Dr Tessie Thomas | लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे महाराष्ट्र
Spread the love

लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

पुणे : थोर स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर विचारावरच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया रचला गेला आहे. उद्याच्या बलाढ्य देशासाठी जे संशोधन सुरू आहे. त्यासही लोकमान्यांच्या विचारांचीच
प्रेरणा आहे. असे प्रतिपादन मिसाइल वुमन’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका डॉ. टेसी थॉमस यांनी सोमवारी केले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’  ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक- मोेेने आदी उपस्थित होेते.

डॉ. थॉमस म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारातून क्षेपणास्त्रात भारताला आत्मनिर्भर करण्याची आम्हाला
प्रेरणा मिळेल. या आनंददायी क्षणी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार असून तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या घोषणेची आठवण होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये लोकमान्यांचा स्वदेशीचा विचार क्षेपणास्त्र क्षेत्रामध्ये संशोधनासाठी महत्वाचा आहे. देश जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र तयार करत आहे. त्यात स्वदेशीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे थॉमस यांनी सांगितले.

भारतीय संशोधन आणि विकास संस्थेमध्ये  (डीआरडीओ) मी 1980 मध्ये वैज्ञानिक म्हणून दाखल झाले. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी मला प्रथम अग्नी प्रकल्पामध्ये संशोधनाची संधी दिली. यावेळी लांब
पल्ल्याच्या स्वदेशी क्षेपत्रणास्त्राचे तंत्रज्ञान फारसे विकसीत झाले नव्हते. देशामध्ये यासंदर्भातील पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाविषयी फारसे संशोधन झाले नव्हते. देशात या संदर्भातील
एकही संस्था अथवा कंपनी पायाभुत सुविधा तयार करत नव्हते. मात्र कलाम हे डीआरडीओचे प्रमुख असताना त्यांनी पुढील 30 वर्षांचे स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राचे स्वप्न पाहिले. त्यामुळेच आपण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या
क्षेपणास्त्राचे संशोधन करु शकलो. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे योगदान देत आहे. कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर 4
हजार, 5 हजार ते 8 हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ मिळत आहे. डीआरडीओमध्ये सध्या स्वदेशी बनावटीचे लढावू विमान,
एचसीएलसाठी विमाने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भारतीय लष्काराला लवकरच अत्याधुनिक मानवविरहित युध्द वाहने पुरवण्यात येणार आहेत. डीआरडीओत काम करत असताना मला सहकार्य करणारा
संघ व आईवडीलांचे यानिमित्ताने डॉ. थॉमस यांनी आभार मानले.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र काम करीत आहेत. देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांचा सत्कार म्हणजे
देशाचा सन्मान आज करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. संरक्षण क्षेत्रात डॉ. थॉमस यांनी प्रगतिपथावर नेले आहे. सध्या देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू असले तरी शास्त्रज्ञ संरक्षणाच्या कामासाठी रात्रंदिवस काम करीत, नवनवीन शोध लावून देश बळकट करीत असल्याचे यावेळी शास्त्रज्ञांच्या कामाचे कौतुक यावेळी त्यांनी केले. संरक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात शास्त्रज्ञ पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारे येतात, जातात; पण शास्त्रज्ञांचे यज्ञ कधीच थांबत नाहीत. त्यांचे संशोधन सुरुच असते. कोणत्याही सत्तेत असणार्‍या सरकारने शास्त्रज्ञांच्या कामाचे श्रेय घेऊ नये, असेही यावेळी नमूद केले. संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञांचे काम अमूल्य असून त्यांनी देशाला मोठी उंची गाठून दिली आहे. ज्या ठिकाणी टाचणी तयार होत नव्हती त्या ठिकाणी आपल्या शास्त्रज्ञांनी अग्नी क्षेपणास्त्राचा शोध लावला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची उंची वाढवणारे काम टिळक स्मारक ट्रस्टने केले असून शास्त्रज्ञांच्या कामाची पूजा बांधली असल्याचे यावेळी शिंदे यांनी कौतुक केले.

लोकमान्यांच्या चतू:सूत्रीमुळे देशात परिवर्तन : चंद्रकांत पाटील

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार आणि स्वराज्य चतूःसूत्री मांडून देशात परिवर्तन घडवून आणले. सर्वसामान्य माणसाला त्यांनी जोडले. शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे राष्ट्रीय शिक्षण हे सध्याचे नवीन शैक्षणिक धोरण म्हणून घेण्यात आले आहे. लोकमान्यांनी त्यांच्या चतुःसूत्रीतून देशाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. सध्या स्वदेशी हा त्यांचा मूलमंत्र सध्या आत्मनिर्भर भारत म्हणून आपण काम करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या भारतीय बनावटीचे साहित्य, संशोधनाचे साहित्य देशातच होत असून हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनेच काम होत आहे. आत्मनिर्भर भारत हेच त्यांचे प्रतीक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. देशाला प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी दिशा देणारे विचार लोकमान्यांनी चिंतन, मनन करुन मांडले आहेत. आजही ते विचार देशाला पुढे नेणारे
असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकमान्यांच्या विचारात आधुनिक भारताचा पाया

पुणे : लोकमान्यांची कोणतीच मांडणी भावनिक नव्हती. त्यांच्या मांडणीमागे प्रचंड अभ्यास आणि विचारांचे अधिष्ठान होते. शेती, उद्योग, सहकार क्षेत्राचा शास्त्रीय अभ्यास करून लोकमान्यांनी आधुनिक भारताचा आराखडा मांडला. लोकमान्यांनी तेव्हा मांडलेले विचार आजही उपयुक्त ठरत आहेत. म्हणून लोकमान्यांच्या विचारातच आधुनिक भारताचा पाया घातला गेला. लोकमान्य वंदनीयपेक्षा आचरणीय अधिक आहेत. त्यांचे आयुष्य त्यागाने भरलेले आहे. त्यांचे वास्तववादी विचार आजही उपयुक्त ठरतात. स्वराज्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले असल्याचे मत डॉ. टिळक यांनी व्यक्त केले.