Rights of Rivers Campaign | मुळा, मुठा सहित पुणे जिल्ह्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Rights of Rivers Campaign | मुळा, मुठा सहित पुणे जिल्ह्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम

Rights of Rivers Campaign | नद्यांचे हक्क, माझी जबाबदारी याची जाणीव ठेवत पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील 7 नद्यांसाठी राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम (Rights of Rivers Campaign) राबवण्यात येणार आहे. यामध्ये  भारताचे वॉटरमॅन राजेंद्र सिंग (Waterman Rajendra Singh), आंतरराष्ट्रीय नदी तज्ज्ञ परिणीता दांडेकर (Parinita Dandekar) सहभागी होणार आहेत. अशी माहिती पुणे नदी पुनरुज्जीवन (Pune River Revival) संस्थेच्या वतीने देण्यात आली. (Rights of Rivers campaign)

याबाबत संस्थेच्या वतीने सांगण्यात आले कि, 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. भारतीय राज्यघटना साजरी करण्याचा दिवस. आपण जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहोत जिथे संविधानाने हे मान्य केले आहे की स्वच्छ आणि सुरक्षित नैसर्गिक वातावरण हे नागरिकांच्या जीवनाच्या अधिकाराचा एक भाग आहे आणि ते राखणे हे देखील नागरिकांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन, पुण्यातील नद्यांच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी एकत्र आलेल्या 60 हून अधिक संस्था आणि व्यक्तींची संघटना पुणे नदी पुनरुज्जीवन (पीआरआर) भीमा खोऱ्यातील मुळा, मुठा, रामनदी, पवना, इंद्रायणी, भामा आणि भीमा या 7 नद्यांसाठी ‘राईट्स ऑफ रिव्हर्स मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 पर्यंत 3 दिवसांसाठी आहे.
जीवितनदी, एन. ए. पी. एम., जलबिरादरी, जलदिंडी प्रतिष्ठान, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री आळंदी धाम सेवा समिती, मनहर्ष फाऊंडेशन, रंजाई, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, निसर्गसेवक, सजग नागरिक मंच आणि इतर अनेक संस्थांद्वारे ही मोहीम एकत्रितपणे राबवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय नदी तज्ज्ञ . परिणीता दांडेकर 26 जानेवारी रोजी या मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. 28 जानेवारी रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत. आर. जे. संग्राम हे सन्माननीय अतिथी असतील आणि तीनही दिवशी तरुणांशी संवाद साधतील.
सांडपाणी आणि प्रदूषणमुक्त अशा नैसर्गिक मुक्तपणे वाहणाऱ्या स्वच्छ नद्या निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये तसेच सरकारी संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट आहे. ज्या 7 नद्यांवर ही मोहीम राबवली जाणार आहे, त्या सर्व ठिकाणी पाण्याचे नमुने गोळा केले जातील. आगामी दशकांमध्ये हवामान बदल आणि पर्यावरणीय -हासाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि जिवंत जलसाठे ही अन्न सुरक्षेची तसेच शहरी शाश्वततेची गुरुकिल्ली असल्याने, युवकांना त्यांच्या स्वतःच्या भविष्याचे रक्षण करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयांशी संपर्क साधला जात आहे. असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.