Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी

| प्रभू श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याच बरोबर

पुणे|  कसब्यातील विधानसभेच्या विजयानेच भारतीय जनता पक्षाला झुकवले आहे. काँग्रेसने प्रभू रामचंद्राला यासाठी साकडे घातले होते. ते मान्य झाले. श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याबरोबर आहे हे यावरूनच सिद्ध होत आहे अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी घरपट्टीतील सवलत पुन्हा लागू करणाऱ्या राज्य सरकारला लक्ष्य केले.

जोशी म्हणाले, मुळातच ही सवलत काढून घेण्याचे काही कारण नव्हते. महापालिका स्वायत्त संस्था आहे. त्यांनी विशेष ठराव करून अनेक वर्षांपूर्वी ही सवलत लागू केली होती. पैसे कसे काढता येतील याच विचारात असलेल्या भाजप सरकारने ही सवलत वेगवेगळी कारणे दाखवत काढून घेतली. या कारणांचा निपटारा सरकारला त्यांच्या स्तरावर आधीच करता येणे शक्य होते. मात्र त्यांनी तसे केले नाही.

नागरिकांकडून ओरडा सुरू झाल्यानंतरही त्याकडे शिंदे फडणवीस सरकारने लक्ष दिले नाही. वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. पुणेकर जनतेला फसवत राहिले.
महापालिका प्रशासनाने ही सवलत काढून घेतलेली बीले तर पाठवलीच, शिवाय त्यात ४ वर्षांपासूनची थकबाकीही दाखवली. साधी सदनिका असलेल्या कुटुंबांवरही यामुळे २० हजार रूपयांपेक्षा जास्त बोजा पडला.
काँग्रेसने या विरोधात सातत्याने आंदोलने केली. अखेर मंत्री मंडळाने ठराव केला, मात्र तरीही प्रशासन बधत नव्हते. मंत्री मंडळही मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उदासिन होते.

पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तर या विषयाची माहिती नसल्यासारखे हात वर केले. काँग्रेसने अखेर प्रभू रामचंद्रांचरणी साकडे घातल्याचे आंदोलन केले. आता सरकारला सुबुद्धी आली व त्यांनी हा निर्णय अंमलात आणण्याविषयी महापालिकेला क‌ळवले. त्यामुळे या गोष्टीचे फुकटचे श्रेय भाजपच्या शहरातील एकाही नेत्याने घेऊ नये, हा पुणेकरांचा विजय आहे व त्यांनाच याचे खरे श्रेय आहे असे जोशी म्हणाले.