Tag: Rajesh Tope
कालानुरुप बदलणाऱ्या तंत्रज्ञान, कौशल्यास अनुसरुन राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर
– कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या कालसुसंगत व अद्ययावत कौशल्यवृद्धीकरिता “कौशल्य श्रेणी वर्धन” धोरण राज्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी काल शासन निर्णय निर्गमित करून राज्याचे कौशल्य श्रेणीवर्धन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मंत्री टोपे म्हणाले की, रोजगार निर्मिती हे कोणत्याही देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे सूचक, दर्शक असते. आज जागतिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे रोजगाराचे स्वरूप कालानुरुप बदलत आहे. जागतिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश क्षेत्रांमध्ये स्वयंचलन (Automation) होत आहे. रोजगाराच्या विविध क्षेत्रातील या बदलत्या गतिशिलतेचा वेग लक्षात घेता सध्या अस्तित्वात असणाऱ्या रोजगारासंबंधीच्या कौशल्य अभ्यासक्रम/जॉब रोल्सची मागणी कमी होवू शकते अथवा संपुष्टात येऊ शकते. यानुषंगाने रोजगार विकसनशीलतेच्या प्रक्रियेमध्ये अनुकुलता सुनिश्चित करण्यासाठी मागणी असलेल्या क्षेत्रातील कौशल्यांच्या श्रेणीसुधारणीमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. कौशल्य प्रशिक्षण अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला व्यापकपणे “कौशल्य वर्धन” (Upskilling) म्हणून ओळखले जाते. या अनुषंगाने राज्यात कौशल्य वर्धनाला चालना देण्यासाठी धोरण जाहीर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या धोरणामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. अद्ययावत कौशल्य (Fresh Skilling) म्हणजे एखादे नवीन कौशल्य प्रशिक्षण ग्रहण करून त्याद्वारे रोजगारक्षम बनण्याची प्रक्रिया याला चालना देण्यात येणार आहे. कौशल्य वर्धन (Upskilling) या घटकाअंतर्गत अल्पकालीन लक्षित प्रशिक्षणावर भर देण्यात येईल. यामध्ये सामान्यत: प्रारंभिक कौशल्य प्रशिक्षणानंतर त्याच क्षेत्रातील प्राप्त ज्ञान व क्षमताकुशलता यांना सुधारित किंवा अद्यायावत करण्याची प्रकिया तसेच प्राप्त कौशल्याचा स्तर वाढविणे व तो अधिक प्रगत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. पुर्नकुशलता (Reskilling) या घटकांतर्गत प्रारंभिक कौशल्य प्रशिक्षणानंतर औद्योगिक आस्थापना किंवा बाजारपेठेतील मागणीनुसार इतर क्षेत्रातील नवीन कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
तांत्रिक प्रगती आणि आधुनिकीकरणामुळे औद्योगिक आस्थापनाच्या
बदलत्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळाच्या मागणीचा कौशल्य वर्धनाद्वारे पुरवठा करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील औद्योगिक उपक्रमांमधे 18 ते 45 वर्षे वयोगटातील मोठा युवा वर्ग कार्यरत आहे, ज्यांच्याकडे काही मूलभूत कौशल्ये आहेत परंतु त्यांची विद्यमान कौशल्ये सुधारण्याची आवश्यकता आहे. अशा युवा वर्गास प्रशिक्षित करणे हे कौशल्य वर्धन धोरणाचे उद्दिष्ट आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
मंत्री टोपे म्हणाले की, दीर्घकालीन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संधी प्रदान करणे तसेच उद्योग व नियोक्त्यांसोबत (मालकासोबत) भागीदारी वाढविणे हा राष्ट्रीय कौशल्य योग्यता आराखड्याच्या (National Skill Qualification Framework – NSQF) मुख्य घटकांपैकी एक घटक आहे. कौशल्य श्रेणी सुधारीत करण्यासाठी आणि उद्योगाच्या मागणीनुसार दीर्घकालीन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी “कौशल्य वर्धन” ही एक अविभाज्य प्रक्रिया आहे. NSQF हे देशातील कौशल्य विकासाच्या प्रयत्नांना अद्ययावत ठेवण्यासाठी आणि उद्योगाच्या आवश्यकतांनुसार एक प्रमाणित अभ्यासक्रम व दृष्टिकोण तयार करण्यासाठी मदत करेल.
राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने (NSDC) मे 2021 मध्ये कौशल्य प्राधान्य निर्देशांक अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अहवालानुसार विस्तृत कौशल्य विकास उपक्रमांच्या गरजेसंदर्भात महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावरील मोठे संबंधित राज्य आहे. याअनुषंगाने राज्याने आता निश्चित केलेले कौशल्य वर्धन धोरण हे कौशल्य विकासातील मध्यस्थ म्हणून पुढील वाटचालीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन; सक्ती नाही
: आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आल्याचं वृत्त दिलं होत. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य सचिवांनी काढलेल्या पत्रकामध्ये मास्क घालणं हे मस्ट (Must) असं म्हटलं आल्यानं राज्यात मास्कसक्ती करण्यात आल्याचा सर्वांचा समज झाला. पण हा मस्ट शब्द सक्ती असा न वाचता केवळ मास्क वापरण्याचं आवाहन असा वाचून मीडियानं लोकांना सांगावं. त्यामुळं मास्क नसल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.टोपे म्हणाले, आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळं केंद्रीय आरोग्य विभागानं आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील. याबाबतीत परवा टास्कफोर्सच्या बैठकीत हे ठरलं, आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं ते सक्तीचं असू नये. त्यामुळं दहा पंधरा दिवस जी वाढ दिसून येत आहे, त्यानुसार बंद ठिकाणं जसं की बसेस, रेल्वे, शाळा, कार्यालये असतील तिथं मास्क वापरावं. खुल्या ठिकाणी त्याला शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण करा, बूस्टर डोस घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीनं महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.डिग्री नसलेल्या कथीत डॉक्टरांवर कडक कारवाई होणारडिग्री नसलेले, लायसन्स नसलेले जे लोक वैद्यकीय व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कडक आणि सक्तीनं कारवाईच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशा लोकांवर फौजदारी कारवाया झाल्या पाहिजेत असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मी गृहमंत्र्यांनाही विनंती करणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस
| राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.
मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समुह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरीकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मी लस घेणार नाही असं म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांना नक्की भेटणार
: आरोग्यमंत्री राजेश टोपे
बारामती : किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी मी स्वत: लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही. असे नाशिकमध्ये एका किर्तनात बोलताना वक्तव्य केले आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे हे इंदुरीकर यांना नक्कीच भेटणार असल्याचे सांगितले आहे. बारामतीत बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
टोपे म्हणाले, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना शास्त्रीय दृष्टीकोनातून, अध्यात्मिक दृष्टीकोनातून महाराजांकडे ज्ञान आहे. मी स्वत: वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन. किर्तनकार देशमुख ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्कीच भेटून बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
”गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे ते बाधित झाले नाहीत. महाराजांनी स्वत:ला जरुर प्रोटेक्ट केलेले असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सींग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर कोविड लसीला महत्त्व आहे. लस ही कवचकुंडल आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होत नाही असे नाही, परंतु लस घेतल्यावर रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचत नाही, त्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही, आयसीयूमध्ये दाखल करावे लागत नाही. लसीमुळे लसीमुळे शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे लस घेणे गरजेचे आहे. काही समाजामध्ये लसीबाबत गैरसमज आहेत. त्यांच्या धर्मगुरुंशी आम्ही बोलून लसीची उपयुक्तता पटवून दिली आहे. इंदूरीकरांनाही मी लक्ष घालून यासंबंधी निश्चित सांगणार असल्याचे टोपे म्हणाले आहेत.”
आमचे आकडे नेहमीच बिनचूकच; दिशाभूल करण्याचा विषयच नाही
”केंद्र व राज्याच्या आकडेवारीत जर काही फरक असल्यास जुळवणी करण्याचे काम केले जाईल. ‘को विन’ अॅपवर अत्यंत पारदर्शीपणे अपडेटेड डेटा असतो. त्या ‘डेटा’च्या अनुषंगानेच आकडेवारी तयार होते. कोविडच्या काळात आकड्यांबाबत कधीही चुकीची माहिती आम्ही दिलेली नाही. रुग्णांचे आकडे असोत कि मृत्यूचे असोत की आता लसीकरणाचे असो. आमचे आकडे नेहमीच बिनचूकच असतात. त्यामुळे दिशाभूल करण्याचा विषय राहतच नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकता हा आमचा मूल सिद्धांत राहिला असल्याचे टोपे यांनी सांगितले.”