Tag: Marathi news
Ruby Hall to Ramwdi Pune Metro | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन
| काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : (The Karbhari News Service) – Ruby Hall to Ramwadi Pune Metro | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुरू होणे गरजेचे होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची वेळ मिळत नसल्याने तिथपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत नव्हती, या विरोधात काँग्रेस पक्ष आणि ‘वेकअप’ पुणेकर यांनी जनमताचा रेटा उभा केला, त्याला यश आले, परिणामी येत्या ६ मार्च रोजी मेट्रो मार्गाचे उदघाटन होत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. (Mohan Joshi Pune Congress)
पुणेकरांना शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चालू होणे खूप गरजेचे आहे. लांब अंतरापर्यंत मेट्रो धावली तर जास्तीत जास्त पुणेकर तिचा लाभ घेतील. कोथरूडहून स्टेशनपर्यंत जाणाऱ्यांची सोय होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा, रहदारीचा ताण कमी होईल. मात्र, ते लक्षात न घेता पंतप्रधानांच्या सोयीसाठी निम्म्याहून अधिक मेट्रो मार्ग अडविला गेला होता. या प्रकाराच्या विरोधात पुणेकरांचा आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. अलीकडेच समाजसेवक सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलनही केले होते. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. ‘वेकअप’ पुणेकर अभियानांतर्गत वाहतूक तज्ज्ञ आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातून जनमताचा रेटा निर्माण केला. त्यापुढे सत्ताधारी भाजपला झुकावे लागले. ऑनलाईन पद्धतीने का होईना पंतप्रधान मोदी ६ तारखेला मेट्रो मार्गाचे उदघाटन करणार आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
मेट्रो सेवा मुळात काँगेसचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राबवताना २०१४ पासून भारतीय जनता पक्षाने यात उदंड राजकारण केले. त्यांच्यातील अंतर्गत वादात प्रकल्प लांबत गेला आणि खर्च वाढला. आजही भाजपचे तेच राजकारण चालू आहे. पुण्याचे प्रश्न सोडविण्याविषयी त्यांच्यात अनास्थाच आहे. लोहगाव विमानतळ टर्मिनल २ विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. पण, तिथेही भाजपचे श्रेयाचे राजकारण चालू असून, उदघाटन अजूनही झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
PMC Vidyaniketan School Katraj | पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन मराठी शाळेला २१ लाखांचे बक्षीस!
| ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात विद्यानिकेतन क्र १९ शाळेचा प्रथम क्रमांक
PMC Vidyaniketan School Katraj |Pune – (The Karbhari News Service) – राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन शाळेने बाजी मारली आहे. अभियानात ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात विद्यानिकेतन क्र १९ शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यासाठी २१ लाख इतके बक्षीस आहे.येत्या 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation Schools)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत 1 लाख 3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील 1 कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 1 कोटी 4 लाख 64 हजार 420 विद्यार्थी व 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता.
बृहन्मुंबई महानगरपालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक 7 लाख रूपयांचे आहे. या गटात पुणे महापालिकेच्या कात्रज मधील डॉ यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन क्रमांक १९ या मराठी माध्यमाच्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक हा पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील शाळेचा आहे.
या पुरस्कारा बाबत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगतिले कि, आम्ही पुणे महापालिकेच्या शाळा या आदर्श शाळा करतो आहोत. या अंतर्गत पहिल्या टप्यात १५ शाळा आदर्श शाळा करण्यात येत आहेत. त्यातीलच प्रथम क्रमांक मिळालेली विद्यानिकेतन शाळा आहे. ढाकणे यांनी पुढे सांगितले कि, एकूण ४५ शाळा आम्ही आदर्श करणार आहोत. या शाळा करताना आम्ही एकूण ८९ मानके तयार केली आहेत. यात शाळेची रचना कशी असावी, इथपासून ते गुणवत्ता कसी असावी, या सर्वांचा समावेश आहे. राज्य सरकारचा आमच्या शाळेला पुरस्कार मिळाल्याने महापालिकेच्या आदर्श शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
| आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे (Lahuji Vastad Salve Smarak) यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.
संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य क्रांतीगुरू म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.
समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकारकाचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल.
लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचार स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरुळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले,आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावेत. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सुनील कांबळे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. स्मारकासाठी साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात संग्रहालय, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याशिवाय नगर नियोजन योजनेअंतर्गत उरुळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
PMC Sewerage Maintenance and Repair Department | नाला बेसिन आणि पावसाळी लाईनच्या कामासाठी जायका प्रकल्पाचा (JICA) निधी
| 35 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव
पुणे शहरातील कोथरुड बेसीन, औंध बेसिन, बावधन पाषाण बेसिन, मंगळवार पेठ बेसिन, शनिवार पेठ बेसिन, दत्तनगर बेसिन, हिंगणे बेसिन, वडगाव बु. बेसिन, कोंढवा बेसिन याठिकाणी पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नाला सुधारणा कामे करणे, कल्व्हर्टस बांधणे, पावसाळी लाईन टाकणे व तदनुषंगिक कामे जागेवर सुरु झाले आहेत. यासाठी 54 कोटीची टेंडर प्रक्रिया लागू केली होती. मात्र मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभागास ३१ मार्च २०२४ पूर्वी ही काम पूर्ण करणेसाठी वाढीव 35 कोटी रक्कमेचा निधी लागणार आहे. त्यानुसार वर्गीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
Kasba Constituency | कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची हेमंत रासने यांची महापालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी
पुणे | (The Karbhari Online ) – कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Assembly Constituency) नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजपा कसबा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane Pune BJP) यांनी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, वीजपुरवठा सुधारणे, ड्रेनेज लाईन दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मतदारसंघातील विविध भागांमध्ये प्रलंबित असलेल्या विकासकामांची यादीही निवेदनात देण्यात आली.
श्री. हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी मी नियमितपणे पुणे महापालिका आणि इतर संबंधित विभागांशी संपर्कात आहे. गेल्या वर्षभरात अनेक कामेही पुणे महानगपालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली. परंतु महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मतदारसंघातील अजून काही प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा करून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री रवींद्र बिनवडे यांनी निवेदन स्वीकारत सर्व कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले आहे”
यावेळी कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत भाऊ रासने यांच्यासोबत कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, राजू परदेशी, प्रणव गंजीवाले, प्रशांत सुर्वे, वैशालीताई नाईक, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पवार, संजय मामा देशमुख प्रभाग अध्यक्ष भारत जाधव, अभिजीत रजपूत, सनी पवार, भस्मराज तिकोने, संदीप इंगळे, जयदीप शिंदे, माधव साळुंखे, अभिषेक मारणे, संकेत थोपटे, सिद्धेश पांडे, तन्मय ओझा तसेच कसबा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Dr Siddharth Dhende | रोजगार प्रशिक्षण केंद्रातून महिला आर्थिक स्वावलंबी होतील : डॉ. सिद्धार्थ धेंडे
– प्रभाग क्रमांक २ मध्ये महिलांसाठी घरगुती उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन | माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांचा पुढाकार
Dr Siddharth Dhende | राज्यासह देशभरात महिला उद्योजकांची मोठी संख्या वाढत आहे. महिलांना प्रोत्साहन दिल्यास आणखीन उद्योजक वाढतील. त्यासाठी महिलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. उद्योग प्रशिक्षण केंद्रामधून महिलांना उद्योग सुरु करता येईल. त्यामधून आर्थिक स्वावलंबी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील पंचशील विहार, धम्म ज्योती संघटना क्रियाशील आदर्श सेवा मंडळ, चर्च शेजारी, नागपूर चाळ या ठिकाणी महिलांकरिता घरगुती उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज पार पडले. धम्म ज्योती संघटना व सुजाता महिला मंडळ यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लिज्जत पापड उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. धेंडे बोलत होते. महिलांनी देखील या यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव घाडगे, विजय कांबळे, विशाल सोनवणे, अरविंद रणपिसे,अनिल कांबळे, अजय कांबळे, कमल वाघमारे, मंगल गमरे, कमल कांबळे, आरती माने , रेखा जाधव , सुजाता महिला मंडळ, धम्म ज्योती संघटना यांचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच प्रथम सामाजिक संघटना, आदीसह प्रभागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात लिज्जत पापड उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी घरगुती उद्योगांची माहिती दिली. त्यामधील संधी, आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. त्याचा प्रभागातील महिलांना मोठा लाभ झाला.
या कार्यक्रमाबरोबरच प्रथम, आयबीएम, स्किल्स बिल्ड नोकरी / रोजगार कौशल्य मोहीम अंतर्गत मोफत कोर्स / रोजगार मेळावा देखील आयोजित केला. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. रोजगाराची माहिती मिळावी या उद्देशाने १८ ते ३५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी याचे आयोजन करण्यात आले होते. सुजाता महिला मंडळ आणि धम्म ज्योती संघटना यांच्या पुढाकाराने हे उपक्रम पार पडले.
—————————————————–
Pune Speed Breakers | महापालिका पथ विभागाने शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावे | प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये बक्षीस देऊ
| सजग नागरिक मंचाचे महापालिका पथ विभागाला आव्हान
PMC Officers Property Declaration | मालमत्ता विवरणपत्र देण्यास क्लास वन अधिकाऱ्यांची उदासीनता | अतिरिक्त आयुक्तांकडून शिस्तभंग कारवाईचा इशारा
– महापालिका कायद्यानुसार तपशील देणे बंधनकारक आहे
Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत
Dehu Alandi Municipal Corporation |शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पांडुरंग खेसे, सतीश म्हस्के, स्वप्नील पठारे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरू शकतील. कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते. जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पाण्याच्या समस्येबाबत बोलतांना श्री.पवार म्हणाले, पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य, निवारा आदी सुविधा पुरवव्या लागतात. त्यामुळे इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. पाणी बचत व्हावी म्हणून कालव्याऐवजी बोगदा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावे म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येथील, असेही श्री. पवार म्हणाले.
नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केली आहे. लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पीएमपीएमएलची बीआरटी लेन बंद केली. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, असेही ते म्हणाले.
राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात नोकरभरती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये युवांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात नवीन युवा धोरण बनविण्यात येणार आहे. आयटीआय मध्ये रोजगारक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याचा युवकांना फायदा होईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प संनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो, रिंग रोड, मोठी रुग्णालये, बंदरे, समुद्र किनारी मार्ग आदी विविध विषयांच्या प्रकल्पांचा आढावा देऊन त्यांना गती दिली जात आहे. राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
आमदार श्री. टिंगरे म्हणाले, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना निधी मिळत आहे. लोहगाव – वाघोली समान पाणीपुरवठा योजनेसाठी २३० कोटी रुपये मंजूर असून एकूण ४५० कि.मी. च्या वितरण नलिकांपैकी २३० कि.मी. नलिका फक्त लोहगावमध्येच आहेत. २० लक्ष हून अधिक क्षमतेच्या ८ टाक्या येथे असून नवीन ९ टाक्यांची कामे सुरू होत आहेत. लोहगाव उपजिल्हा रुग्णालयचे काम अंतिम टप्प्यात असून लोहगाव आयटीआय साठी निधी मंजूर आहे. रस्ते, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यासाठी निधी मंजुरीचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.