Tag: onion
सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय
पुणे | वाहतुकीला अडथळा होतो म्हणून रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला त्रास देणे महापालिका अतिक्रमण विभागाला चांगलेच महागात पडले आहे. कारण या विरोधात शेतकरी आणि सदाभाऊ खोत यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. खोत यांच्या आंदोलनांतर महापालिकेने शहरात 50 ओपन मार्केट सुरु करण्याचे नियोजन केले आहे. या जागेवर बसून शेतकरी आपला माल विकू शकतात. त्यासाठी प्रति दिन 100 रुपये भाडे आकारले जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
शहराच्या विविध भागात हे मार्केट असतील. शेतकऱ्यांसाठी गाळे उपलब्ध करून दिले जातील. मात्र जुन्या मार्केट शेजारी हे गाळे नसतील. याठिकाणी शेतकरी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आपला माल विकू शकतील. लवकरच महापालिका यावर अंमलबजावणी करणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
| सदाभाऊ खोत यांनी महापालिकेसमोर विकले कांदे!
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल 40 हजार रूपयांचा दंड लावू असे सांगितले होते. तसेच गेल्या आठ दिवसापासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी पळवित होती. त्याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सोमवारी महापालिकेच्या दारातच कांदा विक्री केली.
शेतकरी आधीच होरपळला असताना महापालिकेची ही कारवाई त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाने तातडीनं ही कारवाई करणाऱ्या तसेच गाडी सोडण्यासाठी शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. या वेळी खोत यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी कांदे विकले.
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
|मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र
——-
शुल्क व करपरतावा माफीचा लाभ सुध्दा वाढविण्याची विनंती
मुंबई: काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना केली आहे.
यासंदर्भामध्ये दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, कांदा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून देशातील एकूण उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन 2021-22 मध्ये 136.70 लाख मे.ट. झाले जे की त्यापूर्वीच्या वर्षीपेक्षा 20 लाख मे.टनाने जास्त होते. एकंदरच बाजारपेठेतील किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले. एरवी श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात होते मात्र, तेथील आर्थिक संकटामुळे या आयातीमध्ये देखील अडचणी आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्याकडील शेतकऱ्यांना निर्यातीतून उत्तम किंमत मिळणे शक्य होत नाही.
केंद्र सरकारने देखील निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि कर माफीच्या योजनेत (Remission of Duties and Taxes on Export Products- RoDTEP) 2 टक्के ऐवजी 10 टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा अशी राज्य सरकारची विनंती देखील नाकारली आहे.
आपल्या मंत्रालयाने या योजनेत 10 टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायद्याच होईल. त्याचप्रमाणे सध्या नाफेडकडून कांदा खरेदी सुरु आहे ती आणखी 2 लाख मे.टनाने वाढवावी अशी देखील विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाफेडने यापूर्वीच 2.38 लाख मे.टन कांदा खरेदी यावर्षी एप्रिल ते जून मध्ये केली आहे. आणखी 2 लाख मे.टन खरेदी केल्यास कांदा उत्पादकांना किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल असे मुख्यमंत्री म्हणतात.