Pune-Bengaluru highway Accident | पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी काय करणार उपाययोजना?

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune-Bengaluru highway Accident | पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

Pune-Bengaluru highway Accident |  पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bengaluru highway) स्वामी नारायण मंदिराजवळ (Swami Narayan Temple) २३ एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताच्या अनुषंगाने अपघाताची कारणे आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख(Pune Collector Dr Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. (Pune-Bengaluru highway Accident prevention)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. Pune-Bengaluru highway Accident

यावेळी स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत परिवहन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती असते. यातून वाहनांचा वेग वाढतो. वाहनाला सतत ब्रेक लावल्यामुळे ब्रेकमध्ये अनावश्यक उष्णता व दाब निर्माण होऊन तत्कालीन स्थितीत ब्रेक काम करेणासे होतात. हेदेखील अपघातांचे महत्त्वाचे कारण ठरू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

जड वाहनांची वेगमर्यादा घटविणे आवश्यक
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा घटवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने ट्रक मालक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, असे निर्देष जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

एनएचएआय, पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह सेव्ह लाईफ फाऊंडेशन संस्थेने सुचविलेल्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका
या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांतर्गत तसेच कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस चौकी स्थापन करणे, त्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरी पूल दरम्यान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरची संख्या वाढवणे, तातडीचे मदत देण्यासाठी पोलीस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवणे, दरी पुलाजवळ सेवा रस्त्याला जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी हाईट बॅरिकेट्स बसवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

नियम तोडणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी 2 इंटरसेप्टर वाहने
राष्ट्रीय महामार्गाच्या या लांबीत वाहतूक नियमांचे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना तातडीने रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेला एक आणि ग्रामीण पोलीसांना एक अशी दोन इंटरसेप्टर वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन करावयाच्या उपाययोजनांतर्गत कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्याअनुषंगाने लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री यांची बैठक होणार असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी सांगितले.

वाहन चालविताना ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्याचा पर्याय उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण तयार करणेही उपयुक्त ठरेल, असेही यावेळी सुचविण्यात आले.

Road ‘Safety’ | Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर (Mumbai Pune Expressway) अपघाताचे (Road Accident)  प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा (Road Safety) जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत (RTO) करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते.

त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी ६ पथके व १५ अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमांतर्गत दोन्ही महामार्गावर विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) तसेच अपघाप प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करणे, त्याठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्व उपाययोजना करणे आणि वाहन चालकांच्या माहितीकरीता त्याठिकाणी घडलेल्या अपघातांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे आणि रस्त्यावर वाहतुकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे. दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर उद्घोषणा करुन जनजागृती करणे. इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. उजव्या मार्गिकेत ट्रक, बस, कंटेनर आदी कमी वेगाने चालणारी वाहने, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. विना हेल्मेट, विना सिटबेल्ट प्रवास करणाऱ्या चालकांवर आणि प्रवाशांवर कारवाई करणे आदी उपाययोजना या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या हेतूने ‘सुरक्षा’ हा उपक्रम प्रथमच परिवहन विभागामार्फत राज्यात सहा महिन्यांच्या कालावधीकरीता सुरु करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत पहिले ७ दिवस दोन्ही महामार्गावरील महामवरील टोल नाक्यावर व वाहनांवरील पीए प्रणालीमार्फत जनजागृती व उद्घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व वाहतुक नियमांचे पालन करण्याच्या हेतूने कारवाई करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महामार्ग पोलीस, स्वयंसेवी संस्था आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ८० टक्के पेक्षा जास्त अपघात हे चालकांचा निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असल्याचे दिसून आले असून चालक व नागरिकांनी वाहन चालवतांना नियमांचे पालन करण्यासाठी करण्याचे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.