Prashant Jagtap Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, तर या ‘सैरभैर टोळी’चे प्रमुख असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलनच बिघडलेले आहे. त्यातूनच, ते काहीही बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. ‘ना घर का ना घाट का,’ अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोक्याचे आहे. त्यामुळे, त्यांनी घरी जावे. घरातील माय-माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहात असतील. दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

जगताप  म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी संसदरत्न खासदार व आमच्या नेत्या  सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा अकलेच्या दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या वक्तव्यातून समस्त महिला वर्गाबाबत पाटील व ते ज्या मुशीत घडले आहेत, त्या मातृसंस्थेची काय मानसिकता आहे, हे दिसून आले आहे. महिला भगिनींना केवळ चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित ठेवण्याच्या या मानसिकतेतून बाहेर येऊन पाटील यांनी सध्या महिला कोणत्या क्षेत्रात किती प्रगती करीत आहेत, हे पाहण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या सुप्रियाताईंशी पंगा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी करू नये. सुप्रियाताईंना घरी बसविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत त्यांनी किती जंग पछाडले आहे आणि आतापर्यंत ते कितीवेळा तोंडावर आपटले आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.

एकदा राज्यसभा आणि तीनवेळा लोकसभेत निवडून आलेल्या सुप्रियाताईंचा संसदेतील आणि राजकारणातील अनुभव काय आहे, हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याची आणि त्याबरोबरच आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची जन्मजात देणगी मिळाली आहे. आदरणीय सुप्रियाताईही या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच लीलया पार पाडतात, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंना महिला म्हणून ‘घरी जा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा,’ असे म्हणत समस्त महिला वर्गाचा जो अवमान केला आहे, महिलाशक्तीला डिवचण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, त्याचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.

बरे, सुप्रियाताईंनी ‘मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन कुणाची भेट घेतली होती,’ इतका साधा प्रश्न उपस्थित केला होता. जर, भाजप नेत्यांच्या कृतीमध्ये काही काळेबेरे नव्हते, तर या प्रश्नावर सरळ उत्तर देता आले असते. परंतु, सुप्रियाताईंनी नेमके वर्मावर बोट ठेवल्याचा परिणाम पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडण्यात झाला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही.

महिला वर्गाचा अवमान करून पताका फडकावल्याचा आव आणणारे पाटील यांनी घरी जावे. आपल्या घरात स्वयंपाक करणाऱ्या माय – माऊलींपुढे उभे राहून आपण करून आलेला पराक्रम सांगावा. तेव्हा ती माय-माऊलीही तुम्हाला ‘मसणात जा’ बोलल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चितपणे सांगू शकतो.

मुळात, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी भाजपला घरी बसविल्याचा राग या ‘सैरभैर टोळी’कडून वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने व्यक्त होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे मजबूत सरकार आहे, हे या ‘सैरभैर टोळी’ने समजून घेण्याची गरज आहे. आता घरी बसलाच आहात, तर स्वयंपाकही शिकून घ्या. त्यात कमीपणा काही नाही. पण, जेव्हा तुम्ही घरी स्वयंपाक करू लागाल, तेव्हाच तुम्हाला माय-माऊलींची किंमत कळेल, त्यांचे दु:ख कळेल, एक महिला काय करू शकते, हे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास पुन्हा कोणत्याही महिलेचा अनादर करण्यासाठी तुमची जीभ धजावणार नाही, यात तीळमात्र शंका नाही. असे ही जगताप म्हणाले.

Analysis | PMC Election | भाजपला कसली भीती सतावतेय? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपला कसली भीती सतावतेय?

पुणे : महापालिका निवडणुकीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे आता शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार? भाजप पुन्हा एकदा 100 के पार करणार का? का महाविकास आघाडीचाच जोर चालणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र 100 नगरसेवक घेऊन सत्तेत बसलेल्या भाजपाला मात्र आता पुन्हा तेवढ्याच जोमाने सत्ता येईल, असा विश्वास राहिलेला नाही.
भाजपाला हा आत्मविश्वास नसण्याला देखील तशीच कारणे आहेत. कारण भाजपला पूर्ण बहुमत असल्याने शहराचा संतुलित विकास करण्याची संधी होती. त्यानुसार सुरुवातीला भाजपने पुणेकरांना तशी स्वप्ने दाखवली देखील. मात्र त्या स्वप्नाचा पाठपुरावा भाजपाला करता आला नाही. बऱ्याच मोठ्या प्रकल्पाची स्वप्ने दाखवली गेली होती. शिवाय शहराच्या हिताच्या दृष्टीने काही महत्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण करणारच, असा विश्वास देखील भाजपने दिला होता. पुणेकरांना देखील हा विश्वास खरा वाटला. मात्र ते प्रकल्प पूर्ण होऊच शकले नाहीत. त्यामध्ये समान पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, मोठे रस्ते, अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यातील काही प्रकल्प सुरु होऊन देखील त्याचा फारसा फायदा झालेला दिसला नाही.
शिवाय भाजपने बाहेरून आलेल्या नगरसेवकांना आपले कधी मानलेच नाही. त्यामुळे त्यांनाही भाजप कधी आपलासा वाटला नाही. त्यामुळे पालिकेत काही लोकांचीच मक्तेदारी होऊन बसली. अर्थातच तिथेच विकासाला खीळ बसण्यास सुरुवात झाली. 100 नगरसेवक असताना देखील फक्त तोकडेच लोक प्रतिनिधित्व करताना दिसत होते. ही गोष्ट पुणेकरांच्या देखील ध्यानात यायला वेळ लागला नाही. सत्तेच्या उत्तरार्धात पदाधिकाऱ्यांचे देखील एकमेकांशी पटत नव्हते. यातच कहर म्हणजे निसर्गाने किंवा नशिबाने देखील भाजपाला साथ दिली नाही. कोरोनाचा कहर चांगला दोन वर्ष चालला. याही काळात थोड्याच लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. शिवाय प्रशासनातील प्रमुखांनी देखील भाजपाला फार काही करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पूर्ण 5 वर्ष मिळून फार उपयोग झाला नाही.
भाजपमध्ये बरेचसे लोक हे पालिकेत नवीन होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही गोष्ट हेरली होती. त्यामुळे कामे करताना भाजपच्या नगरसेवकांची फारच दमछाक होऊ लागली. इकडे विरोधी पक्षातील कसलेले नगरसेवक मात्र झटक्यासरशी काम करून घेत होते. भाजपच्या नगरसेवकांना जेव्हा तांत्रिक माहिती समजू लागली, तेव्हा मात्र कोरोना आला आणि कोरोना संपतो तोच कालावधी संपण्याची वेळ आली. त्यामुळे नगरसेवकांची स्वप्ने अधुरीच राहिली. पर्यायाने पुणेकरांचीच स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. हळूहळू भाजपच्या ही लक्षात आले कि आपण फार मजल मारू शकलो नाही. त्यामुळे मग भीती सतावू लागली, पुन्हा येऊ का नाही? मग भावनेच्या भरात निर्णय घ्यावे लागले. मग काही कामाचे करार संपललेले नसतानाही नियम डावलत आपल्याच लोकांसाठी मुदत वाढवून देण्यासाठी नवीन करार केले जाऊ लागले. मात्र ही गोष्ट लपून राहिली नाही. मुख्य सभेतही नंतर बहुमताच्या जोरावर निर्णय घेतले गेले. ज्यात पदाधिकाऱ्यांचेच हित सामावले होते.
अशा सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्याच ध्यानात आल्या आहेत. त्यामुळेच आता भाजपलाच 100 लोक निवडून येण्याचा आत्मविश्वास राहिलेला नाही. बाहेरून आलेले नगरसेवकांनी खरे तर निघून जाण्याची मागेच तयारी केली होती. आता ते पुढील काळात घडू शकेल. आपल्याकडून फार कामे झाली नसल्याची कबुली खुद्द त्यांचेच लोक देताहेत.
आता भाजपसमोर निवडणुकीत बहुमताने निवडून येण्याचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला खुलं आव्हान देतोय. अशी सगळे आव्हाने पार करून भाजपला बहुमत मिळवणे नक्कीच सोपे नाही. भाजप हे आव्हान कसे पेलणार, यासाठी मात्र खूप प्रयत्नांची आवश्यकता आहे.