Tag: Dehu
Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत
Dehu Alandi Municipal Corporation |शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पांडुरंग खेसे, सतीश म्हस्के, स्वप्नील पठारे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरू शकतील. कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते. जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पाण्याच्या समस्येबाबत बोलतांना श्री.पवार म्हणाले, पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य, निवारा आदी सुविधा पुरवव्या लागतात. त्यामुळे इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. पाणी बचत व्हावी म्हणून कालव्याऐवजी बोगदा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावे म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येथील, असेही श्री. पवार म्हणाले.
नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केली आहे. लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पीएमपीएमएलची बीआरटी लेन बंद केली. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, असेही ते म्हणाले.
राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात नोकरभरती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये युवांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात नवीन युवा धोरण बनविण्यात येणार आहे. आयटीआय मध्ये रोजगारक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याचा युवकांना फायदा होईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प संनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो, रिंग रोड, मोठी रुग्णालये, बंदरे, समुद्र किनारी मार्ग आदी विविध विषयांच्या प्रकल्पांचा आढावा देऊन त्यांना गती दिली जात आहे. राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
आमदार श्री. टिंगरे म्हणाले, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना निधी मिळत आहे. लोहगाव – वाघोली समान पाणीपुरवठा योजनेसाठी २३० कोटी रुपये मंजूर असून एकूण ४५० कि.मी. च्या वितरण नलिकांपैकी २३० कि.मी. नलिका फक्त लोहगावमध्येच आहेत. २० लक्ष हून अधिक क्षमतेच्या ८ टाक्या येथे असून नवीन ९ टाक्यांची कामे सुरू होत आहेत. लोहगाव उपजिल्हा रुग्णालयचे काम अंतिम टप्प्यात असून लोहगाव आयटीआय साठी निधी मंजूर आहे. रस्ते, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यासाठी निधी मंजुरीचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
Indrayani River Devlopment Project | PMRDA | पीएमआरडीएचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर!
सद्यस्थितीत 577.16 कोटी रकमेचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनांच्या पर्यावरण विभागाने स्वीकारला असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. हा प्रस्ताव केंद्र शासन स्थरावर देखील लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
Sant Tukaram Maharaj Palkhi Soahala| ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari 2023) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) आज पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala)
देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane), आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), आमदार उमा खापरे (MLA Uma Khapre), माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आदी पूजेला उपस्थित होते.
पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. (Pandharpur Wari)
महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.
News Title |Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | Departure of Sant Tukaram Maharaj palanquin to the alarm of tala-mridanga
पुणे शहरासह जिल्ह्यात 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरु : नितीन गडकरी
पुणे शहरासह जिल्ह्यात रस्ते विकासाची सुमारे 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असून त्यात पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि शहरातील वर्तुळाकार मार्गाचा समावेश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून केले जाणारे काम त्यांनी तपासले. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी आज बोलले.
कामाचा आढावा घेतल्यानंतर येत्या मे महिन्यापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून सुमारे 60 ते 70 टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वर्षाअखेर हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी वारी आणि पर्यायाने पालखी हा खूप महत्वाचा, अस्थेचा विषय आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्वपूर्ण क्षेत्र आहेत. हा भक्ती मार्ग साधारण नसावा, इथे आम्ही विशेषत्व जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करत आहोत आणि वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
यासह पुण्यातील चांदणी चौकातील मार्गाचे अपूर्ण काम येत्या एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
दौंड-बारामती मार्गे नवी मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत नवीन रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आपण रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला असल्याचे गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राज्यातील महामार्गाच्या कामासाठी लागणारे सिमेंट आणि पोलाद यावरील वस्तू सेवा कर राज्य शासनाने माफ करावा, त्याचबरोबर धरणांमधील वाळू काढून त्याचा वापर रस्ते बांधकामासाठी केला जावा, अशी विनंती करणार असल्याचे देखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही पालखी मार्गांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी
महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी खासदार श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर जी यांच्यासह पाहणी केली.
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
—-
महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी खासदार श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर जी व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे | ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.
दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.
महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या सोमवारी (ता. २०) दुपारी अडीचला देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखीमार्गावर जागोजागी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फूलून गेला आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आलेले आहेत.
संत तुकाराम महाराज संस्थान, नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ४०० पोलिस कर्मचारी तैनात आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले, की यंदा पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम सोमवारी दुपारी अडीचला मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरु होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, पिंपरी येथील कुशल वर्मा बंधूकडून रथाला पॅालीश करण्यात आलेली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येऊन गेल्याने विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. पालखीमार्ग, वैकुंठस्थान मंदिराकडे जाणारा मार्ग नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणी मारून स्वच्छ धुण्यात आले. नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महावितरण आदी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी (ता. २०) आणि मंगळवारी (ता. २१) देहूतील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहे.
…असा होईल सोहळा
- पहाटे साडेचार – देऊळवाड्यात काकडा
- पहाटे पाच – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा होईल.
- साडेपाच – संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
- सहा – वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
- सकाळी सात – पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
- सकाळी नऊ ते ११ – इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन
- सकाळी १० ते १२ – रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन.
- दुपारी अडीचला – इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आणण्यात येतील. अडीचला पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.
- सायंकाळी पाच – पालखी प्रदक्षिणा होईल.
- सायंकाळी साडेसहा – मुख्य देऊळवाड्यातून पालखी सोहळा इनामदार वाड्याकडे मार्गस्थ. इनामदारवाड्यात पालखी सोहळा मुक्कामी असेल.
पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’ कडून जादा बसेसचे नियोजन
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे.
भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक 18/06/2022 पासून दिनांक 22/06/2022 पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण 130 बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक 21/06/2022 रोजी रात्रौ 12:00 वा. पर्यंत आळंदी
करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण 22 बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 10 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.
दिनांक 22/06/2022 रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे 03:00 वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा 18 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी 05:30 वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 101 बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्याm सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान 40 आवश्यक) देण्यात येईल. तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक 24/06/2022 रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी 12:00 ते 1:00 दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची
व्यवस्था करण्यात आली आहे.
तदनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा 60 जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण
पुणे : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायाचे मारुतीबाबा कुरेकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असल्याचा आपल्याला अभिमान आहे, याचे श्रेय भारतीय संत परंपरेला आणि ऋषी मुनींना आहे. राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत ही संतांची भूमी असल्याने या देशाचा विचार शाश्वत आहे. प्रत्येक काळात महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या शाश्वत मूल्यांचे रक्षण केले आणि देश व समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील अखेरच्या व्यक्तींचे कल्याण करावे हाच संतांचा संदेश आहे. या संदेशानुसार गरिबांचे कल्याण ही देशाची प्रथमिकता आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा
संत भिन्न परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संतांची महत्वाची भूमिका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत. संत तुकारामांची करुणा, दया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभंगाच्यारुपाने आजही आपल्यात आहे. या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतात, मार्गदर्शन करतात. ऐक्यासाठी संत विचारांच्या प्राचीन परंपरेला जपावे लागेल.
प्रयत्नातून अशक्याला शक्य करता येते हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. देशात पर्यावरण, जलसंरक्षण आणि नदी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेशी हे विषय जोडल्यास पर्यावरणाचे मोठे काम होईल. सेंद्रिय शेतीला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी मिळून प्रयत्न करावे लागतील. योग ही भारताची जगाला देणगी आहे असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिवसात सर्वांनी सहभाग व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
संत तुकाराम महाराज शिळा बोध आणि वैराग्याची साक्ष
तुकाराम महाराजांनी जीवनात भूक आणि दुःख पाहिले. संकटकाळात कुटुंबाच्या संपत्तीला जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे कार्य भविष्यासाठी आशेचा किरण आहे, तर ही शिळा त्यांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष आहे. संतांच्या अभंगवाणीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आज देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. मराठी संतांच्या अभंगवाणीतून नित्यनवी प्रेरणा मिळते. तुकाराम महाराजांनी माणसात भेदभाव करणे मोठे पाप म्हटले आहे. समाजासाठी हा संदेश महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.
मोदी म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात आणि आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. या दोन्ही एकूण ३५० किलोमीटरपेक्षा अधिक चौपदरी मार्गासाठी ११ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. शास्त्रात म्हटले आहे मानवजन्मात संतसंग सर्वात महत्वाचा आहे, त्यांच्या सहवासात सुखाची अनुभूती असते. असा अनुभव देहूसारख्या तीर्थक्षेत्री आल्यावर मिळतो.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीही विचार व्यक्त केले. तुकाराम महाराजांनी समाजाला अंधश्रद्धेपासून दूर नेत अध्यात्म मार्ग दाखविला असे त्यांनी सांगितले. नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले.
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते संत चोखामेळा सार्थ अभंग गाथेचे विमोचन करण्यात आले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी तिन्ही संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आणि ध्वजपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यांनी इंद्रायणी नदी, भंडारा, घोरवडेश्वर आणि भामगिरी टेकडीचे दर्शन घेतले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी संत तुकाराम महाराज लिखित अभंगगाथेची हस्तलिखित प्रत आणि पालखीचेही दर्शन घेतले.