Spread the love

पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

: शिवसेनेची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काशी विश्वेश्वर मंदिरात केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत गौरवोद्गार काढले होते. या कार्यक्रमाला काही दिवस होत नाहीत तोच भाजपशासित कर्नाटक राज्यात शिवरायांची विटंबना होते आणि या घटनेतील गुंडांवर कारवाई करण्याऐवजी मराठी माणसाचाच आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, हे जास्तच संतापजनक आहे. संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाची विटंबना करणाऱ्या गुंडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. त्यामुळे यापुढे शिवरायांचा असा अवमान करण्यास कोणीही धजावणार नाही. अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून केली गेली.

याबाबत शहर शिवसेना अध्यक्ष संजय मोरे म्हणाले,  कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची  कानडी गुंडांनी केलेली विटंबना अत्यंत संतापजनक आहे. भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आणि आदर दाखवते, एवढंच काय छत्रपती शिवराय का हाथ भाजप के साथ अशा घोषणाही देते. आणि दुसऱ्या बाजूला भाजपशासित कर्नाटकात वारंवार छत्रपतींचा अवमान होतो, ही गोष्ट आपण व आपल्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करणारी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या याविषयी भावना अतिशय तीव्र आहेत. देशातील कुठलाही शिवरायांवर प्रेम करणारा माणूस छत्रपतींचा अपमान कदापि सहन करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजानी सर्व जाती धर्मांची रक्षा करून तमाम हिंदुस्तानात एक आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदूं धर्माची अस्मिता  आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कुशल रणनीतीचे धडे केवळ हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात दिले जातात. अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले आहेत. मात्र, शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राशेजारील कर्नाटक राज्यात त्यांचा अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. गेल्या वर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता पुन्हा त्यांच्या पुतळ्याची कानडी गुंडांनी विटंबना केली. या घटनांमधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी द्वेष स्पष्ट होत आहे. तसेच कर्नाटकाकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार सुरूच आहेत.

आज आपण पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमीपूजनासाठी आला आहात. आपल्या हस्ते आज भूमिपूजन झाले आणि कर्नाटक मध्ये आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री घडलेल्या निंदनीय आणि अपमानास्पद घटनेला क्षुल्लक घटना म्हणून संबोधित करतात आणि ह्या घटनेचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये डांबत आहेत किती हा विरोधाभास ? एक प्रकारे ते ह्या घटनेचे समर्थनच करत आहेत. हे अतिशय अशोभनीय आणि निंदनीय आहे आपल्याच पक्षाच्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असे वक्तव्य होणे हे आपल्या हस्ते होणारे आज चे भूमिपूजन निरर्थकच ठरवत आहे. हे या घटनांवरून दिसून येत आहे. आपण देशाचे गृहमंत्री म्हणून कर्नाटक सरकारने दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याचे तेथील मुख्यमंत्र्यांना आदेश पारित करावेत. आज जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा  वापर फक्त निवडणुकीत आणि भाषणापूरता करून बाकी काहीही झाले तर दुर्लक्षित करणे योग्य लक्षण नाही ह्याला वेळीच आळा घालणे खूप आवश्यक आहे.

 

Leave a Reply