Pune Traffic Update | इतर शहरातून पुण्यामार्गे दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल | शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Update | इतर शहरातून पुण्यामार्गे दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल

| शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद

 

 

Pune Traffic Update – (The Karbhari News Service) –  पुणे शहरातून सोलापूर रस्ता, अहमदनगर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई रस्ता, नाशिक रस्ता, सासवड रस्ता, पौड रस्ता, आळंदी रस्ता व इतर रस्त्यांवरून शहरात मार्गक्रमण करून दुसऱ्या शहराकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड, अवजड माल वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्च पासून पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे. यासंबंधीचे पूर्वीचे आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी जारी केले आहेत. (Pune Traffic Police)

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये झालेली वाढ, वाहतूक कोंडी, जड वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तसेच मेट्रो, उड्डाणपूल आदी विविध मोठे प्रकल्प व विकास कामे सुरु असल्यामुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय असल्याने ती टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले व रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रवेश असणारे मार्ग

अहमदनगर रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद राहील. वाहनचालक शिक्रापूर, चाकण, तळेगाव या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील. अहमदनगर रस्त्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी वायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक, खडी मशीन चौक, कात्रज चौक मार्ग बंद राहील. वाहनचालक लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटा तसेच शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजूरी या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील.

अहमदनगर रस्त्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग बंद राहील. वाहनचालक शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला मार्गे इच्छितस्थळी जातील. सोलापूर रस्त्यावरून साताराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मंतरवाडी फाटाचौक, खडी मशीनचौक, कात्रजचौक मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी केडगाव चौफुला, लोणंद या पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे.

सोलापूर रस्त्यावरून अहमदनगर व नाशिककडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापुर मार्गे तसेच केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर मार्गे इच्छितस्थळी जावे.

शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद

पुणे शहरातील मंगलदास रस्त्यावरील ब्ल्यु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक, रेंजहिल्स् रोडवरील पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक, सर मानेकजी मेहता रोडवरील काहुन रोड जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक, पुणे स्टेशन रोडवरील जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक या अंतर्गत रस्त्यावर जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर २४ तास प्रवेश बंद राहील. सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने यातून वगळण्यात आली आहेत.

सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले चौक

संचेती चौकावरील जंगली महाराज रोड, गणेशखिंड रोड, पौड फाटा चौकवर कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोड, राजाराम पुलावरून डी. पी. रोडकडे जाणारी, दांडेकर पुल-शास्त्री रोडकडे, सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे, पॉवर हाऊस चौक-मालधक्का चौकाकडे, पोल्ट्री फार्मचौक-आर.टी.ओ. चौकाकडे, पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे, खाणे मारूती चौक-इस्ट स्ट्रीटकडे, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे, ब्रेमेन चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री बाणेर चौक पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री पाषाण चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, सिंफनी सर्कल गणेशखिंड रोडकडे, सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे, आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, वल्फर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कोरेगाव पार्क रोड-नॉर्थ मेन रोड ताडीगुत्ता चौक ते कोरेगाव पार्क जंक्शन या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद असेल.

अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असेही पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.
0000

 Pune Municipal Corporation (PMC) News | आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

 Pune Municipal Corporation (PMC) News | आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द

Pune Municipal Corporation (PMC) News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग (PMC Health Department) व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील (PMC Solid Waste Management Department) विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर आगामी 15 दिवसांत हरकती नोंदवण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pune PMC News)
प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील आरोग्य विभागाकडील पशुशल्य चिकित्सक अधिकारी, प्लास्टिक सर्जन, नेत्र शल्य चिकित्सक, पेडियाट्रिक सर्जन, दंतशल्य चिकित्सक, भौतिकोपचार तज्ञ, सहाय्यक आरोग्य अधिकारी, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर, वैद्यकिय अधिकारी / निवासी वैद्यकिय अधिकारी, आयुर्वेदिक वैद्यकिय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, शहर क्षयरोग अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, विकृतिशास्त्र तज्ञ (क्लिनिकल पॅथोलॉजिस्ट), क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट), शल्यचिकित्सक / शल्य विशारद (सर्जन), मानसोपचार तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, वरिष्ठ औषध निर्माता, दंततंत्रज्ञ, एक्स-रे टेक्निशियन, अन्न निरीक्षक, व्यवस्थापक (वैद्यकीय सामग्री), सहाय्यक (दवाखाना)(विकासे), औषध निर्माता, परिसेविका (सिनिअर नर्स), स्टाफ नर्स ( ज्युनियर नर्स), प्रसविका/ परिचारिका (ऑक्झिलरी नर्स), वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, उप निबंधक (जन्म-मृत्यू) या पदांवर तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक या पदांवर ३१/१२/२०२३ अखेर कार्यरत असणाऱ्या अधिकारी/सेवकांच्या प्रारूप सेवाजेष्ठता याद्या तयार करण्यात आल्या असून सदर याद्या पुणे महानगरपालिकेच्या
https://pmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
परिपत्रकात म्हटले आहे कि, यादीतील अधिकारी / कर्मचारी यांनी स्वत:चे नाव, जात, जातीचा गट,शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, नेमणूकीचे दिनांक इ. सर्व बाबींची पाहणी करुन आपले नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच प्रारूप सेवाजेष्ठता यादीबाबत काही दुरुस्ती असल्यास कागदोपत्री लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावेत.
प्रारूप सेवाजेष्ठता यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप / चूका असल्यास हे कार्यालय परिपत्रक प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसांचे मुदतीत आपले आक्षेप लेखी स्वरूपात कागदपत्रांच्या
पुराव्यासहित आस्थापना विभाग कार्यालयास सादर करावेत. त्यानुसार पुढील १५ दिवसात सदरच्या नोंदी घेऊन अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये दुरूस्त्या सुचविण्यात आल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Pune Congress – (The Karbhari News Service) – एकेकाळी पुण्यावर एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी चालून आली आहे.गटबाजी विसरून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने झोकून देऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला तर काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार तर आहेच शिवाय विधानसभा, त्यापाठोपाठ होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये यशाचा मार्ग सुकर ठरणार आहे.त्यासाठी एकीची मोट बांधली तरच पुण्यावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. (Pune Loksabha Election)

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघापैकी एक महत्वाचा असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा होता.शहरावर काँग्रेसचे प्राबल्य होते.मात्र तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर आजतागायत काँग्रेस पक्ष या हक्काच्या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व मिळवू शकलेला नाही. कारण काँग्रेसला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागलेला आहे.त्याची वेगवेगळी कारणे आहेत. असे असले तरी कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे काँग्रेसला हक्काची तीन लाख मते सातत्याने मिळत आली आहेत.

मुळात ज्यावेळी शहराचे नेतृत्व तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडे होते, त्यावेळी कर्तृत्वान आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जात असत. त्यामुळेच पक्ष हा मजबूत तर होताच शिवाय महापालिकेवर वर्चस्व होते. तेंव्हाची नगरसेवकांची संख्या आज कितीपर्यंत घसरली यावरूनच काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही अधोगती का लागली हेच स्पष्ट होत असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते आजही तितक्याच ऊर्जेने काम करत आहेत.त्यामुळे काँग्रेस आजही जिवंत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा दिली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसचे वर्चस्व वाढले तर कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होतील.त्यांचे ध्येय साध्य होईल.

कार्यकर्त्यांना जर मोठ्या पदावर जायचे असेल, प्रत्येकाला संधीची अपेक्षा असेल तर यंदाची लोकसभा निवडणूक त्यादृष्टीने खरी सुरुवात आहे. यात यशस्वी झाले तर आगामी काळात काँग्रेसला कुणीच रोखू शकणार नाही. इतकेच काय पुण्यातील ही यशस्वी सुरुवात देशभरात काँग्रेससाठी निश्चितच आदर्शवत ठरेल. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविताना लोकसभेसाठी उमेदवार निवडून आणणे हीच पदाधिकारी -कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.कार्यकर्ते -पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केले तर यश कसे मिळते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदिलाने काम केले तर यश हमखास आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षाच्या श्रेष्ठींना पत्र दिले. त्यातील उद्देश हाच आहे. काँग्रेसला पुनरुज्जीवित करणे ही काळाची गरज आहे.

आज भाजपने जर पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला तर आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. पण कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असेल तर त्यात गैर काय ? आज काँग्रेसची स्थिती काय हे सर्वश्रुत आहे मात्र कार्यकर्ते आजही नेटाने पक्षाचे कार्य करत आहेत. मग त्यांचा उत्साह आणखी कसा वाढवता येईल हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.त्यानुसारच जाहीर सभेतून जनतेचा कौल घेऊनच लोकसभेचा उमेदवार ठरवा ही आबा बागुल यांची भूमिका रास्तच आहे. आबा बागुल स्वतः लोकसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत मात्र जो कोण उमेदवार असेल याचा निर्णय जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौलनुसार घ्या. असाच बागुल यांच्या पत्राचा आशय आहे. त्यामुळे वर्चस्व गमावले असले तरी काँग्रेसचे शहरात अस्तित्व अबाधित आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छा पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी जितकी जमेची ठरणार आहे. त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे, अशीच भूमिका आबा बागुल यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निश्चयाला ताकद दिली तर पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.

Dress code for Teachers | राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेस कोड! शिक्षकांनी जिन्स व टी शर्ट चा वापर शाळेत करू नये

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

Dress code for Teachers | राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेस कोड! शिक्षकांनी जिन्स व टी शर्ट चा वापर शाळेत करू नये

| राज्य सरकार कडून आदेश जारी

Dress Code for Teachers – (The Karbhari News Service) – राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून शिक्षक संवर्गाच्या पेहरावाबाबत राज्य सरकार कडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

सरकारच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. असे सरकारने म्हटले आहे.

सरकारने पुढे म्हटले आहे कि शिक्षकांच्या  वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो.
ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत :-
१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम / चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.
३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.
४) उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
५) पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
६) पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
७) महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज ) यांचा वापर करावा.
८) स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील.
९) वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना / महिला शिक्षकांना बूट (शूज) वापरण्यातून सवलत देण्यात यावी.

राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत “Tr. ” तर मराठी भाषेत “टि” असे संबोधन लावण्यात यावे. तसेच,
यासंदर्भातील बोधचिन्ह आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुनिश्चित करुन त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल. असे ही सरकारने आदेशात म्हटले आहे.

PMC Employees DA Hike | केंद्राच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करा | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात अदा करण्याची मागणी 

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

PMC Employees DA Hike | केंद्राच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करा | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात अदा करण्याची मागणी

| महापालिका कामगार युनियन ची आयुक्तांकडे मागणी

PMC Employees DA Hike – (The Karbhari News Service) केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ४ टक्के वाढ मंजूर केली आहे.  आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.  हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.  ते मार्चअखेर पगारासह जमा केले जाईल.  यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे.  याच धर्तीवर पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) सुधारित महागाई भत्ता लागू करावा आणि त्याचा फरक दिला जावा, अशी मागणी महापालिका कामगार युनियन (Pune Mahanagarpalika Kamgar union) ने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

कामगार युनियन चे अध्यक्ष उदय भट यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनानुसार गर्व्हमेंट ऑफ इंडीया, मिनिस्ट्री ऑफ फायनन्स, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, नॉर्थ ब्लॉक, न्यु दिल्ली यांचे  १२ मार्च, रोजीचे कार्यालयीन परिपत्रकान्वये महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करून 1 जानेवारी  पासून ४६ टक्के वरून ५० टक्के इतकी वाढ केल्याचे परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

The Karbhari - Ministry of finance

पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी यांना  केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्याबाबत पुणे मनपा व कामगार संघटना यांचेमध्ये करार झालेला असून केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे धोरण व प्रचलित कार्यपध्दती आहे.

तरी, पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचारी यांना संदर्भाकित परिपत्रकानुसार महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करून 1 जानेवारी पासून ४६ टक्के वरून ५० टक्के दराने माहे मार्च, २०२४ पेड इन एप्रिल २०२४ चे वेतनामध्ये फरकासहीत अदा करणेबाबत संबधितांना आदेश व्हावेत. अशी मागणी कामगार यूनियन ने केली आहे.

Maharashtra Cabinet Meeting Decisions |आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Meeting Decisions |आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

 

Maharashtra Cabinet Meeting – (The Karbhari News Service) – आज (सोमवार दि.११ मार्च) महाराष्ट्र  मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय जाणून घ्या.

 

 

बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार
( गृहनिर्माण विभाग)

बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.
( गृहनिर्माण विभाग)

यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू
( वस्त्रोद्योग विभाग)

एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी
( नगरविकास )

मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार
( नगरविकास विभाग)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र
( राज्य उत्पादन शुल्क)

जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता
( वित्त विभाग)

राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
(गृह विभाग)

एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने
(कामगार विभाग)

विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना
(विधि व न्याय विभाग)

राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प
(नियोजन विभाग)

अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड
(सार्वजनिक बांधकाम विभाग)

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार
( नगरविकास विभाग)

शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक
( महिला व बालकल्याण विभाग)

उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ
( ऊर्जा विभाग)

६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता
( आदिवासी विकास विभाग)

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
( आदिवासी विकास विभाग)

राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता
( सामाजिक न्याय विभाग)

राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना
५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता
( शालेय शिक्षण)

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अल्पसंख्याक आयुक्तालय
( अल्पसंख्याक विभाग )

आनंदाचा शिधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडव्याला देणार
( अन्न व नागरी पुरवठा)

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक
( सामाजिक न्याय विभाग)

CNG Price Decrease | MNGL ने पुणे परिसरात CNG च्या किमती कमी केल्या

Categories
Breaking News social पुणे

CNG Price Decrease | MNGL ने पुणे परिसरात CNG च्या किमती कमी केल्या

Pune – (The Karbhari News Service) – CNG Price Decrease | सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांसह पुणे शहरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किरकोळ विक्री किंमतीत कपात केली आहे, जे 5/6th मार्च 2024 च्या मध्यरात्रीपासून लागू होत आहेत.  सीएनजीच्या दरात रु. 2.50/- प्रति किलोग्रॅम प्रमाणे (करांसह) कपात करण्यात आली आहे.. सीएनजी किरकोळ विक्री किंमत रु. ८६.०/- प्रति किलो वरून रु. 83.50/- प्रति किलो करण्यात आली आहे.
 कपातीनंतर , MNGL चे पुणे शहरातील CNG, पेट्रोलच्या तुलनेत प्रवासी कार विभागासाठी सुमारे 50% आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे 30% ची आकर्षक बचत देते आणि ऑटोरिक्षांसाठी सुमारे 30% पेक्षा जास्त बचत देते.
26 जानेवारी, 2024 पासून, देशात नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार आणि Regulatory Body नि दिलेल्या प्रायोरिटी वर , CGD कंपनींद्वारे देशभरात ‘राष्ट्रीय PNG ड्राइव्ह’ हाती घेण्यात आला आहे.
या संदर्भात, MNGL ने 14.02.2024 पासून देशांतर्गत घरगुती गॅस च्या किमती कमी केल्या. आणि आता काही दिवसांपासून, आम्ही पाहत आहोत की डोमेस्टिक PNG साठी नवीन नोंदणी आणि वापर वेगाने होत आहेत. पीएमसी आणि पीसीएमसी क्षेत्रातील ग्राहकांमध्ये नैसर्गिक वायू वापरा बद्दल सकारात्मकता विकसित झाली आहे.
हा अनुभव लक्षात घेऊन, MNGL ने अंतिम ग्राहकांमध्ये पसंतीचे इंधन म्हणून CNG ची सकारात्मकता आणि आकर्षकता निर्माण करण्यासाठी ही CNG किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MNGL पुण्यासह 6 वेगवेगळ्या भौगोलिक भागात CGD प्रकल्प चालवत आहे आणि सगळीकडे CNG च्या किमती रु. 2.50/- प्रति किलोग्राम ने कमी केल्या आहेत. 2.50/- प्रति किलोग्राम या सर्व करांसह.

Ruby Hall to Ramwdi Pune Metro | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन | काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश – माजी आमदार मोहन जोशी

Categories
Breaking News Political social पुणे

Ruby Hall to Ramwdi Pune Metro | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन

| काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश – माजी आमदार मोहन जोशी

 

पुणे : (The Karbhari News Service) – Ruby Hall to Ramwadi Pune Metro | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुरू होणे गरजेचे होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची वेळ मिळत नसल्याने तिथपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत नव्हती, या विरोधात काँग्रेस पक्ष आणि ‘वेकअप’ पुणेकर यांनी जनमताचा रेटा उभा केला, त्याला यश आले, परिणामी येत्या ६ मार्च रोजी मेट्रो मार्गाचे उदघाटन होत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. (Mohan Joshi Pune Congress)

पुणेकरांना शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चालू होणे खूप गरजेचे आहे. लांब अंतरापर्यंत मेट्रो धावली तर जास्तीत जास्त पुणेकर तिचा लाभ घेतील. कोथरूडहून स्टेशनपर्यंत जाणाऱ्यांची सोय होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा, रहदारीचा ताण कमी होईल. मात्र, ते लक्षात न घेता पंतप्रधानांच्या सोयीसाठी निम्म्याहून अधिक मेट्रो मार्ग अडविला गेला होता. या प्रकाराच्या विरोधात पुणेकरांचा आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. अलीकडेच समाजसेवक सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलनही केले होते. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. ‘वेकअप’ पुणेकर अभियानांतर्गत वाहतूक तज्ज्ञ आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातून जनमताचा रेटा निर्माण केला. त्यापुढे सत्ताधारी भाजपला झुकावे लागले. ऑनलाईन पद्धतीने का होईना पंतप्रधान मोदी ६ तारखेला मेट्रो मार्गाचे उदघाटन करणार आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मेट्रो सेवा मुळात काँगेसचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राबवताना २०१४ पासून भारतीय जनता पक्षाने यात उदंड राजकारण केले. त्यांच्यातील अंतर्गत वादात प्रकल्प लांबत गेला आणि खर्च वाढला. आजही भाजपचे तेच राजकारण चालू आहे. पुण्याचे प्रश्न सोडविण्याविषयी त्यांच्यात अनास्थाच आहे. लोहगाव विमानतळ टर्मिनल २ विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. पण, तिथेही भाजपचे श्रेयाचे राजकारण चालू असून, उदघाटन अजूनही झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

PMC Vidyaniketan School Katraj | पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन मराठी शाळेला २१ लाखांचे बक्षीस! 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

PMC Vidyaniketan School Katraj | पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन मराठी शाळेला २१ लाखांचे बक्षीस!

| ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात विद्यानिकेतन क्र १९ शाळेचा प्रथम क्रमांक

 

PMC Vidyaniketan School Katraj |Pune – (The Karbhari News Service) – राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन शाळेने बाजी मारली आहे. अभियानात ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात विद्यानिकेतन क्र १९ शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यासाठी २१ लाख इतके बक्षीस आहे.येत्या 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  (Pune Municipal Corporation Schools)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत 1 लाख 3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील 1 कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 1 कोटी 4 लाख 64 हजार 420 विद्यार्थी व 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता.

बृहन्मुंबई महानगरपालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक 7 लाख रूपयांचे आहे. या गटात पुणे महापालिकेच्या कात्रज मधील डॉ यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन क्रमांक १९ या मराठी माध्यमाच्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक हा पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील शाळेचा आहे.

या पुरस्कारा बाबत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगतिले कि, आम्ही पुणे महापालिकेच्या शाळा या आदर्श शाळा करतो आहोत. या अंतर्गत पहिल्या टप्यात १५ शाळा आदर्श शाळा करण्यात येत आहेत. त्यातीलच प्रथम क्रमांक मिळालेली विद्यानिकेतन शाळा आहे. ढाकणे यांनी पुढे सांगितले कि, एकूण ४५ शाळा आम्ही आदर्श करणार आहोत.  या शाळा करताना आम्ही एकूण ८९ मानके तयार केली आहेत. यात शाळेची रचना कशी असावी, इथपासून ते गुणवत्ता कसी असावी, या सर्वांचा समावेश आहे. राज्य सरकारचा आमच्या शाळेला पुरस्कार मिळाल्याने महापालिकेच्या आदर्श शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

| आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

पुणे – (The Karbhari News Service) –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे (Lahuji Vastad Salve Smarak) यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.

The karbhari - Lahuji smarak sangamwadi pune

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य क्रांतीगुरू म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.

समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकारकाचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल.

लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचार स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरुळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले,आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावेत. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुनील कांबळे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. स्मारकासाठी साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात संग्रहालय, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याशिवाय नगर नियोजन योजनेअंतर्गत उरुळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.