Vetal Tekdi | MP Supriya Sule | वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार |खासदार सुप्रिया सुळे 

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार | खासदार सुप्रिया सुळे

| टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिले.

सुळे यांनी आज वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांसोबत टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. शहराचा विकास झालाच पाहिजे. आपण स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही विकासाच्या बाजूनेच आहोत, तथापि विकास करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याकडे लक्ष द्यायलाच हवे. त्यासाठी स्थानिक नागरिकांशी चर्चा करायलाच हवी. त्यासाठी आपण विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

कोथरूड हून पुणे विद्यापीठ तसेच पाषाण-बाणेर-औंध या भागात जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करून वाहतूक कोंडी कमी।करण्यासाठी पुणे महापालिकेने नव्या रस्त्याचे नियोजन केले आहे. यात बालभारती ते पौड फाटा रस्ता तसेच कोथरुड, पाषाण आणि सेनापती बापट रस्ता या दोन रस्त्यांना जोड देण्यात येणार आहे. यासाठी वेताळ टेकडी फोडून दोन बोगदे आणि एक पूल उभारण्यात येणार आहे. तथापि याला शहरातील पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध असून गेल्या आत्यावड्यापासून हा विषय शहरात चांगलाच गाजत आहे. यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीही स्थापन झाली असून या समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. १६) खासदार सुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते.

त्यानुसार आज दुपारी खासदार सुळे यांनी समितीच्या सदस्यांसोबत वेताळ टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या भावना समजून घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. टेकडी फोडून प्रस्तावित रस्ता आणि बोगदे रद्द करावेत तसेच वेताळ टेकडीला ‘नैसर्गिक वारसास्थळ’, ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून जाहीर करावे, अशी समितीची मागणी आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे चर्चा व्हायलाच हवी असे त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, हर्षद अभ्यंकर, सुषमा दाते, प्रदीप घुमरे, अवंती गाडगीळ, गौरी मेहेंदळे, अंगद पटवर्धन यांच्यासह स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.