Tag: EVM
उद्या भारत बंद!
: कुणी आणि कशासाठी पुकारला? जाणून घ्या!
ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनोरिटी कम्युनिटीज एम्पॉलाइज फेडरेशनच्यावतीनं उद्या भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. ओबीसी प्रवर्गासाठी महत्त्वाचा मुद्दा असलेला जातनिहाय जनगणना आणि खासगी उद्योगांमधील आरक्षणाच्या मागणीसाठी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फ्रंटच्यावतीनं भारत बंदचं आवाहन करण्यात आल्याचं सांगितलं आहे. नॅशनल परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांकडून भारत बंदला पाठिंबा देण्यात आल्याचं वामन मेश्राम यांनी सांगितलं आहे.भारत बंदमध्ये ओबीसी समुदायानं सहभागी होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील वामन मेश्राम म्हणाले.
निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करु नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, खासगी क्षेत्रात एसी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षण, शेतकऱ्यांना एमएसपी देण्यात यावी, एनआरसी, सीएए आणि एनपीआर लागू करु नये, जुनी पेन्शन योजना लागू करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ, आदिवासींना संरक्षण, करोना प्रतिबंधक लस वैकल्पिक करणे, कामगार कायद्यांतील बदलांना विरोध या मुद्यांसाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
भारत बंदला बहुजन मुक्ती पार्टीकडून समर्थन देण्यात आलं आहे. नागरिकांनी भारत बंद यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न करावेत, असं डी.पी. सिंग म्हणाले. सोशल मीडियावरुन भारत बंदसंदर्भात आवाहन करण्यात आलं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि उद्योग बंद ठेवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
भारत बंदला कशा प्रकारे प्रतिसाद मिळणार?
बामसेफकडून भारत बंदचं आवाहन करण्यात आलं असलं तरी या बंदला कशा प्रकारे पाठिंबा मिळणार हे पाहावं लागणार आहे. भारत बंदचा प्रभाव किती प्रमाणात जाणवतो हे देखील पाहावं लागेल.