Suresh Kalmadi | आता मी येत राहीन…! सुरेश कलमाडींच्या या वक्तव्याची राजकारणात चांगलीच चर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

आता मी येत राहीन…! सुरेश कलमाडींच्या या वक्तव्याची राजकारणात चांगलीच चर्चा

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. तब्बल दहा वर्षानंतर कलमाडी महापालिकेत आले. महापालिका आयुक्तांना पुणे फेस्टिव्हलचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली असली तरी मी पुन्हा येईन, या त्यांच्या विधानामुळे कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का, अशी चर्चा सुरू झाली.

राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यावेळी विरोधकांनी सुरेश कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना ९ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्यानंतर कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गेल्या काही वर्षांपासून ते शहराच्या राजकारणापासून अलिप्त राहिले होते. मात्र कलमाडी यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याने ते पुन्हा सक्रिय होतील, अशी चर्चा शहराच्या राजकारणात सुरू झाली आहे.

कलमाडी यांच्याकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. काही दिवसांपूर्वी फेस्टिव्हलच्या नियोजन बैठकीतही कलमाडी उपस्थित होते. या फेस्टिव्हलचे निमंत्रण आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी कलमाडी महापालिकेत आले. दहा वर्षानंतर महापालिकेत आल्याने प्रदीर्घ वर्षानंतर महापालिकेत आलात, असा प्रश्न कलमाडी यांना विचारण्यात आला तेंव्हा आता मी कायम येत राहीन, असे उत्तर त्यांनी दिले.
दहा वर्षांपूर्वी पर्यंत कलमाडी म्हणजे पुणे असेच समीकरण होते. महापालिकाही कलमाडी गटाकडे होती.

कलमाडी यांच्या आदेशानुसारच काँग्रेस पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत होत्या. कलमाडी हाऊस हे सत्ता केंद्र झाले होते. पुण्याचे कारभारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. करोनाच्या दोन वर्षानंतर सुरेश कलमाडी पुन्हा एकदा पुणे फेस्टिवलच्या परवानगीसाठी महापालिकेत आले. तरीही सुरेश कालमाडींची महापालिकेतील उपस्थिती काँग्रेस विरोधकांच्या मनात धडकी भरविणारी ठरली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी कलमाडी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत गणपती विसर्जन मिरवणुकीला उपस्थित होते. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते.