Tag: River Devlopment Project
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ‘लोगो’ व ‘मॅसकॉट’चे उत्साहात अनावरण
पुणे|: पुणे शहरासाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला ‘PuneRé (पुणेरी) लोगो’ व ‘पुणेरी काका’ या ‘मॅसकॉट’चे आज, सोमवारी (२ जानेवारी २०२३) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच या प्रकल्पाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती असणारी www.punere.in ही वेबसाइट सुद्धा लाँच करण्यात आली. यावेळी पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांना मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. हे शहर मुळा-मुठा नदीच्या काठी वसलयं. त्यामुळे अर्थातच मुळा-मुठा नदीसोबत पुणे शहरातील नागरिकांचे एक प्रकारे नाते जोडले गेले आहे. कारण पुणे शहराच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची साक्षिदार मुळा-मुठा नदी आहे. पुणे शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या याच मुळा-मुठा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रकल्प हाती घेतलायं.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. आज, या प्रकल्पाच्या अनुषंगाने राबवण्यात येणारे विविध उपक्रम, स्पर्धांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटसह PuneRé (पुणेरी) लोगो, ‘पुणेरी काका’ ‘मॅसकॉट’चे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाला मा.महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) डॉ.कुणाल खेमनार, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(जनरल) रविंद्र बिनवडे, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) विकास ढाकणे, मा.मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, मा.शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मा.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिक घेणार प्रतिज्ञा
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे, पूर येण्याचा धोका कमी करणे, नदीच्या बाजूने सार्वजनिक जागा निर्माण करणे, नदीत पाणी टिकवून ठेवणे, नदीकडे जाण्याचा रस्ता सुधारणे, ऐतिहासिक वास्तू, उद्याने आणि अस्तित्वात असलेल्या जागांचे एकीकरण करणे, हे सहा प्रमुख उद्देश आहेत. प्रकल्पाचा नागरिकांना नेमका काय फायदा होणार आहे, याबाबत माहिती व एक प्रतिज्ञा पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात येणार आहे. पाणी बचत, पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने ही प्रतिज्ञा आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत पुणे शहरातील नागरिकांना माहिती मिळावी, प्रकल्पाबाबत असणाऱ्या त्यांच्या शंका दूर व्हाव्यात, यासाठी पुणे महानगरपालिका मा.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत असून वेगवेगळ्या स्पर्धा देखील घेत आहे. तसेच हा प्रकल्प कशा पद्धतीचा असणार आहे, याची माहिती नागरिकांना देण्यासाठी ‘एक्सपीरियंस सेंटर’ सुद्धा तयार करण्यात येणार आहे. याशिवाय रिल्स, फोटोग्राफी, इमोजी, मेमोरीज्, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम पुणे महानगरपालिका PuneRé या सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून राबवणार आहे. यासर्व उपक्रमांची माहिती PuneRé सोशल मीडिया पेजेस् तसेच www.punere.in या संकेतस्थळावर सुद्धा देण्यात येणार आहे.
मोदी सरकारची आठ वर्षे | पुण्याच्या पदरी शून्यच
– माजी आमदार मोहन जोशी
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत पुण्यासाठी मोठमोठ्या योजना जाहीर झाल्या प्रत्यक्षात मात्र, पुणेकरांच्या पदरी शून्यच विकासकामे पडली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
स्मार्ट सिटी ते नदी सुधार प्रकल्प अशा अनेक योजनांमध्ये घोळ घालण्यात आले. खासदार गिरीश बापट, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे १०० नगरसेवक यांची अकार्यक्षमता आणि अनास्था पुण्याच्या विकासाला बाधा ठरले आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी गाजावाजा केलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा पुण्यात पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. ही योजनाच आता गुंडाळली जाईल. शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रोच्या कामाला दिरंगाई झाली. भाजपच्या खासदारानेच निदर्शने केली, इतका सावळा गोंधळ यांच्या कारभारात आहे. निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून, त्यांच्या हस्ते वनाज ते गरवारे कॉलेज या मेट्रो मार्गाचे उदघाटन झाले. पण, नंतरचे काम पुढेच सरकलेले नाही. त्यामुळे मेट्रोला प्रवासीच मिळेना अशी अवस्था झालेली आहे. केंद्र सरकारने निधी मंजूर करुनही भाजपचे स्थानिक खासदार आणि नगरसेवक यांच्या निष्क्रियतेमुळे नदी सुधार प्रकल्प सुरु करण्यास सहा वर्षें दिरंगाई झाली. नंतर महापालिका निवडणुका जवळ येताच प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाला. पण, पुणेकरांनाच हा प्रकल्प मान्य झाला नाही आणि काम अडकून पडले. कोविड साथीच्या काळात अदर पूनावाला मोफत लस देऊ इच्छित होते. परंतु, भाजपचे स्थानिक खासदार आणि माजी महापौरांनी उदासीनता दाखवली आणि एक संधी हुकली. पुरंदर विमानतळाचा घोळही अजून मिटलेला नाही. ही सर्व अनास्थेची लक्षणे आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
नोटाबंदीतून ज्यांचे धंदे उखडले गेले ते अजून सावरलेले नाहीत. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. मध्यमवर्गीयांचे हाल वाढले, बेकार तरुणांना चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नाहीत. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात पुण्याच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्यात आली. त्यातून पुणे शहरात दीड हजार कोटीहून अधिक रकमेची कामे झाली. काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारच्या अनेक आस्थापना, संस्था पुण्यात उभ्या राहिल्या. मोदी सरकारच्या काळात भरीव प्रकल्प, संस्था पुण्यात उभी राहिलेली नाही, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
९०० कोटीच्या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती द्या
– माजी आमदार मोहन जोशी
पुणे: नदी प्रदूषणमुक्त न करता नदी सुधार प्रकल्प राबविण्याचा भारतीय जनता पक्षाचा आग्रह पुणेकरांचा कररूपी पैसा अक्षरशः पाण्यात घालणारा आहे, या प्रकल्पाला राज्य शासनाने स्थगिती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे नद्या प्रदूषित आहेत. शहरातील सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जायका प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निष्क्रीयतेमुळे जायका प्रकल्प रखडला. नद्यांमधील प्रदूषण अजूनही आहे, असे असताना बंडगार्डन ते संगमवाडी आणि बंडगार्डन ते मुंढवा येथे नदी सुधार प्रकल्प राबविण्याची घाई भाजपने चालविली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उदघाटनही झाले. या नदी सुधार प्रकल्पाबद्दल स्वयंसेवी संस्था, अनुभवी नेत्यांचे आक्षेप आहेत. या आक्षेपांना उत्तर न देता आणि जायका प्रकल्प गतीने पूर्ण न करता भाजप अट्टाहासाने काम करीत आहे, यात पुणेकरांचे नऊशे कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नदी सुधार प्रकल्पात लक्ष घालावे, व्यापक बैठक बोलावून प्रकल्पास स्थगिती द्यावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे. मुळा मुठा नदी सुधारणा करण्यास काँग्रेसचा विरोध नाही पण नदीचा प्रवाह प्रदूषणमुक्त न करता नदी सुधार प्रकल्प राबविल्याने पुणेकरांचा पैसा पाण्यात जाणार आहे आणि घाईघाईने प्रकल्प राबवून कामाचा देखावा भाजप करीत आहे आणि त्याला विरोध आहे, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे.