PMRDA Election : Prashant Jagtap : शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतली  : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली खंत 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतली

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली खंत

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. त्याबद्दल, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते, सर्व विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे नगरसेवक व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चितच आमचा उत्साह दुणावणारा आहे. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले. अशी खंत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार नियोजन समितीच्या एकूण २२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात व शिवसेनेचा एक असे आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व माजी मंत्री आदरणीय सचिनभाऊ अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गटनेते, शहरप्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेली ही ‘पीएमआरडीए’ नियोजन समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे, राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे, अशी भावना पक्षाचे वरिष्ठ नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांची होती. काँग्रेसचे संख्याबळ पाहता एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचे निश्चित होते. त्यामुळे, काँग्रेसने उमेदवार उभा करू नये, अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आम्हीही आग्रही विनंती करीत होतो. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले. बुधवार, दि. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले आहेत.

आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चित आमचा उत्साह दुणावणारा आहे. तसेच, हा निकाल आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन या निवडणुकीच्या निकालात दिसून आले असून, आगामी काळातही ते दिसून येईल, यात काही शंका नाही. मात्र, कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच मत त्यांच्यावर लादणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे काँग्रेस या आघाडीचा भाग होऊ शकली नाही, याची निश्चितच खंत वाटते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागत आहे, याचेही आम्हाला निश्चितच एक मित्रपक्ष म्हणून वाईट वाटते. परंतु, या निकालाने राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहर पातळीवरील नेत्यांनी, नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी जी एकी दाखवून दिली, ती निश्चितच यापुढेही यशस्वी, विजयी वाटचालीची ठरेल, यात काही शंका नाही.

 

Shivsena : pathholes : खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा

Categories
PMC Political पुणे

खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा

पुणे – पुण्यातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. टिळक रोडवर मोर्चा निघणार असल्याचे कळताच याचा धसका घेत महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले. पुण्यात भाजपचे खासदार, आमदार असताना तसेच महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना शहरात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावे देत शिवसेनेने हे अनोखे आंदोलन केले आहे.

: ठेकेदार सत्ताधाऱ्यांना विचारत नाहीत

संजय मोरे म्हणाले की, शहराचा विकास केल्याची फ्लेक्सबाजी करून मिरविणाऱ्या आणि ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखविणा-या सत्ताधारी भाजपची लाज पुण्यात पडलेल्या खड्ड्यांनी काढली. अनेक रस्त्यांवर खड्डे कायम असून, काही ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने पॅच वर्क करण्यात आले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खडी उखडून आली असून, त्यावरून गाडी घसरून पडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. पुण्याला स्मार्ट बनविण्याची स्वप्ने दाखविणारे कारभारी साधे रस्ते नीट तयार करू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. ठेकेदार हे महापालिकेचे जावई असल्याच्या थाटात वावरत आहेत. त्यांच्यावर सत्ताधारी कोणताही वचक निर्माण करू शकले नाहीत. ठेकेदार सत्ताधाऱ्यांना विचारत नाहीत. किंमत देत नाहीत. मनमानी कारभार करतात. त्याचाच फटका पुणेकरांना बसतो.

पाच वर्षे संपत आली, तरी भाजपाला पुणेकरांना साध्या सुविधा देखील देता आलेल्या नाहीत. ठेकेदारांना वाचविण्यासाठी आता रस्त्यांची कामे करण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की, रस्ते करताना केलेला खर्च वाया, रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई काहीच नाही आणि रस्ते दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी. प्रत्येक वेळी स्वतःचे खिसे भरण्याचे विक्रम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ‘न खाऊंगा ना खाने दूंगा.’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचा विसर पडलेला दिसतो आहे, असेही मोरे यांनी सत्ताधारी भाजपावर आसून ओढताना म्हटले आहे.

शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, नगरसेविका पल्लवीताई जावळे, विशाल धनवडे, अशोक हरनावळ, महिला शहराध्यक्ष संगीता ठोसर, संगीता मते, सुदर्शना त्रिगोनाइत, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, गजानन पंडीत, कामगार सेनेचे अनंत घरत, मकरंद पेटकर, मनिष जगदाळे, सुरज लोखंडे, सनी गवते, निलेश गिरमे, उमेश गालिंदे, श्रीनाथ विटेकर, रुपेश पवार, संदीप गायकवाड, वैभव हनमघर, चंदन साळुंखे, मुकुंद चव्हाण, प्रतिक आल्हाट, प्रसाद चावरे, स्वाती कथलकर, छाया भोसले, गायत्री गरुड, परेश खांडके, रवि भोसले, राजू चव्हाण, दिलीप पोमन, प्रसाद काकडे उपस्थित होते.