Devendra Fadnavis | नेता नाही, नीती नाही, नियत नाही – देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका 

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Devendra Fadnavis | नेता नाही, नीती नाही, नियत नाही – देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका

 

Devendra Fadnavis – (The Karbhari News Service) – महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नसून, त्यांची अवस्था दिशाहिन झाली आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही आणि नियत ही नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Mahavikas Aghadi)

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील देवधर यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पुण्याचे जे ट्रान्सफमेशन दिसत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारमुळे आहे. आम्हाला पुण्याला एक व्हायब्रंट शहर बनवायचे आहे. देशातले टेक्नॉलॉजीचे शहर म्हणून विकसित करायचे आहे. जो काही विकास दिसतोय तो आमच्या काळातील आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून, गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहरात चांगले काम केले. आता मुरलीधर मोहोळ यांच्या सारखा तरुण तडफदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. जनता मोदींच्या पाठीशी असून, राज्यात महायुतीच्या मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील.

——-

चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री 

जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वा तीन लाखाचे मताधिक्य होते. जर यापेक्षा अधिक मताधिक्य मोहोळ यांना द्यायचे असेल तर प्रत्येक बूथवर 75 टक्के मतदान झाले पाहिजे आणि त्यापैकी 75 टक्के मतदान महायुतीला होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. संपूर्ण जिल्ह्यात आपले नातेवाईक आहेत. त्यांना सर्वांना महायुतीला मतदार करा असे आवाहन करा.

——-

मुरलीधर मोहोळ 

राजमाता जिजाऊ यांनी ज्या भूमीत सोन्याचा नांगर फिरवला आणि हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जी कर्मभूमी म्हणून ओळखली जाते अशा पुण्यासारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शहरात महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना मनापासून आनंद झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, गृहमंत्री अमितभाई शहा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, आरपीआयचे नेते रामदासजी आठवले आणि महायुतीतील घटक पक्षांनी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करीन.

श्रद्धेय अटलजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माझे मार्गदर्शक गोपीनाथजी मुंडे, गिरीश बापट, मुक्ता टिळक यांची आज मला प्रकर्षाने आठवण होत आहे.

संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली विकासाची यात्रा २०१४ मध्ये सुरू झाली आहे. ही यात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे करीन.

पुण्यात पुढील पन्नास वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. त्याचा प्रारंभही झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात ५० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत.

पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मूलभूत सुविधा पुरवतानाच पुण्याची ओळख स्वच्छ पुणे, प्रदूषणमुक्त पुणे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे पुणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे पुणे अशी होईल यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करीन. पुण्याची ओळख आयटी हब अशी देखील आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक उद्योग येतील आणि त्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होईल, यावरही आमचा भर राहील. उत्तम आरोग्य सेवा पुणेकरांना मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातील.

पुणेकरांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी आणि ते अधिक उंचावण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य सरकारकडे पुण्याचा खासदार म्हणून मी पुण्याची बाजू प्रभावीपणे मांडेन, याची ग्वाही देतो.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून पुणेकरांनी भरघोस आणि विक्रमी मतांनी मला निवडून द्यावे, असे आवाहन यानिमित्ताने करतो.

माझे कार्य आणि लोकसंपर्क यातून पुणेकरांचा हक्काचा खासदार म्हणून माझी ओळख निर्माण करण्यात मी निश्चितपणे यशस्वी होईन.