Tag: Wari
मुख्यमंत्र्यांनी पुण्यात सत्कार नाकारला | कारण घ्या जाणून
एक रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री बनला, त्याच्या सत्कारासाठी पुण्यातील रिक्षाचालकांनी, शि
मुख्यमंत्री स्टेजवर आल्यावर त्यांना भला मोठा हार घालण्यात येत होता. बाहेर ढोल ताशे, फटाके वाजविण्यास सुरुवात झाली होती. इतक्यात शिंदे यांनी माईक हातात घेतला. ”सर्वांना माझी नम्र विनंती आहे, कुठेही वाद्ये फटाके वाजवू नका. कारण अमरनाथमध्ये पुण्यातील तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे कुठेही जल्लोष करू नका”, असे भावनिक आवाहन उपस्थित समर्थक, आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी केले.
मी तुम्हाला खास भेटायला आलोय. मी आषाढी एकादशीच्या पुजेला जात आहे, वेळेत पोहोचायचे आहे. सर्वांचे आभार मानतो. अमरनाथ यात्रेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून या मृतांना श्रद्धांजली द्यावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
मी पुन्हा आपल्याला भेटायला येईन. तुम्हा सर्वांच्या आणि राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मी मुख्यमंत्री पदाचा वापर जनतेच्या भल्यासाठी, कामासाठी करेन, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. बाळासाहेब, दिघेंचे विचार पुढे नेण्याचे काम करणार आहे, असे शिंदे म्हणाले.
युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य किरण साळी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना उपाध्यक्ष विद्यापीठ कक्ष आकाश शिंदे आदी उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र ट्राफिकमध्ये अडकल्याने कार्यक्रमात पोहचू शकले नाहीत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ ते २८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल:
पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – २३ जूनच्या रात्री ११ वाजल्यापासून ते २६ जूनच्या रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.
सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – २६ व २७ जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.
वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- २७ जून रोजी रात्री ११ वाजता ते २८ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- २५ ते २८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग:
लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- २५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.
यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- २६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.
वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- २७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.
बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. सदर रस्त्यांवरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल. बारामती पाटस जाणारी वाहने ही बारामती- लोणीपाटी- सुपा- चौफुला- पाटस या मार्गाने जातील. तसेच पाटस- बारामती जाणारी वाहने पाटस- चौफुला- सुपा- लोणीपाटी- बारामती या मार्गाने जातील.
उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- २८ जून रोजी पहाटे २ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.
बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम)- २९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वोजपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतुक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण- कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.
सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- ३० जून व १ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.
निमगांव केतकी ते इंदापूर ( इंदापूर मुक्काम) २ जुलै रोजी पहाटे ते रात्री १० वाजेपर्यंत निमगांव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस- जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जाईल.
इंदापूर- ३ जुलै रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक ही अकलूज- बावडा- नातेपुते- बारामती मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतुक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.
इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- ४ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत व ५ जुलै रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.
वारकऱ्यांचा मेळा पुण्यनगरीत! | महापालिकेने केले स्वागत
: दोन वर्षांच्या खंडानंतर ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. पुणेकरांसह वरुणराजानेही संतांच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सकाळपासून शहर व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ होते. तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.
ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे : ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.
आळंदी येथील समाधी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पुजेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे आदी उपस्थित होते.
मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी फुगडीचा फेर धरला. विणा व टाळ वाजवत वारकऱ्यांसह त्यांनी भजनातही सहभाग घेतला.
वारकऱ्यांसाठी सुविधा
आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.
कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!”
नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
करोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांनंतर यावर्षी पंढरीच्या वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी (२० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मंगळवारी (२१ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारकऱ्यांच्या पोशाखातील मोठा बॅनर लावण्यात आला.
भाजपाने पुण्यात पालखीमार्गावरच नरेंद्र मोदी यांचा हा भव्य फ्लेक्स लावला…
विठू माऊली, संत ज्ञानेश्वर , संत तुकोबा हे मात्र दिसणार नाहीत.
कभी कभी लगता है अपुन हि भगवान है ! pic.twitter.com/I9PEplKWlu
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 20, 2022
या बॅनरवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. खरंतर, भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराज असं कुणीही दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून नाना पटोले यांनी ‘कभी कभी लगता है, अपुन ही भगवान है’ म्हणत मोंदीवर निशाणा साधला आहे.
त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. त्यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकोबा हे मात्र दिसणार नाहीत. कभी कभी लगता है अपुन हि भगवान है !” त्यांचं हे ट्वीट आता वेगानं व्हायरल होत आहे.
टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे | ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.
दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.
महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.
मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे मोफत चार वॉटर टॅंकर
पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा
संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पाण्याचे चार वॉटर टॅंकर देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.५९ मुक्ताबाई महाराज बेळगांवकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प.तांदळे महाराज आळंदीकर या चार दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात आले. कोरोनाचे ढग गडद होत असल्याने दोन्ही पालखी सोहळ्यात प्रत्येकी ५ हजार मास्क असे एकूण १० हजार मास्क भावीकांना वाटप करण्यात आले.
या आषाढी पायी पालखी सोहळ्यानिमित्त ह.भ.प., संत महंत आणि सन्माननीय मान्यवर यांना ५ फुट उंचीची ५०० रोपे वाटप करण्यात आली. तसेच राजमाता फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुरेखाताई सांळुखे यांना ४ फुट उंचीची वड, पिंपळ, कडूलिंब, तुळस, हिरडा, बेहडा, करंज, निरगुडी अशी ३०० रोपे वृक्षारोपणासाठी देण्यात आली. तसेच काही ज्येष्ठ वारकाऱ्यांना निवारा मिळावा यासाठी एका टँकरवर छोटासा निवाराही करून देण्यात आला आहे.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद ह.भ.प मारुती कोकाटे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य ह.भ.प.जगन्नाथ पाटील, ह.भ.प वाघ महाराज, ह.भ.प.बाबुराव तांदळे महाराज आळंदीकर, ह.भ.प विजूअण्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष सचिन भोसले, माजी नगरसेवक विनोद नढे, विक्रांत लांडे पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, सा.कार्यकर्ते हुसेन मुलानी, अभिमन्यू गाडेकर, अनिस पठाण, मारुती बानेवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, उद्योजक शंकर तांबे, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, कैलास सानप, हनुमंत घुगे, सतीश काळे, सचिन रसाळ, नितीन सोनवणे, नाना तांबारे, सुनील भोसले, प्रदीप गायकवाड, शैलेश दिवेकर संतोष मोरे, नागेश जाधव, कामगार नेते बाळासाहेब साळुंके, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ आदींचे सदस्य आदी उपस्थित होते.
अरुण पवार म्हणाले, वारकऱ्यांना वारीत पिण्यासाठी अडचण निर्माण होते. यंदा तर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टॅंकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.
ह.भ.प. वाघ महाराज म्हणाले, वारीसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध करून देणे, ही वारीच आहे. अरुण पवार करीत असलेले कार्य अतुलनीय आहे. अशीच देशाची सेवा आपल्या हातून घडो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू शेळके यांनी, तर आभार वामन भरगंडे यांनी मानले.
यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा
| महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ
आरोग्यवारी उपक्रमाचा आरंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे दि.१९ जून रोजी दुपारी १२.३० वा. होत असून या कार्यक्रमाच्या उदघाटनाला राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण या उपस्थित राहणार आहेत.
वारकरी आणि भक्तासाठी परिवहन मंत्र्यांची घोषणा
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले. दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची परिवहन मंत्री परब स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री परब म्हणाले, पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे.
पंढरपूर येथे तात्पुरती स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही श्री. परब यांनी बैठकीत दिले.
ग्रुप आरक्षणाला प्राधान्य
आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरिक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे, नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी असेही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले