तेव्हा काँग्रेस पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. त्यातून दबाव निर्माण झाल्यावर जानेवारी महिन्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोहगाव विमानतळाला भेट दिली आणि टर्मिनल विमान सेवेसाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली. फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान पुण्यात येऊन उदघाटन करणार, असे सांगितले जावू लागले. पालकमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पंतप्रधान आले नाहीत, पण त्यांनी नुकतेच ऑनलाईन पद्धतीने विमानतळ टर्मिनल २ चे उदघाटन केले. उदघाटन केले असले तरी अजून काही काळ टर्मिनल कार्यान्वित होणार नसल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधानांनी उदघाटन केलेला प्रकल्प चालू होत नाही, हा प्रकार अजब म्हणावा लागेल. इतिहासात काळ्या अक्षरात त्याची नोंद होईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाला पुण्याबद्दल आकस का? मेट्रो च्या सुरवातीला असाच घोळ घातला. त्यानंतर दर ५ किलोमीटर अंतरा इतके काम झाले की मोदी यांनी ३वेळा उदघाटन केले. नदी सुधार योजनेचे उदघाटन झाले, मात्र, काम रेंगाळले.हीच स्थिती स्मार्ट सिटी योजनेची आहे असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.