Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
cultural Political social पुणे महाराष्ट्र

Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Shivaji Maharaj Jayanti | छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही (Shivneri) विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.

शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाण-ए- आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करतो, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा

निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन

मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. जाणता राजाचे महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

किल्ल्यांच्या विकासाकरिता एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक – देवेंद्र फडणवीस

राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणीबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्यभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद-सूर्य आहे तो पर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील. शिवराज्यभिषेक सोहळ्यात निमित्त राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार, चरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी करणे शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे. त्यामुळे रयतेने विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या कल्याणकरीता प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.

माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून, त्यामधील पुरुषत्व जागृत केले. मुगलासारख्या बलाढ्य शत्रूचा नित्पाद केला. शिवरायांनी अन्यायाच्याविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असेही त्यांनी सांगितले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करीत आहोत. शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी रायगड किल्यावर स्वतःचा राज्यभिषेक करून अखंड हिंदुस्थानसोबत युरोपातील राज्यसत्ताना अचंबित केले. हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत. त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा, एकतेचा विचार येत्या पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त करुया. सह्याद्रीच्या दऱ्या- खोऱ्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकामध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्याकाळात शिवरायांनी पेरला. परकीय सत्तेसमोर सार्वभौमत्व स्वराज्याची स्थापन करत रयतेला आपले वाटावं असे राज्य, स्वराज्य स्थापन त्यांनी केले, याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे.

जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सूचना केली.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.

शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे.

Shivaji Maharaj Jayanti | ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात |पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि कलासंस्कृतीचे सुंदर दर्शन

Categories
Breaking News cultural social पुणे

Shivaji Maharaj Jayanti | ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात

|पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि कलासंस्कृतीचे सुंदर दर्शन

 

Shivaji Maharaj Jayanti | छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ (Hindavi Swarajya Mahotsav 2024) चा शुभारंभ जुन्नर (Junnar Pune) येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव म्हणजे कला, संगीत, साहस आणि इतिहास यांचा सुरेख संगम आहे. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात विनायक खोत यांच्या हस्ते ‘महादुर्ग फोर्ट वॉक’ च्या उद्घाटनाने झाली. या सहलीच्या माध्यमातून पर्यटकांना जुन्नर परिसरातील इतिहासाचा वारसा पहायला मिळाला.

जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे धनेशशेट संचेती यांच्या उपस्थितीत ‘ॲडव्हेंचर झोन’ या साहसी खेळांचे रोमांचक प्रदर्शन करण्यात आले . याचदरम्यान जुन्नर किल्ल्यावरील ‘हेरिटेज वॉक’ आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्या बुट्टे पाटील मैदानातील ‘आर्ट डिस्ट्रिक्ट’ प्रदर्शनामुळे सोहळ्याची रंगत वाढली.

पर्यटन संचालक बी. एन. पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, विभागीय अभियंता गणेश सिनाळकर यांच्या हस्ते जलाशय किनारी मनमोहक वास्तव्याचा अनुभव देणाऱ्या टेंट सिटीचे उद्घाटन करण्यात आले. बुट्टे पाटील मैदानातील कार्यक्रमस्थळाच्या संगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

श्री.शेरकर यांनी पॅरामोटरिंग झोनचे उद्घाटन केले. बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्टमधील खाद्य महोत्सव खास आकर्षण आहे. येथील महिला बचत गटांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंच्या स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते, तर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन अनिल मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले.

पहिल्या दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता ही सूर्यास्तासोबत झालेल्या रात्रीच्या निरभ्र आकाशात तारकादर्शनाच्या मनमोहक अनुभवाने झाली.

दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी सायं. ६:३० ते ७:३० वा. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ ही नृत्य नाटिका, सायंकाळी ७:३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा ‘गनिमी कावा’ हा कार्यक्रम होईल.

Shivneri | Shiv jayanti | गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे| छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येऊन दर्शन घेणे रोमांचक अनुभव आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आज घराघरात शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकीक कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनात सतत रहाते. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्वसामान्य, गोरगरीब आदी सर्व घटकांसाठी काम करीत आहे.

* शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान*
महाराजांचा आदर्श केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबाला उत्तर दिले त्या आग्राच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. राज्य शासन पर्यटन विभागामार्फत शिवनेरीच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान आहे.

शक्ती आणि युक्तीच्या आधारे स्वराज्याची निर्मिती
शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूली, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असा गौरवोद्गार श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले, परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वढू, तुळापूरचाही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल. शिवनेरी येथे शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडथळा, बंदी नसेल शिवजन्मोत्सवाचे अधिक चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहद कार्यक्रम- उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवराय होते म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, मानाने जगतो. शासनाने सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दरवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. किल्ल्याच्या वेगळ्या निधीव्यतिरिक्त हा निधी असल्याने संवर्धनासाठी निधीची कमतरता नसेल. शिवजन्मस्थानाच्या दर्शनाबाबत योग्य नियोजन करण्यात येईल.

शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासंदर्भात बृहद असा कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून १ वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, स्मारके आणि महाराजांचे तेज जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल. रायगड येथे उत्खननात वेगवेगळ्या गोष्टी सापडत असून नवा इतिहास समोर येत आहेत. अशाच प्रकारचे काम शिवनेरी येथेही होईल. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या राजा वढू, तुळापूर साठी ३९७ कोटी रुपयांचा आराखडा केला असून तेथेही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

यावेळी जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवनेरी भूषण पुरस्कार ह.भ.प. नामदेव महाराज घोलप यांना मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. आयर्नमन म्हणून पुरस्कार मिळवलेल्या मंगेश चंद्रचूड कोल्हे तसेच खेळाडू संदेश नामदेव भोईर यांनाही शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिलिंद मधुकर क्षीरसागर यांना देण्यात आला. यावेळी ‘शिवचरित्रातून काय शिकावे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबल यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

पालकमंत्री यांच्याकडून शिवाजी महाराजांना वंदन
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन शिवरायांना वंदन केले.

Shiv Jayanti | शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३

पुणे | महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे.

यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

महाराष्ट्र राज्याची अस्मिता आणि आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटन प्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे –

दि. १८ फेब्रुवारी २०२३
सायं. ६:३० वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ उदघाटन
सायं. ७ ते रात्री १० वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम

दि. १९ फेब्रुवारी २०२३
स. ९ ते ११ वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. ३ ते ५ वा. शिववंदना
सायं. ६:१५ ते ७ वा. महाआरती कार्यक्रम
सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

दि.२० फेब्रुवारी २०२३
सायं.७ ते रात्री १० वा. जाणता राजा कार्यक्रम

तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Shivneri : Dr Sachin Punekar : शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

Categories
cultural social पुणे

शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

 

पुणे: बायोस्फिअर्स; पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग; आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (उपविभाग मंचर) यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे  उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाची पहिली प्रत पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्राच्या श्रीमती दास यांनी उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांना सुपूर्त केली. सदर सचित्र पोस्टकार्ड संचाचे प्रस्तावक आणि संकल्पना डॉ. सचिन पुणेकर यांची आहे. सदर विशेष आवरणाच्या प्रस्तावाला पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग यांची अधिकृत मान्यता देखील मिळाली आहे.

सदर सचित्र पोस्ट कार्ड संचाच्या माध्यमातून जुन्नर तालुका आणि परिसरातील ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरणीय आणि अध्यात्मिक वारसा अधोरेखित केला आहे. परिसरातील हा समृद्ध वारसा जनमानसात रुजावा, त्याचे जतन, संवर्धन व्हावे आणि शाश्वत पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी आणि परिणामी स्थानिक लोकांची या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने हा जुन्नरचा समृद्ध वारसा डाक विभागाच्या माध्यमातातून व बायोस्फिअर्स संस्थेच्या पुढाकारातून सर्वदूर करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासन व शिवप्रेमींच्या एकत्रित प्रयत्नातून शिवरायांना एक अनोखे अभिवादन या निर्मितीच्या माध्यमातून केले आहे. या सचित्र पोस्टकार्डामुळे जनमानसात, अभ्यासकामध्ये, विशेषत: जगभरातील टपाल उत्पादने संग्राहकांमध्ये या शिवरायांच्या पवित्र जन्मभूमी व परिसरातील वारशाबाबत जनजागृती आणि कुतूहल निर्माण करण्याचे महत्वाचे काम होणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील अशा अनेक समृद्ध वारशांबाबत संवर्धन व संशोधनाकरिता या नूतन अभियानासारखी भविष्यात नक्कीच निर्मिती करता येवू शकेल. त्यासाठी हे सचित्र पोस्टकार्ड नक्कीच पथदर्शी ठरेल..!!!

सदर उपक्रमाला मराठा सेवा संघाचे विविध पदाधिकारी; डाक विभागाचे सन्माननीय अधिकारी  बी.पी. एरंडे; सुकदेव मोरे;  प्रमोद भोगडे आणि शिवभक्त – शिवप्रेमी  अविनाश शिश्री. शैलेंद्र पटेल,  अभिजित भसाळे आणि इतर अनेक शिवभक्तांचे मौलिक सहकार्य लाभले.