G 20 Conference | 15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे! 

Categories
Breaking News PMC पुणे

15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे!

| G 20 साठी महापालिका प्रशासनाची जोरदार तयारी

पुणे | आगामी काही दिवसात पुणे शहरात G-20 परिषद (G 20 Conference) होणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune Administration) जोरदार तयारी करण्यात येत आहे. शहर स्वच्छ दिसावे यासाठी 15 प्रमुख रस्त्यांच्या सुशोभीकरणाची (15 Main Road beutification) कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या प्रत्येक खातेप्रमुखाकडे (HOD) 1 असे 15 खाते प्रमुखाकडे 15 रस्त्यांची कामे देण्यात येणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (Chief Engineer V G Kulkarni) यांनी दिली.
शहरात काही महिन्यापूर्वी G20 परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही रस्त्यांच्या सुशोभीकरणाची कामे केली होती. त्यानंतर आता अजून काही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्य 15 रस्त्यांचा समावेश आहे. त्यांमध्ये सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, विमानतळ रस्ता, विद्यापीठ रस्ता, कर्वे रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, औंध रस्ता अशा रस्त्यांचा यात समावेश आहे. (Road Beutification in pune)
सुशोभीकरणाच्या कामामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, भिंती रंगवणे, विद्युत पोल ची दुरुस्ती अशी सर्व कामे करण्यात येतील. प्रत्येक रस्त्यासाठी 1 खातेप्रमुख नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी निधी राज्य सरकारचा असणार आहे. (Pune Municipal Corporation)

Conference on ‘Urban Infrastructure’ | जी-20 निमित्त पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

जी-20 निमित्त पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद


केंद्र, राज्य तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, शहर नियोजन अभ्यासक आले एकत्र

 

जी-20 निमित्त ‘जन भागीदारी कार्यक्रमा’चा भाग म्हणून आज पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्र, राज्य तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक यासाठी एकत्र आले होते. दिवसभर झालेल्या चार सत्रांमधून विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.

   

अर्थमंत्रालाया अंतर्गत वित्त व्यवहार विभाग, पुणे महानगरपालिका, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, पुणे व पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

   

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्र बागडे

पहिल्या सत्रात ‘भविष्यातील शहरांसाठीची दृष्टी’ या विषयावर चर्चा झाली, यामध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्र बागडे, पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राचे, प्रा. गुरूदास नूलकर, रायपूर महानगरपालिकेचे आयुक्त मयांक चतुर्वेदी आणि तानाजी सेन, संचालक, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती या तज्ज्ञांनी भाग घेतला. आपत्ती व्यवस्थापन, शहरी भाग आणि पाणी, गरीबी, तापमान, लोकसंख्या ही आव्हाने, भविष्यातील शहरांची कल्पना या मुददयांवर चर्चा करण्यात आली.

   

‘नगरपालिका वित्तपुरवठा व शहरी पायाभूत सुविधांचा विकासनगरपालिका वित्तपुरवठ्यामध्ये सार्वजनिकखासगी भागीदारीची भूमिका‘ या दुसऱ्या सत्रात सूरत शहराच्या आयुक्त शालिनी अगरवाल, नीती आयोगाच्या सार्वजनिकखासगी भागीदारी विशेषज्ज्ञ अल्पना जैन, पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रा. अभय पेठे, राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी – NIIFचे  सार्वजनिकखासगी भागीदारी तज्ज्ञ अजय सक्सेना यांनी आपले विचार मांडले.

   

तिसऱ्या सत्रात ‘शहरी पायाभूत सुविधा व सेवा : संधी, आव्हाने व उपाय’ या विषयावर चर्चा झाली. यामध्ये गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकनॉमिक्स, पुणेचे कुलगुरू प्रा. अजित रानडे, राष्ट्रिय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तपुरवठा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय; भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अशोक शर्मा, कोटक पायाभूत सुविधा निधीचे कार्यकारी संचालक मुकेश सोनी यांनी आपली मते मांडली.

   

शेवटच्या सत्रात ‘शहर नियोजन’ अंतर्गत देशतील पाच शहराच्या आयुक्तांनी विविध विषयातील कार्यपद्धतीवर काय उपाययोजना केली याची माहिती दिली. चेन्नईच्या महसूल व वित्त विभागाचे उपायुक्त विशु महाजन यांनी ग्रेटर चेन्नईमध्ये महसूल निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. बडोदा महापालिका आयुक्त बंचानिधि पाणि यांनी राहण्यायोग्य शहरे करण्यासाठी प्रत्यक्ष नगर नियोजन कसे केले, याबद्दल सांगितले. पटियाला शहराचे आयुक्त आदित्य उप्पल यांनी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामे शोधण्यास ‘जीआयएस’ यंत्रणेचा कसा फायदा झाला यावर प्रकाश टाकला. सुरतमध्ये सांडपाण्याची व्यवस्था काशी लावली आहे, हे उपस्थितांना समजावून सांगितले. त्यानंतर छत्तीसगडच्या रायपूर येथे मालमत्ता कर रचनेसाठी ‘जीआयएस’ यंत्रणेची अंमलबजावणी यशस्वी होत असल्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

   

   

Vadgaon Sheri Citizen Forum | विमाननगर एअरपोर्ट रोडवर अशास्त्रीय पद्धतीनं चौकात सर्कल उभे केल्याने अपघाताला निमंत्रण  | वडगाव शेरी नागरिक मंचाकडून तक्रार 

Categories
Breaking News PMC social पुणे

विमाननगर एअरपोर्ट रोडवर अशास्त्रीय पद्धतीनं चौकात सर्कल उभे केल्याने अपघाताला निमंत्रण

| वडगाव शेरी नागरिक मंचाकडून तक्रार

पुणे | पुणे महापालिकेकडून शहरात G 20 परिषदे निमित्त काही कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.  अशास्त्रीय पद्धतीने विमाननगर एअरपोर्ट समोरील सिम्बायोसिस चौकात सर्कल व कारंजे उभे केलेले आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते आहे. अशी तक्रार वडगाव शेरी नागरिक मंचाच्या आशिष माने महापालिकेकडे केली आहे.

माने यांच्या तक्रारी नुसार रस्त्याच्या मधोमध हे सर्कल मांडलेले असून त्याचा व्यास अंदाजे १० ते१२ फूट आहे. अपघाताला निमंत्रण देणारं हे सर्कल आहे. मोठ्या गाड्या जसे कि ट्रक वगैरे वळताना त्यांना अडचण होत आहे. सरळ चाललेल्या गाड्या या सर्कलच्या किनाराला धडकण्याची शक्यता वाहनचालकांना वाटत असल्याने वेग शिथिल होऊन येथे वाहतूक कोंडी होत आहे.

माने पुढे म्हणाले, वाहतूक पोलिसांना याबाबत विचारात घेतलेले नाही. पथ विभागाच्या अधिका-यांना चौकशी केली असता त्यांनीही हात वर केले. पथ विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता संजय धारव यांना विचारले असता हे सर्कल उभे करताना आम्हाला कसलीही विचारणा केली नाही व आमचा अभिप्राय घेतला नाही असे उत्तर त्यांनी दिले आहे. हे सगळे अनाकलनीय व नियमबाह्य आहे. असे माने यांनी म्हटले आहे.  या सर्कलमुळे अपघात झाला तर पुणे मनपा आयुक्तांच्या विरोधात FIR करायची का? आम्हाला याचे उत्तर हवंय. या सर्कलमुळे वाहतूक कोंडी तर होतोयच परंतू वाहनचालक गोंधळूनही जात आहेत.
हे सर्कल जर पुढच्या दोन दिवसांत काढले नाही तर आम्ही येथे आंदोलन करू यासाठी हे पत्र देत आहे. आपण गंभीरपणे दखल घ्यावी. असा इशारा माने यांनी दिला आहे.

Cycle tour | जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News cultural PMC देश/विदेश पुणे

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे | पुण्यात (pune) होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत (G 20 conference) नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे (PMC Cycle Club) सायकल फेरीचे (Cycle tour) आयोजन करण्यात आले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.

सायकल फेरीच्या माध्यमातून ‘जी-२०’ बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.

सुमारे पंधराशे सायकलप्रेमी नागरिक या सायकल फेरीत सहभागी झाले. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.

या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी आणि महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) संतोष वारुळे यांनी केले.

G20 Conference | मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे होणार जी २० परिषदेच्या बैठका | महाराष्ट्रातील जी २० परिषद कार्यक्रमांचा आढावा

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे होणार जी २० परिषदेच्या बैठका

| महाराष्ट्रातील जी २० परिषद कार्यक्रमांचा आढावा

| जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारताला जी २० परिषदेचे (G 20 conference) अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे केले. (Mumbai, pune, Aurangabad, Nagpur)

जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

दि. १ डिसेंबर पासून भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ भारताकडे राहणार आहे. याकालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत.

दि. १३ ते १६ डिसेंबर याकालावधीत मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्य गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर पुणे येथे १६ आणि १७ जानेवारीला पायाभूत सुविधा कार्यगटाची तर औरंगाबाद येथे १३ व १४ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. २१ आणि २२ मार्चला नागपूर येथे रिग साईड इव्हेंट होणार आहे. त्यानंतर मुंबईत २८ आणि ३० मार्च १५ ते २३ मे आणि ५ आणि ६ जुलै, १५ व १६ सप्टेंबर २०२३ याकालावधीत विविध बैठका होतील. पुणे येथे १२ ते १४ जून, २६ ते २८ जून याकालावधीत बैठका होणार आहेत. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गर्शनाखाली आपल्या देशाला जी २० परीषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. देशाचे आणि आपल्या राज्याचे जगात नावलौकीक करण्यासाठी ही संधी असून त्यासाठी शहर सौंदर्यीकरणावर अधिक भर द्यावा. रस्त्यांची दुरूस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रोषणाई याबाबींवर भर देऊन परिषदेच्या बैठक काळात शहरांचा चेहरामोहरा बदलावा, आपल्या राज्याचे आणि शहराचे जगात ब्रँडींग करण्यासाठी याचा उपयोग करू घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे मोलाचे आहे. एकदा अध्यक्षपद मिळाले की त्यानंतर २० वर्ष ते मिळत नाही. त्यामुळे आपल्याला देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा, विविध खासगी संस्था, संघटनांना देखील सहभागी करून घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

परिषदांच्या बैठक काळात राज्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत आणि त्यांच्या तयारीबाबत मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी सादरीकरण केले. मुंबई महापालिका आयुक्त आय. ए. चहल यांनी मुंबईत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी बैठकांसाठी सुरू असलेल्या नियोजनाची माहिती दिली.

G-20 Summit | जी – 20 परिषदेतील कार्यक्रम, बैठका पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये होणार

Categories
Breaking News Commerce देश/विदेश पुणे महाराष्ट्र

जी – 20 परिषदेतील कार्यक्रम, बैठका पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये होणार

| सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे

| मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

 

जी – 20 देशांच्या प्रतिनिधींची पुढील वर्षी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान होणाऱ्या विविध बैठका आणि कार्यक्रम यांचे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी  केल्या.

या परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, उच्च आणि तंत्रशिक्षण सचिव विकास चंद्र रस्तोगी, आदिवासी विकास विभाग सचिव अनुपकुमार यादव, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, जी – 20 परिषदेदरम्यान होणार्या विविध बैठका कार्यक्रमांना येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या कालावधीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे, औद्योगिक गुंतवणूक करण्यासाठी असलेल्या संधीचे आणि पर्यटन स्थळांची माहिती सादरीकरण करण्यासाठी नियोजन केले जावे. यासाठी उद्योग, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने साहित्य निर्मिती करावी. त्याचे विविध भाषेत भाषांतर करुन घ्यावे.

परिषदेतील कार्यक्रम, बैठका मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे होणार आहेत. या शहरांचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी विशेष प्रयत्न करावे. तसेच यासाठी पुणे आणि औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने संबंधित ठिकाणी सर्व नियोजन करावे, अशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या.

या परिषदेसाठी येणारे प्रतिनिधी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात. त्यामुळे अशा स्थळांचा विकास, सौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.